Friday, September 4, 2026

Nashik : कळवण आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी मोठी कारवाई, दोन जण निलंबित

Nashik : कळवण आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी मोठी कारवाई, दोन जण निलंबित

Nashik : नाशिकच्या कळवण तालुक्यातील विसरवाडी येथील शासकीय आश्रमशाळेतील (Government Ashram School Visarwadi) आठ वर्षीय विद्यार्थिनी सृष्टी सोनवणे हिच्या मृत्यूप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात आदिवासी विकास विभागाने (Department of Tribal Development) भगवान वसंत निकम, शिक्षण विस्तार अधिकारी, कळवण आणि स्मिता प्रल्हाद गायकवाड, अधीक्षिका, विसापूर आश्रमशाळा यांना निलंबित केले आहे. गेल्या काही दिवसांपासून आदिवासी विभागाच्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या मृत्यूचा मुद्दा चर्चेत असतानाच ही घटना समोर आली आहे.

नेमकं काय घडलं ?

गुरुवारी सकाळी सृष्टी सोनवणे हिला अचानक ताप आला. त्यानंतर आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांनी तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथे तिच्यावर उपचार करण्यात आले आणि औषधोपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने तिला आश्रमशाळेत परत आणण्यात आले. यानंतर सृष्टीने दुपारी जेवण केले. मात्र, त्यानंतर तिला उलटी झाली. संध्याकाळच्या सुमारास पुन्हा ताप आल्याने तिला औषध देण्यात आले. काही वेळ ती झोपली होती. मात्र, रात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास तिची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यानंतर शिक्षकांनी तिला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले.

सृष्टीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तिच्या मृत्यूबाबत पालकांनी संशय व्यक्त केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पालकांनी शाळा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत मुलगी आजारी असल्याची माहिती वेळेवर का देण्यात आली नाही, शाळेत तिच्यावर कोणते उपचार झाले आणि रुग्णालयात दाखल करण्यास विलंब झाला का, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. पालकांच्या आरोपांची गंभीर दखल घेत आदिवासी विकास नाशिकचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा (Dinkar Pavra) यांनी भगवान वसंत निकम, शिक्षण विस्तार अधिकारी, कळवण आणि स्मिता प्रल्हाद गायकवाड, अधीक्षिका, विसापूर आश्रमशाळा यांना निलंबित केले आहे.

आदिवासी विभागाकडून चौकशी सुरू

घटनेची माहिती मिळताच आदिवासी आयुक्त लीना बनसोड (Leena Bansod) यांनी तातडीने प्रकल्प अधिकाऱ्यांना आश्रमशाळेत जाऊन प्राथमिक माहिती घेण्याच्या सूचना दिल्या. आश्रमशाळेतील इतर विद्यार्थ्यांचीही आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. विद्यार्थिनीचा मृत्यू आश्रमशाळेत झाला की रुग्णालयात नेताना किंवा रुग्णालयात दाखल केल्यानंतर झाला, याबाबतची नेमकी माहिती शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे आदिवासी विभागाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शासनाची असून, या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. चौकशीअंती दोषी आढळणाऱ्यांवर आणखी कारवाई केली जाणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.

सृष्टीच्या पालकांना दोन लाख सानुग्रह अनुदान 

यापुर्वीही राज्यात काही ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आदिवासी विकास विभागाने संबंधितअधिकाऱ्यांना निलंबित केले असून, सृष्टीच्या पालकांना दोन लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे. या कारवाईमुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आजारी विद्यार्थ्याला तातडीने उपचार, पालकांना वेळेवर माहिती आणि जबाबदारी निश्चित करण्याची यंत्रणा प्रभावी आहे का, याची प्रशासनाला आता तपासणी करावी लागणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >