नवी दिल्ली : शिक्षक दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यांशी मनमोकळा संवाद साधला. या वेळी शिक्षण पद्धती, मुलांचे वाढते मोबाईलचे व्यसन, अमली पदार्थांचा धोका आणि मुलांमधील सुप्त गुण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर हलक्या-फुलक्या वातावरणात चर्चा झाली.
शिक्षकांशी मिश्किल गप्पा आणि हास्यकल्लोळ
संवादादरम्यान एका शिक्षिकेने सांगितले की, त्या शाळेत मुलांकडून मुलाखती घेण्याचा सराव करून घेतात. यावर पंतप्रधान मोदी हसून म्हणाले, "म्हणजे ही मुले घरी जाऊन पालकांचीही मुलाखत घेत असतील! 'आज हाच स्वयंपाक का केला ? एवढा खर्च का झाला?' असे प्रश्न विचारून त्यांनी पालकांना त्रस्त केले असेल." पंतप्रधानांच्या या विनोदावर सर्वांमध्ये एकच हशा पिकला.
वक्तृत्व कला आणि आत्मविश्वासाचे धडे
वक्तृत्व शिकवणाऱ्या एका शिक्षिकेला पंतप्रधानांनी विचारले, "जर मी तुमचा विद्यार्थी असतो, तर मला चांगला वक्ता बनण्यासाठी तुम्ही काय सल्ला दिला असता?" यावर शिक्षिकेने "आत्मविश्वास हवा" असे सांगितले, पण पंतप्रधान समोर असल्यामुळे त्या स्वतःच थोड्या घाबरल्या. यावर मोदींनी मिश्किलपणे विचारले, "म्हणजे उत्तम वक्ता बनण्यासाठी वलय (Aura) नसले पाहिजे का? नाहीतर लोक भाषण ऐकण्याऐवजी फक्त वलयाकडेच पाहत राहतील."
आपल्या आयुष्याला योग्य दिशा दाखवण्यात, उत्तम संस्कार करण्यात आणि चांगल्या-वाईटाची ओळख करून देण्यात मार्गदर्शकांचा वाटा सर्वात मोठा असतो. भारतीय ...
अभ्यासाव्यतिरिक्त मुलांमधील सुप्त गुण ओळखा
प्रत्येक मूल अभ्यासातच हुशार असेल असे नाही, असे सांगत पंतप्रधानांनी शिक्षकांना आवाहन केले की त्यांनी प्रत्येक मुलामधील वेगळी ताकद आणि आवड ओळखली पाहिजे. पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन मुलांच्या कलागुणांना वाव देणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चर्चेदरम्यान एका शिक्षिकेने 'एकलव्य मॉडेल शाळां'चे कौतुक केले. ज्या कुटुंबांनी कधी शाळेची पायरीही पाहिली नव्हती, त्या कुटुंबातील मुले आज या शाळांमुळे IIT, NIT आणि डॉक्टरीच्या परीक्षा उत्तीर्ण होण्याचे स्वप्न पाहत आहेत, असे त्या म्हणाल्या.
स्तनाच्या कर्करोगाबाबत जागरूकता
शाळांमध्ये महिलांना स्तनाच्या कर्करोगाबाबत जागरूक करणाऱ्या शिक्षिकेचे मोदींनी कौतुक केले. आपल्या काशी (वाराणसी) मतदारसंघात स्वतः राबवलेल्या मोहिमेची आठवण करून देत मोदी म्हणाले की, योग्य जनजागृतीमुळे आज अनेक महिला स्वतःहून तपासणीसाठी पुढे येत आहेत. या मोहिमेची नोंद 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'मध्येही झाली होती.
स्क्रीनचे व्यसन आणि अमली पदार्थांचा धोका
आजच्या काळातील आव्हानांवर बोलताना पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली. मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी त्यांना मोबाईल गेम्सऐवजी मैदानी खेळ आणि चित्रकला, हस्तकला यांसारख्या सर्जनशील कामांकडे वळवले पाहिजे. ड्रग्जचा धोका आता लहान शहरांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या वागण्यातील बदलांकडे बारीक लक्ष ठेवले पाहिजे.
'मुलांमधील बालपण मरू देऊ नका'
संवादाचा शेवट करताना पंतप्रधान म्हणाले, "शिक्षकांनी फक्त पुस्तके आणि अभ्यासापुरते मर्यादित न राहता मुलांच्या आयुष्याशी जोडले गेले पाहिजे. मुलांमधील लहान मूल आणि बालपण नेहमी जिवंत ठेवणे, हे शिक्षकांचे सर्वात मोठे काम आहे."
४८ शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
दरम्यान, नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील ४८ उत्कृष्ट शिक्षकांना 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार' देऊन गौरवण्यात आले. दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त देशभरात 'शिक्षक दिन' साजरा केला जातो.






