Nashik : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नाशिक पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या ९९ हून अधिक संशयितांना शहरातून तडीपार करण्यात आले होते. मात्र, तडीपारीचा आदेश झुगारून यातील काही गुन्हेगार नाशिक शहरातच लपूनछपून राहत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा तडीपार गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी आता विशेष ‘धरपकड’ मोहीम सुरू केली आहे .(Nashik Crime News)
हायअलर्टवर राहण्याचे निर्देश
गणेशोत्सव निर्विघ्न आणि शांततेत पार पडावा, यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील सर्व १४ पोलीस ठाणी आणि गुन्हे शाखेच्या पथकांना हायअलर्टवर राहण्याचे निर्देश दिले आहेत. तडीपारीचा आदेश मोडून शहरात फिरताना आढळणाऱ्या गुन्हेगारांना तातडीने ताब्यात घेऊन त्यांच्यावर अधिक कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
Nashik Crime : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या तीन ते चार घटनांमुळे चर्चेत आला. समृद्धी ...
‘स्टॉप अँड सर्च’ मोहीम अधिक तीव्र
दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीचा गैरफायदा घेऊन अनुचित प्रकार घडवणाऱ्यांवरही पोलिसांची करडी नजर राहणार आहे. यासाठी ‘स्टॉप अँड सर्च’ मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठा, गणेश मंडळांचे परिसर तसेच गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलीस आणि विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. संशयित व्यक्तींची जागेवरच तपासणी केली जात असून, अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधातही कारवाई केली जात आहे. (Nashik Crime News)
गुन्हेगारांकडून लिहून घेणार प्रतिज्ञापत्र
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या दोन्ही परिमंडळातील उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी, सरकारवाडा, सातपूर आणि नाशिकरोड विभागात प्रतिबंधात्मक कारवायांना वेग देण्यात आला आहे. अमली पदार्थांची विक्री, जुगार तसेच अवैध दारूच्या धंद्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या संशयितांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १०७ आणि ११० अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. तसेच संबंधितांकडून वर्तणूक सुधारणा प्रतिज्ञापत्र अर्थात बॉण्ड लिहून घेतला जात आहे. या प्रतिज्ञापत्राचा भंग झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करून थेट तुरुंगात रवानगी केली जाऊ शकते. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींवर पोलिसांचा चांगलाच अंकुश राहण्याची शक्यता आहे.






