Thursday, September 10, 2026

BMC Water Department : मुंबईतील पाणी साठे सॅटेलाईटद्वारे शोधा

BMC Water Department : मुंबईतील पाणी साठे सॅटेलाईटद्वारे शोधा

गळती, अनधिकृत जोडणी, पाणी चोरी,नवीन बांधकामांचे पाणी रोखा; स्थायी समिती अध्यक्षांनी दिले आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत पाण्याची समस्या दिवसेंदिवस जटील होत असून स्थायी समितीच्या बैठकीत पाण्यावरून पुन्हा एकदा नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र, ३० सप्टेंबर पर्यंत पाण्याचा साठा यावरच पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट करत पाणी समस्ये पुढेही कायम राहू शकते. त्यादृष्टीकोनातून सॅटेलाईटद्वारे मुंबईतील पाणी साठे शोधून काढले जावेत.तसेच पाण्याची गळती शोधून त्यावर कार्यवाही करतानाच पाणी चोरी, बुस्टर पंप आणि नवीन बांधकामांचे पाणी बंद करण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिले. तसेच जलतरण तलावांना पुरवले जाणारे पाणी बंद करा पण लोकांना आधी पाणी द्या असेही प्रशासनाला त्यांनी खडे बोल सुनावले.

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत उबाठाच्या श्रध्दा जाधव यांनी तलाव भरले तरी पाण्याची टंचाई का आहे? एफ दक्षिण विभाग कार्यालयावर महिलांनी पाण्यासाठी मोर्चा काढला आहे. त्यामुळे कपात मागे घेण्याचा निर्णय कधी घेणार असा सवाल केला. तर मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी जुनी जलवाहिनी बदलणे आवश्यक आहे. आज लोकांना पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तर प्रकाश दरेकर यांनी निवासी कपात त्वरीत मागे घेत रद्द करण्याची मागणी केली. तर शितल गंभीर यांनी पाण्याचा दाब जी उत्तर विभागात वाढवला जावा अशी मागणी केली. गळतीतून ४००ते ५०० दशलक्ष लिटर पाणी वाया जात असल्याचे एमआयएमचे समीर कुरेशी यांनी सांगितले. डोंगराळ भागांमध्ये कपात मागे घेण्यात आल्याचे सांगितले जाते.पण याची अंमलबजावणी कधी होणार असा सवाल केला तर दिपमाला बढे यांनी भांडुप परिसर डोंगराळ भागांत असून या डोंगरावर पाणीही पोहोचत नसल्याचे सांगितले. विहिरी स्वच्छ करून त्या पाण्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी करण्याचे आयुक्तांचे आदेश आहे, त्याचे काय झाले असा सवाल अजंता यादव यांनी केला. तर फणसे यांनी विहिरी स्वच्छ करून अत्यावश्यक बाब म्हणून महापालिकेने त्या ताब्यात घेवून त्यातून पुरवठा करावा अशी सूचना केली. तर मुंबईतील सर्व जलवाहिन्या महापालिकेने बदलव्यात अशी सूचना रमाकांत रहाटे यांनी केली. आज मुंबईला आणि कोणत्या नगरसेवकाच्या भागात किती पाणी पुरवठा करावा हा निर्णय आयुक्त नाही तर चावीवाला करता असे सांगतो ज्याने चावीवाल्याला पटवले त्याच्या विभागात पाणी पुरवठा सुरळीत होतो असे सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत डॉ. सईदा खान, मिनाक्षी पाटणकर, शिवकुमार झा आदींनी चर्चेत भाग घेतला होता.

यावर अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांनी सध्या पाणी साठा ९५ ते ९६ टक्के असला तरी सध्या अपेक्षित पाऊस पडत नाही आणि सप्टेंबर महिन्यात पडेल असाही अंदाज नाही. त्यामुळे कपात मागे घेण्याचा निर्णय तुर्तास नाही असे स्पष्ट करत मुंबईतील सर्व जलवाहिन्यांचे जीआयएस मॅपिंग सुरु आहे. त्यानंतर कोणत्या जलवाहिन्यांचे काम करता येईल याचा निर्णय घेणे शक्य होणार आहे.

यावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी प्रत्येक गावात जशा साठवण क्षमता असलेल्या विहिरी आहे, त्यांचा आधार घ्यावा लागेल. जलतरण तलाव, क्लब आणि मनोरंजन आदींना पाणी देण्यापेक्षा निवासी वापराला प्राधान्य द्या. असे सांगत त्यांनी सॅटेलाईट द्वारे मुंबईतील पाण्याचे साठे शोधले जावेत असे निर्देश दिले. तसेच नवीन बांधकामांचे पाणी रोखणे, गळती शोधणे, अनधिक जलजोडणी तोडणे, पंप काढणे याबरोबरच रेन वॉटर हार्वेस्टींग योजना प्रभावी राबवणे याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यामुळे येत्या गणेशोत्सवानंतर पाणी पुरवठयाच्या नियोजनाबाबत सर्वंकष चर्चा करण्यासाठी व उपाययोजना सूचवण्यासाठी स्थायी समितीची बैठक घेतली जाईल असे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >