Saturday, September 5, 2026

Mumbai Fake Call Centre Busted : मालाडमध्ये बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश! ई-कॉमर्स फ्रँचायझीच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक, १९ जणांवर गुन्हा

Mumbai Fake Call Centre Busted : मालाडमध्ये बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश! ई-कॉमर्स फ्रँचायझीच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक, १९ जणांवर गुन्हा

मुंबई : प्रसिद्ध ई-कॉमर्स आणि कूरियर कंपन्यांची जीवनभर फ्रँचायझी देण्याचे आणि त्यातून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका बनावट कॉल सेंटरचा बांगुर नगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या टोळीने आतापर्यंत २२ जणांना जाळ्यात ओढून तब्बल १४.८३ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे तपासात समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालाड पश्चिमेकडील मार्वे रोडवर असलेल्या न्यूटन शाळेजवळ 'एम फिन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड' (M Fins Services Private Limited) नावाच्या कंपनीतून हे भोगस कॉल सेंटर चालवले जात होते. २ सप्टेंबर रोजी गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता, तेथे अनेक तरुण-तरुणी फोनवरून नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढताना रंगेहात सापडले. हे भामटे नागरिकांशी मोबाईल आणि व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधत असत. अमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा, ब्लू डार्ट, डीटीडीसी आणि बिगबास्केट यांसारख्या नामांकित कंपन्यांशी आपल्या कंपनीचा करार असल्याचे सांगून ते लोकांना भुरळ घालत. या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवल्यास आयुष्यभरासाठी फ्रँचायझी आणि भरघोस परतावा मिळेल असे सांगून ते नागरिकांकडून पैसे उकळत असत. पोलिसांच्या तपासात सोहनलाल गुप्ता हा या कंपनीचा मालक असल्याचे समोर आले असून, प्रत्यक्षात या कंपनीचा केवळ एकाच कंपनीशी करार होता.

पोलिसांनी या छाप्यात टेलीकॉलर्सचे १७ मोबाईल, ८ लॅपटॉप, एक्सेल शीट्स आणि फ्रँचायझी कराराची कागदपत्रे जप्त केली आहेत. याशिवाय फ्रँचायझीसाठी पैसे भरलेल्या ग्राहकांची नावे, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि त्यांनी भरलेल्या रकमेची यादी पोलिसांच्या हाती लागली आहे. घटनास्थळावरून सुमारे २.३० लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ज्या ग्राहकांनी या कंपनीला पैसे दिले होते, त्यांच्याशी पोलिसांनी संपर्क साधला असता धक्कादायक माहिती उघड झाली. पैसे भरल्यानंतर ग्राहकांना कोणतीही फ्रँचायझी मिळाली नाही. इतकेच नव्हे तर, पैसे दिल्यानंतर आरोपींनी ग्राहकांचे फोन उचलणेही बंद केले आणि त्यांची रक्कम परत केली नाही.

याप्रकरणी पोलिसांनी संतोष गुप्ता, चिराग शाह, ऐश्वर्या येशू, फातिमा सय्यद, कासिम अन्सारी, कैफ काझी, राकेश गुप्ता, आरती नाडर, आर्यन अन्सारी, रोहित किरेकर, शीतल शर्मा, प्रियंका कुशवाह, आफरीन शेख, मणीकुमार गंदन, सुंदरम झा, महक खान, अनिकेत पवार, संदेश गावडे आणि पार्थ राजपूत या १९ जणांवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१-८(४) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या टोळीने आणखी किती जणांना अशाच प्रकारे फसClass केले आहे आणि त्यांनी जमा केलेल्या पैशांचे आर्थिक व्यवहार कुठे-कुठे झाले आहेत, याचा अधिक तपास बांगुर नगर पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >