शुद्ध हवा, पाणी आणि सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणावर मिळाल्यास झाडांचे आयुष्य वाढते. हे सोपे समीकरण ध्यानात घेऊन इंदापूर तालुक्यातील कळस येथील शशिकांत गणपत पवार या शेतकऱ्याने शेतीत ‘झीरो बजेट तंत्रज्ञाना’चा वापर केला. या तंत्रज्ञानामुळे उजाड माळरानावरील साडेपाच एकर क्षेत्रावर ‘भगव्या’ डाळिंबाची बाग पवार यांनी फुलवली आहे.
कळस परिसरात पाण्याची कमतरता असल्याने हंगामी पिके घेण्याकडे पवार यांचा कल होता. मात्र, कृषी विभागाच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत त्यांना डाळिंब लागवडीसाठी अनुदान मिळाले. घरालगत असलेल्या माळरानावर पवार यांनी साडेपाच एकरात भगव्या जातीच्या रोपांची लागवड केली. लागवडीनंतर डाळिंबाच्या बागेत रासायनिक खते, सेंद्रिय खते, कीटकनाशकांचा वापर केला. जवळपास दोन वर्षानी डाळिंबाचा पहिला बहर धरला. मात्र, पवार यांनी केलेल्या खर्चाइतकेदेखील उत्पन्न त्यातून मिळाले नाही. पहिल्यांदा नुकसानच झाले. तर शेजारच्या डाळिंबाच्या बागा मर रोगाने आणि तेल्या रोगाने जळून गेल्या. यामुळे डाळिंबाची शेती करावी की नाही, अशा द्विधा मन:स्थितीत पवार सापडले.
रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत खराब होतो. कालांतराने जमिनी नापीक होण्याचा धोका असतो. ही खूणगाठ पवार यांनी मनाशी बांधली आणि संपूर्ण बागच उपटून टाकण्याचा निर्णय घेतला. रासायनिक खतांवर आधारित शेतीचा धोका असला तरी यावर उपाय काय, याविषयी त्यांचे मंथन सुरू असतानाच त्यांना अचानक मार्ग सापडला. एक वर्तमानपत्र चाळत असताना त्यात ‘झीरो बजेट तंत्रज्ञाना’विषयी देण्यात आलेली माहिती त्यांच्या नजरेस पडली. ही बातमी वाचल्यावर त्यांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे त्यांनी मनोमन ठरवले. याच वर्तमानपत्राचा त्यांनी आधार घेत पवार यांनी झीरो बजेट तंत्रज्ञान विकसित करणा-या अमरावती जिल्ह्यातील सुभाष पाळेकर यांच्याशी संपर्क साधला. पाळेकर यांनी झीरो बजेट तंत्रज्ञानातून ‘डाळिंब शेती’विषयी त्यांना मार्गदर्शन केले. त्यानुसार यंदा डाळिंबाचा दुसरा बहर धरला आहे. झीरो बजेट तंत्रज्ञानात रासायनिक अथवा सेंद्रिय खते विकत घ्यावी लागत नाहीत. पवार यांच्याकडे उपलब्ध असलेल्या साहित्याचा या प्रयोगात वापर करावा लागतो. यामध्ये प्रामुख्याने ‘दशपर्णी अर्क’ (दहा वनस्पतींचा अर्क), गोमूत्र, कडुनिंब, लसूण, मिरची, तंबाखू यांच्या मिश्रणापासून तयार केलेला अर्क (अग्निअस्त्र), गोमूत्र, कडुनिंब, पांढरा धोत्रा, बेल, निरगुडी आणि कन्हेर यांच्या मिश्रणापासून तयार केलेले ब्रह्मास्त्र याचा डाळिंबाच्या बागेसाठी वापर केला असल्याचे पवार सांगतात. यामुळे जमिनीतील पोषकद्रव्यांमध्ये वाढ होऊन त्याचा उत्पादनवाढीसाठी मोठा फायदा झाला असल्याचे पवार यांनी सांगितले.
डाळिंबाच्या फळाला तडे जाऊ नयेत. म्हणून चक्क देशी गाईच्या गोव-या, साखर यांचा वापर केला आहे. सध्या पवार यांच्या बागेतील झाडे डाळिंबांनी लगडलेली आहेत. एका झाडावर 15 किलो डाळिंब आहेत. डाळिंबाच्या फळावर बुरशी होऊ नये म्हणून गावरान गाईचे ताक, नारळपाणी, सप्तधान्य अंकुराची पाण्यातून फवारणी केली. त्यामुळे डाळिंबाचा आकारदेखील वाढला आहे, असे पवार यांनी सांगितले. डाळिंबाच्या बागेला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन यंत्रणा सुरू केली. मात्र, सध्या टंचाईच्या काळात प्रतिझाडाला पाच लिटर पाणी दिले जात आहे. बागेवर दुष्काळाचा परिणाम होऊ नये, यासाठी पवार यांनी उसाच्या पाचटाचे आच्छादन (मल्चिंग) केले आहे. यामुळे पाण्याच्या कमतरतेचा परिणाम फळांवर दिसून येत नाही. यामुळे पाण्याची कमतरता असूनही त्याचा उत्पादनावर फारसा परिणाम झाला नसल्याचे पवार सांगतात.
शेती हा व्यवसाय केवळ अंगमेहनतीचा आहे. तसेच रासायनिक खतांवर भरमसाट खर्च केला म्हणजे उत्पादन वाढते हा समजच सर्वप्रथम बाजूला केला पाहिजे. शेती यशस्वी करावयाची असल्यास आपण कोणते पीक घेत आहोत, त्यासाठी नियोजन काय असावे आणि नवीन तंत्रज्ञानावर कायम नजर ठेवायला हवी, असेही त्यांनी सांगितले.
15 टन डाळिंबांचे उत्पादन अपेक्षित
रासायनिक खतांना बगल देऊन उत्पादन घेतलेल्या डाळिंबाला मागणीदेखील जोरात आहे. पुण्यातील व्यापाऱ्यांनी ठोक शंभर रुपये प्रतिकिलो दराने खरेदी केली. यामुळे पहिल्या तोडणीतच पवार यांचा मजुरीसह फळबागेसाठी झालेला खर्च वसूल झाला. त्यानंतर होणा-या प्रत्येक तोडणीतून मिळणारे उत्पन्न नफा म्हणून मिळणार आहे. या बागेतून 15 टनांपर्यंत उत्पादन मिळेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
kartik zankar bharvir
डाळिंब =जमिनीची निवड ,लागवड,संगोपन ,डाळिंबाच्या वाणांची वैशिष्ठ्ये,डाळिंब कीड-रोग यांचे नियंत्रण,बहर व्यवस्थापन ,छाटणी , विद्राव्य खते, औषध फवारणी ,विविध हवामानातील काळजी, पाणी व्यवस्थापन, निर्यातीचे बारकावे या सर्व बाबींसाठी भेटा अथवा संपर्क साधा .डाळिंब तज्ञ -शशिकांत अहिरे सर यांना मो. नंबर .8055393399