भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यासारखा खोटारडा माणूस मी आजून पाहिलेला नाही. त्यांच्या खोटारडेपणाचे पुरावेच मी शोधून काढले आहेत.
मुंबई – भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यासारखा खोटारडा माणूस मी आजून पाहिलेला नाही. त्यांच्या खोटारडेपणाचे पुरावेच मी शोधून काढले आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीत मोदींनी जे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे, त्यात त्यांनी आपले वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपये दाखविले आहे.
दीड लाख वार्षिक उत्पन्न असणा-या मोदींना एका वेळी वापरण्यासाठी साठ हजार रुपये किमतीचा ड्रेस कसा परवडतो, असा खडा सवाल रविवारी उद्योगमंत्री नारायण राणे यांनी भांडुप येथील सभेत केला. जो माणूस प्रतिज्ञापत्रात खोटे बोलतो, तो माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो काय?, असे ठणकावून विचारत, ज्यांच्या मंत्र्यांना भ्रष्टाचार प्रकरणी शिक्षा होते त्या भाजप आणि शिवसेनेला भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार नाही, असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग हितवर्धक मंडळाच्या वतीने भांडुप येथे कोकणवासीयांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार डॉ. निलेश राणे, उत्तर-पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय पाटील, आमदार कालिदास कोळंबकर, माजी आमदार श्याम सावंत, राष्ट्रवादी मुंबईचे उपाध्यक्ष भास्कर विचारे, विलास माने, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे माजी महापौर शाहू सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. राजा सावंत आणि गणेश रहाटे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते.
या मेळाव्यात बोलताना नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या नेत्यांचा खरपूस समाचार घेताना नारायण राणे म्हणाले, भाजपचे लोक निवडणुका जाहीर होण्याआधीच सहा महिने पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करतात. खरे तर लोकशाहीत अशी कुठेही पद्धत नाही. लोकशाहीमध्ये आधी खासदार निवडून येतात आणि ते पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवितात. मात्र यांचा उमेदवार सहा महिने अगोदर ठरविला जातो.
निवडणुकीआधीच यांची पंतप्रधानपदाची स्पर्धा सुरू होते. सध्या मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केलेले असले तरी त्यांच्यात आधीच पंतप्रधानपदासाठी भांडणे लागलेली आहेत. लालकृष्ण अडवाणींना वाटते मी पंतप्रधान व्हावे, जेटलींना वाटते मी व्हावे, सुषमा स्वराज यांना वाटते मी व्हावे. जसवंत सिंह यांनाही वाटते मी व्हावे. बिचा-यांना तिकीटही नाही. अशा एक ना धड भाराभर चिंध्या असताना खोटय़ा प्रचारावर मोदी आपली हवा करण्याचा प्रयत्न करतात. गुजरातचा विकास? कसला गुजरातचा विकास? महाराष्ट्र आजही सर्व क्षेत्रांत आघाडीवर आहे.
रिझव्र्ह बँकेची आकडेवारी माझ्याकडे आहे. उद्योगमंत्री म्हणून मी ती मिळविली आहे. देशात जेवढी परकीय गुंतवणूक येते त्यातील महाराष्ट्रात २१ टक्के ही देशात सर्वात जास्त आहे. महाराष्ट्राचे स्थूल उत्पन्न गुजरातपेक्षा दुप्पट आहे. महाराष्ट्राचे १२ लाख कोटी आहे, तर त्यांचे ६ लाख कोटी आहे. दारिद्रय़रेषेखालील लोकांची संख्या कमी करण्याचे काम सर्वाधिक महाराष्ट्राने केले आहे. त्याच्यानंतर गुजरातचा नंबर आहे.
नवजात अर्भकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण महाराष्ट्रात फक्त १२ आहे, तर गुजरातमध्ये ४१ आहे. उद्योगात आम्ही पुढे, शिक्षणात आम्ही पुढे, आरोग्यात आम्ही पुढे, दारिद्रय़रेषेखालील लोकांची संख्या कमी करण्यात आम्ही पुढे आणि हे उगाच फुशारक्या मारतात. जसा काही हा एकटाच देशात लायक माणूस आहे.
महाराष्ट्रामधील पाच-दहा मंत्र्यांची तरी नावे लोकांना माहीत असतील. मोदी सोडून गुजरातच्या एका तरी मंत्र्यांचे नाव कुणाला माहीत आहे का हो? एकटे मोदी. एका मंत्र्यांचे नाव माहीत आहे. अमित शहा. ज्याच्यावर दोन-दोन हत्येचे गुन्हे दाखल आहेत. भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल आहेत. शिवसेनेवाले भ्रष्टाचारावर बोलतात त्यांच्या बबन घोलपला दोन दिवसांपूर्वी भ्रष्टाचार केला म्हणून तीन वर्षाची शिक्षा झाली. जे लोक आपल्या मंत्रिमंडळात भ्रष्ट मंत्र्यांना ठेवतात, त्यांना भष्टाचारावर बोलण्याचा अधिकार आहे काय, असा सवालही राणे यांनी केला.
गुजरातच्या बेगडी विकासाचा बुरखा फाडताना नारायण राणे म्हणाले, गुजरातचा विकास म्हणजे अमेरिकन कंपनीला १२ हजार कोटी रुपये देऊन केलेला खोटा प्रचार आहे. १२ हजार कोटी विकासासाठी खर्च करावे असे त्यांना वाटत नाही किंवा एखाद्या भारतीय कंपनीला द्यावे वाटत नाहीत. फक्त खोटय़ा बातम्या पसरवायच्या, भोळय़ाभाबडय़ा लोकांची दिशाभूल करायची, हेच काम मोदी करतात. मी मुद्दाम माहिती काढली.
मागच्या विधानसभा निवडणुकीत मोदींनी दाखल केलेले प्रतिज्ञापत्रच मी मिळविले आहे. कागदपत्रे काय फक्त किरीट सोमय्यालाच मिळतात काय? अरे आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त माहिती काढू शकतो. मोदींचे प्रतिज्ञापत्र मिळविले. वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपये. मला आश्चर्य वाटले. असे म्हणतात, मोदी कपडय़ांबाबत फार चौकस आहे. एकदा घातलेला ड्रेस परत घालत नाही. मी त्यांच्या ड्रेसची किंमत काढली. मुंबईत त्यांचा आणि माझा ड्रेस शिवणारा टेलर एकच आहे. त्यांचे अनेक असतील, परंतु त्यातील एकाकडे मीही कपडे शिवतो. त्याला विचारले, ‘अरे बाबा मोदी आपके पास कपडा सिलाता है कितना किमत होगा.’ तो म्हणाला, ‘फेटा सोडून ६० हजार. लेंगा, सदरा आणि फक्त जॅकेट’ आता मला सांगा ज्या माणसाचे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपये आहे, तो रोज ६० हजार रुपयांचा ड्रेस कसा काय घालू शकतो. दीड लाखात तीन ड्रेस येतील वर्षाला.
मग फक्त ड्रेस घालूनच फिरतो काय? वार्षिक उत्पन्नात फक्त कपडेच शिवत असेल तर खातो काय? जो माणूस प्रतिज्ञापत्रात खोटे बोलतो, तो माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो काय, असा खडा सवाल राणे यांनी विचारला. आता निवडणुकीला अर्ज भरताना पत्नीचे नाव घालावे लागते. याच्या प्रतिज्ञापत्रात पत्नीचे नावच नाही.
मग गांधीनगरमध्ये असणारी जी महिला म्हणते की, मी मोदींची पत्नी आहे. पंतप्रधानपदासाठी त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. ती कोण आहे? जो माणूस आपल्या पत्नीला सांभाळू शकत नाही, तो देशाला काय सांभाळणार, असा सवालही राणे यांनी केला.खोटे बोल पण रेटून बोल, अशी भाजपवाल्यांची सवय आहे. ते कधीही देशाचे कल्याण करू शकत नाहीत.
स्वातंत्र्यानंतर देशात खरा विकास कुणी केला असेल तर तो फक्त काँग्रेसनेच केलेला आहे, असे सांगून राणे म्हणाले की, गोरगरीब जनतेचा विचार फक्त काँग्रेसच करू शकते. देशातला एकही माणूस उपाशीपोटी झोपू नये म्हणून अन्न सुरक्षा योजना आणली, गोरगरिबांना मोफत उपचार मिळावेत म्हणून राजीव गांधी आरोग्य योजना आणली, मुलींना १४ वर्षापर्यंत मोफत शिक्षणाची सोय केली, हे काम फक्त काँग्रेसच करू शकते. म्हणूनच येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उमेदवारांनाच भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन राणे यांनी केले.
dada jaya vishyavar boltat te sampurn mahite getyalvarch. virodipaksh neta aaslay che vilache vichar mandale bhaga aani sanga .ikhada manus suparn maharashtracha talmalin vichar kartho.tho aaplay rahtya gharcha manjech aaplya SINDHUDURG JILYCHA kiti vichar karat aasale.Mag lokho Vichar kara Vikasha mahameru aaslelya vikas purshala matdan kara