‘दुनियादारी’, ‘असंभव’, ‘तू भेटशील नव्याने’, ‘लेक लाडकी या घरची’ यांसारख्या मालिका आणि ‘कुणी मुलगी देता का मुलगी?’ या चित्रपटांतून प्रेक्षकाच्या समोर आलेला आणखी एक पुणेरी चेहरा म्हणजे आशुतोष कुलकर्णी. सध्या तो ई टीव्हीवरच्या ‘गंध फुलांचा गेला सांगून’ या मालिकेत विश्वनाथ या नायकाच्या भूमिकेत आहे. अभिनयाचं वेड आशुतोषला मुंबईत घेऊन आलं. टीव्ही, चित्रपट यासारख्या माध्यमांनी प्रभावित होऊन या क्षेत्रात येण्याचं त्याने ठरवलं आणि आज तो ब-यापैकी लोकप्रिय झाला आहे.
‘लहानपणीच मला या माध्यमाने आकर्षित केलं. मी थिएटरमध्ये सिनेमा बघायचो किंवा टीव्हीवर मालिका बघायचो, त्यातले संवाद किंवा कथा मला खूप प्रभावित करायच्या, काहीतरी नवं शिकवून जायच्या. हळूहळू कळू लागलं की आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवायचे असतील तर अभिनयासारखं दुसरं क्षेत्र नाही कारण यात आपल्याला वेगवेगळी पात्र साकारता येतात, ती जगता येतात आणि त्या पात्रांमार्फत आपल्याला लोकांना खूप गोष्टी शिकवता येतात.’ हे विचार आहेत ई टीव्हीवर सुरू असलेल्या ‘गंध फुलांचा गेला सांगून’ या मालिकेमध्ये महत्त्वाची भूमिका करणा-या आशुतोष कुलकर्णी याचे. आशुतोषचा चेहरा या इंडस्ट्रीला तसा जुनाच आहे. आजपर्यंत अभिनयाच्या माध्यमातून त्याचे विविध चेहरे प्रेक्षकांसमोर आले, त्याच्या उत्तम अभिनयाचं दर्शन प्रेक्षकांना घडलं, पण खरा आशुतोष कसा आहे, कसा वागतो, या इंडस्ट्रीत तो कसा आला हे जाणून घेण्याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना असतेच. त्याच्याशी झालेल्या बोलण्यातून एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवते की, हा माणूस अत्यंत विचारी आहे. प्रत्येक गोष्टीला त्याचं स्वत:च असं एक लॉजिक असतं आणि त्या लॉजिकप्रमाणेच तो वागतो, एक एक शब्द विचार करून करून बोलतो.
सध्या तो ‘गंध फुलांचा गेला सांगून’ या मलिकेत नायकाच्या भूमिकेत आहे. त्यात तो कोल्हापूरच्या राजघराण्यात वाढलेल्या आणि व्यवसायाने इंजिनीअर असलेल्या विश्वनाथची भूमिका साकारत आहे. रानावनांत भटकणा-या अदिवासी तांडयातील महिमाबरोबर त्याचं सूत जुळतं. त्यांचं लग्नही होतं. सध्या मालिकेमध्ये वेगळंच वळण आलं आहे. महिमाच्या मेकओव्हरनंतर मालिका बरीच चर्चेत आलीय. आता विश्वनाथचा अपघात होऊन त्याला स्मृतिभ्रंश होतो आणि तो त्याच्या बायकोला म्हणजेच महिमाला पूर्णपणे विसरतो, असा ट्रॅक दाखवण्यात आला आहे. या ट्रॅकच्या निमित्ताने मालिका आणि त्याचा अभिनय पुन्हा चर्चेत आला.
मालिकेत महिमा त्याला ‘इंजिन’ या नावाने हाक मारते. इंजिन हे त्याचं जवळजवळ दुसरं नाव पडलं आहे. अशा या इंजिनाच्या म्हणजेच आशुतोषच्या प्रवासाला सुरुवात झाली सहा-सात वर्षापूर्वी. आशुतोष मूळचा पुण्याचा. शाळेत असल्यापासूनच कथाकथन, वक्तृत्वस्पर्धात त्याचा सहभाग असायचा आणि या निमित्ताने अभिनयाची आवड त्याच्यात येत गेली. पुढे मालिकांतील संवाद, कथा यांची मोहिनी त्याला पडू लागली. लोकांपर्यंत एखादी गोष्ट पोहोचवायची असेल तर अभिनयासारखं दुसरं माध्यम नाही हे त्याला कळलं आणि या क्षेत्रात उडी टाकायची त्याने ठरवली. तो म्हणतो, ‘मला खरं तर शास्त्रज्ञ व्हायचं, संशोधन करायचं होतं पण ते काही जमलं नाही. मग ठरवलं अभिनय करणं किंवा अभिनेता होणं हेदेखील शास्त्रज्ञासारखंच आहे. कारण इथेसुद्धा एखादं पात्र रेखाटताना त्याचा अभ्यास करावा लागतो आणि काही पात्रांच्या बाबतीत संशोधनही. एक स्वप्न पूर्ण नाही झालं, पण हे स्वप्न मी नक्कीच पूर्ण केलं.’
आशुतोषने मालिकांत काम करण्याआधी रंगभूमीही अनुभवली. राज्य नाटय़स्पर्धात त्याचा सहभाग असायचा. स्पर्धाच्या वेळी केवळ अभिनय शिकण्यापेक्षा दिग्दर्शन, प्रकाशयोजनेचं तंत्रही त्याने आत्मसात केलं आहे. पुण्याच्या ‘पुरुषोत्तम करंडकमध्ये’ त्याला उत्तम अभिनयासाठी नावाजलं गेलं होतं. तेव्हापासूनच त्याच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. ‘असंभव’, ‘दुनियादारी’ यांसारख्या मालिकातून त्याला खरी ओळख मिळाली. खरं तर तेव्हा तो महाविद्यालयीन विद्यार्थी होता तेव्हाच त्याला छोटया पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली. सुरुवातीच्या काळातला अनुभव सांगताना तो म्हणत होता की, ‘मालिकेचं शूटिंग चालू होतं. दिग्दर्शकाने सांगितलं तसं कामही केलं आणि संवादही म्हटले. माझ्या दृष्टीने माझं काम उत्तम झालं होतं. पण दिग्दर्शक पुन्हा पुन्हा टेक देण्यास सांगत होता. मला काहीच कळत नव्हतं. मग चूक कळली मी फ्रेममध्ये दिसत नव्हतो. नाटकात स्टेजवर खूप जागा असायची, त्यामुळे स्टेजचा पुरेपूर वापर करण्याची मुभा तेथे असायची. मालिकांचं शूट करताना तसं नसतं तुम्हाला शक्यतो एका जागेवर आणि एका फ्रेममध्ये उभं राहून संवाद बोलायचे असतात हा अनुभव मला त्या दिवशी पहिल्यांदा आला.’
इतक्या कमी वयात पडद्यावर झळकण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण झालं, लोक त्याला ओळखू लागले पण या प्रसिद्धीच्या लाटेत वाहून तो गेला नाही. या बाबतीतले त्याचे विचारही ऐकण्यासारखे आहेत. तो म्हणतो, ‘जेव्हा आपण पडद्यावर झळकतो, लोक आपल्याला ओळखू लागतात, स्तुती करतात, प्रेक्षकांना तुमचं काम आवडू लागतं, हे एका अभिनेत्यासाठी फार सुखद असतं. मात्र नंतर नंतर आपण खूप वेगळे पडायला लागतो. लोकांचा, तुमच्या जवळच्यांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. कॉलेजमध्ये जायचो तेव्हाही तसंच व्हायचं. त्यामुळे सुरुवातीला आनंददायी वाटणारा हा अनुभव नंतर मात्र मला एकटं पाडू लागला.’
विश्वनाथचं पात्र साकारताना त्याने घडलेला एक भन्नाट किस्सा सांगितला. तो म्हणाला की, ‘मालिकेत मी कोल्हापूरच्या राजघराण्यातला मुलगा साकारला आहे, एके दिवशी माझ्या फेसबुकवर माझ्या बाबांना तुम्हाला भेटायचं आहे, असा एका मुलीचा मला मेसेज आला. मला सुरुवातीला वाटलं की, कोणीतरी माझी मस्करी करत आहे. म्हणून मी दुर्लक्ष केलं, पण ती मुलगी मला मेसेज करत राहिली. तिला असं खरंच वाटत होतं की मी कोणीतरी राजघराण्यात जन्माला आलेलो आहे वगैरे वगैरे. तिचा तो मेसेज माझ्याकडे एक स्थळ म्हणून पाहणारा होता. मी एक साधा माणूस आहे आणि मी अभिनय करतो हे मी तिला समजावलं, पण तिचा काही विश्वास बसेना. शेवटी कशीबशी तिची समजूत काढली.’ सध्या टीव्हीवर त्याची मालिका बरीच चर्चेत आहे. लवकरच मोठया पडद्यावरही झळकणार आहे. सध्या तो एखादं चांगलं कथानक व चित्रपटाच्या शोधात तो आहे.