अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होत असून, मिट रोमनी आणि बराक ओबामा यांच्यामध्ये काट्याची टक्कर होणार आहे. दोन्ही उमेदवारांनी वेगवेगळ्या प्रकारची आश्वासने द्यायला सुरुवात केली आहे. आपला विजय झाला तर भारताशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून चीनला कोंडीत पकडता येईल, असे रोमनी यांनी सांगितले आहे. त्यांची ही भूमिका सामरिकदृष्टय़ा भारताच्या फायद्याची ठरेल. ओबामा हे आऊटसोर्सिगच्या विरोधात तर रोमनी हे त्याचे समर्थन करणारे आहेत. त्यामुळे रोमनी विजयी झाले तर आऊटसोर्सिग वाढून ते भारताच्या दृष्टीने हितावह ठरेल.
आर्थिक महासत्ता असणा-या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका सध्या जगभर चर्चेचा विषय ठरल्या आहेत. नोव्हेंबरमध्ये होणा-या या निवडणुकांकडे सा-या जगाचे लक्ष लागले आहे. रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार मिट रोमनी आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यातच ही सरळ लढत होणार आहे. लोकप्रियतेच्या बाबतीत बराक ओबामा ओमनी यांच्यापेक्षा कितीतरी पुढे आहेत. एनबीसी आणि वॉल स्ट्रीट जर्नल यांच्या वतीने अलीकडेच एक सर्वेक्षण करण्यात आले. ओबामा हेच अर्थव्यवस्थेत सुधारणा करू शकतात, असे 36 टक्के अमेरिकन नागरिकांना वाटते, असे या सर्वेक्षणानंतर नमूद करण्यात आले आहे. याउलट आपला देश चुकीच्या मार्गाने चालला आहे, असे सहा टक्के लोकांना वाटते. असो! सध्या या निवडणुकांच्या प्रचारात चांगलाच रंग भरला आहे. ओबामा यांनी या निवडणुकीत आपलाच विजय होणार याविषयी विश्वास व्यक्त केला आहे. ओबामा यांनी निवडणुकीच्या प्रचारात मंदीचे वातावरण असूनही पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. राष्ट्राध्यक्षपदी निवडून यायचेच या इराद्याने ओबामा यांच्या पक्षाने टीव्हीवर दिलेल्या जाहिरातींसाठी 10 कोटी डॉलर खर्च केले आहेत. रोमनी यांच्याकडून ओबामा यांच्यावर वारंवार शाब्दिक हल्ले होत आहेत. त्यामुळे निर्माण झालेली नकारात्मक प्रतिमा सुधारण्यासाठी आता ओबामा यांनी जाहिरातींचा आसरा घेतला आहे. रोमनी आणि ओबामा यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारची आश्वासने आणि परस्परांना आव्हाने देण्यात येत आहेत. आपला विजय झाला तर भारताशी मैत्री वाढवून चीनची कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे मिट रोमनी यांनी म्हटले आहे. पण अमेरिकन जनतेसाठी ते त्रासदायक ठरेल. अमेरिकन जनता सध्या ग्लोबल आर्थिक संकटाने त्रस्त आहे. राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्याकडे कोणतीही ठोस धोरणे त्यासाठी नाहीत. त्याचप्रमाणे त्यांची धोरणे भारतासाठी लाभदायक ठरणार नाहीत. अशा परिस्थितीत हे दोन्ही उमेदवार अमेरिकन जनतेसाठी अनुत्तीर्ण ठरतील.
या दोघा उमेदवारांमध्ये मूलभूत फरक आहे. ओबामा हे आऊटसोर्सिगचे कडवे विरोधक आहेत. त्याउलट रोमनी हे आऊटसोर्सिगच्या बाजूने आहेत. त्यामुळे ते नेहमी त्याचे समर्थन करत असतात. आऊटसोर्सिगच्या विरोधामुळे भारतासारख्या विकसनशील देशांवर त्याचा परिणाम होईल. व्यापक दृष्टीने पाहिले तर दोन्ही उमेदवारांची ही धोरणे अमेरिकेच्या हिताच्या दृष्टीनेही फलदायी ठरणारी नाहीत. ओबामा विजयी झाले आणि त्यांनी आपली धोरणे राबवायला सुरुवात केली, तर आऊटसोर्सिगचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे अमेरिकन कंपन्यांना देशांतर्गत जास्त पैसे देऊन श्रमिक वर्गाकडून काम करून घ्यावे लागेल. अर्थातच ते त्यांच्यासाठी हानिकारक ठरेल. त्यामुळे रोजगारही कमी होईल. रोमनी यांचा विजय झाला आणि आपली धोरणे राबवण्यात ते यशस्वी झाले तर आऊटसोर्सिगचे प्रमाण वाढवण्यात येईल. त्यामुळे देशांतर्गत कंपन्यांना फायदा होईल. पण सामान्य जनतेचे मात्र नुकसान होईल. ओबामांची धोरणे लक्षात घेतली तर त्यांच्या अशा प्रकारच्या दृष्टिकोनामुळे अल्पकालीन दिलासा मिळेल तर रोमनी यांच्या दृष्टिकोनामुळे दीर्घकालीन दिलासा मिळू शकतो.
शैक्षणिक व्यवस्था हा दोघांमधील दुसरा महत्त्वाचा फरक आहे. ओबामा प्राथमिक शिक्षणाच्या सुधारणांना प्राधान्य देणारे आहेत, तर रोमनी संशोधनातील गुंतवणुकीला. करप्रणाली हा दोघांमधील तिसरा फरक आहे. माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी आपल्या कार्यकाळात जागतिक आर्थिक मंदीतून मार्ग काढण्यासाठी सर्व अमेरिकन नागरिकांना आयकरात सूट दिली होती. दर वर्षाला 2,50,000 डॉलर कमावणा-या व्यक्तींना अशा प्रकारची सवलत देण्यात येऊ नये, अशी ओबामांची इच्छा आहे. पण रोमनी यांच्या म्हणण्यानुसार श्रीमंत-गरीब या सर्वावरील आयकराचा बोजा हटवला पाहिजे. कार्यरत लोकांनी उत्पन्नाचा एक भाग भविष्यातील बेरोजगारीचा सामना करण्यासाठी जमा केला पाहिजे. ही व्यवस्था भारतातील भविष्य निर्वाह निधीसारखी असेल. यामुळे सरकारी खर्चावरील दबाव कमी होईल.
येथेही संकट दिसून येते. ओबामा यांच्या मतानुसार श्रीमंतांना टॅक्समध्ये दिली जाणारी सवलत समाप्त करणे उचित आहे. परंतु रोमनी यांच्याकडे सामान्य माणसाला दिलासा देणारे कोणतेही धोरण नसले तरी अर्थशास्त्राच्या दृष्टीने रोमनी यांची पॉलिसी जास्त उपयोगी ठरण्याची शक्यता आहे. आऊटसोर्सिगमुळे अमेरिकन कंपन्या जीवित राहतील. बेरोजगारी भत्ता समाप्त केल्यामुळे सरकारवरील वित्तीय बोजात घट होऊ शकेल. संशोधनात गुंतवणूक केल्यामुळे अमेरिकेला पुन्हा पूर्वीचे दिवस प्राप्त होऊ शकतील. पण रोमनी यांच्या पॉलिसीमुळे अमेरिकन नागरिकांचे रोजगार भारतात आऊटसोर्स होतील. त्याचप्रमाणे बेरोजगारी भत्त्याचा दिलासा समाप्त होईल.
सामरिकदृष्टीने ओबामा यांचा कल स्पष्टपणे चीन आणि पाकिस्तानकडे आहे. रोमनी यांची भूमिका चीनविषयी कठोर आणि भारताविषयी काहीशी मृदू आहे. त्यांनी चिनी कंपन्यांद्वारा चीनच्या सरकारच्या समर्थनाने होत असलेल्या व्यापक पेटंटीकृत तंत्रज्ञानाच्या चोरीचा विरोध केला आहे. हा मुद्दा ते जागतिक व्यापार संघटनेत उपस्थित करणार आहेत. भारतासह इंडोनेशियाशी आपल्याला मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायचे आहेत, असे रोमनी जाहीरपणे सांगत आहेत. या देशांच्या मदतीने त्यांना चीनला कोंडीत पकडायचे आहे. त्यामुळे सामरिकदृष्टय़ा रोमनी हे भारतासाठी फलदायी ठरतील. अमेरिकेतील बहुतांश भारतीय ओबामा यांच्या बाजूने आहेत. ओबामा सर्वसामान्यांच्या कल्याणाविषयी अधिक संवेदनशील आहेत, असे त्यांना वाटते. तथापि, ओबामा यांची पॉलिसी वर उल्लेख केल्याप्रमाणे नकारात्मक आहे.
अमेरिकेच्या मूलभूत समस्यांविषयी दोघांकडेही ठोस उत्तर नाही. सध्याच्या स्थितीत अमेरिकेची अवस्था कर्ज घ्या आणि तूप सेवन करा, अशी झाली आहे. अमेरिकी सरकारकडून प्रतिवर्षी सुमारे 1,500 अब्ज डॉलर कर्ज घेण्यात येत आहे. अमेरिकी सरकारवर आतापर्यंत 15,000 अब्ज डॉलरचे कर्जाचे ओझे आहे. ही रक्कम अमेरिकेच्या वार्षिक उत्पन्नापेक्षा जास्त आहे. त्यातून भावी संकटे लक्षात येऊ शकतात. अमेरिकेने मोठ्या प्रमाणावर कर्ज घेऊ बेरोजगारी भत्ता देऊ केला आहे किंवा युद्धे केली आहेत. त्यातून मार्ग कसा काढायचा, याची उत्तरे भावी राष्ट्राध्यक्षपदाच्या दोन्ही उमेदवारांकडे नाहीत.
सध्या अमेरिका मोठ्या संकटात आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत त्या देशाच्या नागरिकांची उच्च जीवनशैली टिकू शकत नाही. दोघेही उमेदवार हे वास्तव जनतेपासून लपवण्याच्या प्रयत्नात आहेत. तरीही ओबामा संवेदनशील आहेत तर त्यांच्या तुलनेत रोमनी स्पष्ट आहेत. सर्वसामान्यांच्या जीवनशैलीत होणारी घट स्वीकारण्याचे आवाहन ते करत आहेत. पण त्यांच्याकडून या समस्या सोडवण्यासाठी कोणतीही पॉलिसी अवलंबण्यात येत नाही. ओबामांचा विजय झाला तर अल्पकाळात बेरोजगारी भत्त्यात दिलासा आणि दीर्घकाळासाठी कर्जाचे संकट दिसत आहे. रोमनी यांचा विजय झाला तर सर्वसामान्य माणसांसाठी तत्काळ संकट आणि दीर्घकाळाने फायदा होऊ शकतो. एकूणच दोन्ही उमेदवार धोरणांच्या दृष्टीने अपयशीच ठरणार आहेत.