उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये आघाडी झाल्यास भाजपा २०१९ मध्ये लोकसभेची निवडणूक जिंकू शकत नाही, असे भाकित काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वर्तविले आहे.
लंडन- उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये आघाडी झाल्यास भाजपा २०१९ मध्ये लोकसभेची निवडणूक जिंकू शकत नाही. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी-बहुजन समाज पार्टीमध्ये आघाडी झाली आणि तशीच आघाडी बिहारमध्ये आकाराला आली तर भाजपाला १२० जागांवर फटका बसेल असे भाकित काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वर्तविले आहे. लंडनच्या स्ट्रॅटजिक स्टडीज इन्स्टिट्यूटमध्ये बोलताना शुक्रवारी त्यांनी हे विधान केले.
सर्जिकल स्ट्राईक लष्करानेच केला त्यात काही दुमत नाही असे राहुल गांधी म्हणाले. आसाममध्ये एनआरसीची सुरुवात आम्हीच केली. ती आमचीच कल्पना होती. एनआरसीची अंमलबजावणी कशी करायची हा कळीचा मुद्दा आहे. एनआरसीच्या यादीत समावेश न केलेल्या भारतीयांची संख्या मोठी आहे असे ते म्हणाले. व्यावसायिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भरपूर अपेक्षा होत्या. पण त्यांची निराशा झाली असून आम्हाला पाठिंबा द्यायची त्यांची इच्छा आहे. भारतीय व्यावसायिकांवर सीबीआय आणि ईडीचा मोठा दबाव आहे असे राहुल गांधी म्हणाले.
भारतातल्या दिग्गजांनी ज्या संस्थांची गेल्या काही दशकांमध्ये उभारणी केली आहे, त्या संस्थांवर आज हल्ले होत असल्याचे गांधी म्हणाले. पाश्चिमात्य देशांचा १९४७ मध्ये भारत स्वतंत्र देश म्हणून उभा राहू शकतो यावर विश्वास नव्हता, परंतु भारताने पाश्चात्य देशांना चुकीचे ठरवले आहे. हजारो लोकांनी संस्था उभ्या केल्या ज्यामुळे भारताची उभारणी झाली. आज या संस्थांवरच आघात होत आहेत, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
आरएसएसचे मुस्लीम ब्रदरवुडशी साम्य
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारताचा आत्मा बदलायला निघाले असून अन्य कुठल्याही संघटनांनी भारतातल्या संस्थांवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला नसल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी केला आहे. मुस्लीम ब्रदरहूड या अनेक अरब देशांनी दहशतवादी म्हणून जाहीर केलेल्या संघटनेशी गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना केली. मुस्लीम ब्रदरवुडच्या संकल्पनेशी आरएसएसची संकल्पना मिळतीजुळती असल्याचा आरोप यावेळी गांधी यांनी केला आहे.