पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना दिली जाणारी निधीची रक्कम १ लाखांहून किमान १० लाख करावी, अशी मागणी सहाय्यक आयुक्तांकडून होत आहे.
मुंबई- आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्यांना पालिकेकडून मदतीचा हात दिला जातो. मात्र दिला जाणारा मदतीचा हात तोकडा असून एकावेळी हजारो लोकांना मदत करण्याची वेळ आल्यास १ लाख रुपयांचा निधी काहीच कामाचा नाही. त्यामुळे पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना दिली जाणारी निधीची रक्कम १ लाखांहून किमान १० लाख करावी, अशी मागणी सहाय्यक आयुक्तांकडून होत आहे.
मुंबई महापालिकेच्या अंतर्गत २४ विभागीय कार्यालये असून पालिकेच्या माध्यमातून करदात्या मुंबईकरांना सुविधा पुरवल्या जातात. तसेच मुंबईत कुठलीही आपत्कालीन स्थिती ओढावल्यास मदतीसाठी पालिकेच्या विविध विभागांतील कर्मचारी धाव घेतात.
आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्यांना पालिकेतर्फे सर्व प्रकारची मदत केली जाते. विभागीय कार्यालयाकडून सहाय्यक आयुक्तांकडे पावसाळा सुरू होण्यापूर्वी १ लाख रुपये दिले जातात. मुंबईत ढगफुटी होऊन पूरस्थिती निर्माण झाल्यास पालिका प्रशासनातर्फे निवारा, खाद्यपदार्थ याची व्यवस्था केली जाते.
मात्र एका प्रभागातील लोकसंख्या ही दोन लाखांच्या घरात असते. काही आपत्कालीन स्थिती ओढावल्यास सहाय्यक आयुक्तांना १ लाख रुपये निधी अपुरा पडू शकतो. त्यामुळे हा आपत्कालीन निधी किमान १० लाख रुपये करावा, अशी मागणी विभाग कार्यालयातून जोर धरू लागली आहे.
आपत्कालीन स्थितीत उपायुक्तांकडून निधी उपलब्ध केला जातो. मात्र हा निधी वेळेत उपलब्ध होईल, असे नाही. त्यामुळे सहाय्यक आयुक्त निधी १० लाख रुपये करावा, अशी मागणी सहाय्यक आयुक्तांकडून होत आहे.