उत्तर भारतातील अनेक राज्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे.
नवी दिल्ली – उत्तर भारतातील अनेक राज्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. एकट्या पश्चिम बंगाल राज्यात रविवारपर्यंत वीज पडणे, भिंत कोसळण्यांच्या घटनांमध्ये ५० जणांचा मृत्यू झाला तर ओदिशा राज्यात पाच जणांचा मृत्यू झाला.
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा कहर सुरु आहे. राज्यातील १२ जिल्ह्यातील ३६ लाखाहून अधिक नागरिकांना मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. राज्यातील अनेक नद्यांनी धोक्यांची पातळी ओलांडली आहे. यामुळे धरणातून पाणी सोडण्यात येत असून अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
उत्तर आणि पूर्व २४ परागणा, मुर्शिदाबाद, बरदवान, हावडा यांसारख्या अनेक जिल्ह्यांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी इमारती कोसळल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. मच्छिमारांनाही समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. सुमारे दोन लाख घरे तसेच चार लाख ७२ हजार ६४५ हेक्टर शेतीचे पावसामुळे नुकसान झाले आहे. दोन लाख नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
आसाम, मेघालय, नागालँड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम या राज्यांमध्ये शनिवारी आणि रविवारी पाऊस झाला. पुढील काही दिवस आसाम, मेघालय आणि अरुणाचलमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.