एक ऑक्टोबर १९९३ रोजी लातूर-उस्मानाबाद येथे झालेल्या भूकंपाने महाराष्ट्राला पहिल्यांदा आपत्ती व्यवस्थापनाचं महत्त्व पटवून दिलं. या भूकंपाला आता वीस वर्ष होत असताना मनात उमटणारा प्रश्न असा की, आपत्ती व्यवस्थापन हा प्रकार आजही आपल्या किती अंगवळणी पडला आहे?
३० सप्टेंबर १९९३. अनंत चतुर्दशीला गणरायाला निरोप देऊन थकलेली माणसं रात्री निवांत झोपली होती. त्याच वेळी आक्रित घडलं. मराठवाडयातल्या लातूर, उस्मानाबादची जमीन त्या रात्री, खरं तर पहाटेच्या सुमारास अचानक हादरायला लागली आणि तिथली घरं पटापट जमीनदोस्त व्हायला लागली. त्यांच्या खाली सापडून माणसं जीवानीशी जाऊ लागली. काय होतंय ते कुणाला काही कळतच नव्हतं. वाचायचीही संधी मिळत नव्हती. काही तासांत लातूर-उस्मानाबादच्या गावागावात मसणअवकळा पसरली होती. जिकडे तिकडे मृतदेह पडलेले दिसत होते. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं होतं. दुस-या दिवशी सकाळी ही बातमी सगळ्या महाराष्ट्राला कळल्यावर हलकल्लोळ झाला. कारण पानशेतच्या पुरानंतर महाराष्ट्रावर एवढी मोठी नैसर्गिक आपत्ती कधीच कोसळली नव्हती.
लातूर-उस्मानाबादेत झालेल्या या भूकंपाला यंदा एक ऑक्टोबरला वीस र्वष होतील. या भूकंपातून लातूर-उस्मानाबादकर सावरूनही बरीच र्वष झाली असतील. भूकंपाने त्यांच्या मनावर केलेली जखमही एव्हाना बरी झालेली असेल. इथे नंतर जन्माला आलेल्या एका नव्या पिढीला तर या उत्पाताची काहीच कल्पना नसेल. तरीही ज्यांनी हा भूकंप अनुभवलेला आहे, त्यांच्या मनावर जखमेची खपली मात्र निश्चित उरली असेल. कारण या भूकंपात त्यांना त्यांचं सर्वस्व गमवावं लागलं होतं.
भूकंप झाल्यावर काही दिवसांनी लातूर-उस्मानाबादमध्ये फिरताना पाहिलेली दृश्यं हादरवणारी होती. ती आजही डोळ्यांसमोर तरळतात तेव्हा मनाचा थरकाप उडवतात. भूकंपाचा सगळ्यात मोठा हादरा बसला होता तो लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील किल्लारी आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील सास्तूरला. बारा-पंधरा हजार लोकवस्तीची ही बाजारपेठेची गावं भूकंपाने अक्षरश: उद्ध्वस्त केली होती. गावांतली सगळी दगडी घरं जमीनदोस्त झालेली. त्यांचा जणू ढीग झालेला. गावभर मृतदेह पडलेले.. पुरुषांचे, महिलांचे, लहान मुलांचे.. सगळीकडे दु:ख, हताशा, निराशा यांनी भरलेलं वातावरण. प्रत्येक घरातलं कुणी ना कुणी गेलेलं.. काही घरांतली दहा-बारा-चौदा माणसं गेलेली.. जे वाचले होते त्यांच्या डोळ्यांतही हा मसणवटा पाहायला मी कशाला मागे उरलो, असा आक्रोश स्पष्ट दिसत होता. किल्लारी-सास्तूरच नव्हे तर मंगरूळ, पेट सांगवी, होळी, तळणी, कवठा, एकोंडी, रांजगाव, चिंचोळी, सालगाव अशा आजूबाजूच्या सगळ्याच गावांत हे दृश्य पाहायला मिळत होतं. केवळ गावाचं नाव वेगळं, एरवी भूकंपाचा उत्पात सगळीकडे सारखा..
लातूर-उस्मानाबादच्या या भूकंपाने नेमके किती बळी घेतले, याचा आकडा आजही वेगवेगळा सांगितला जातो. महाराष्ट्र सरकारच्या लातूर जिल्ह्याच्या वेबसाइटवर मृतांचा आकडा ७९२८ इतका आहे, तर काही जण या भूकंपात दहा हजारहून अधिक मृत्युमुखी पडले, असा दावा करतात. त्या वेळी मुंबईच्या सायंदैनिकांनी तर चढाओढीने चढवत हा आकडा पन्नास हजारांच्या वर पोहोचवला होता. अर्थात, सरकारी आकडयांवर विश्वास ठेवला तरीही या भूकंपाने केलेल्या हाहाकाराची तीव्रता कमी होत नाही. या भागात भूकंप होईपर्यंत कोयना धरणाचा भाग भूकंपप्रवण मानला जात होता. लहानमोठे भूकंपांचे धक्के तिथे सतत बसत असतात. परंतु भूकंपाचा केंद्रबिंदू मराठवाडयात सरकला तेव्हा त्याने भयंकर उत्पात घडवला. भूकंपाच्या बाबतीत, तो रिश्टर स्केलवर जेवढा असतो त्यापेक्षा त्याने किती प्राणहानी केली त्याचा आकडा अधिक भीतिदायक असतो.
भूकंपानंतर इथे फिरताना एका गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं की, या भागातलं एकही झाड भूकंपाने उन्मळून पडलं नव्हतं, की एकही विजेचा खांब वाकला नव्हता, पण मजबूत दगडी भिंती असलेली घरं मात्र पूर्णपणे ढासळली होती. या जाडजूड भिंतीच घरात राहणा-यांच्या जीवावर उठल्या होत्या?
या भूकंपानंतर असं म्हटलं गेलं की, किल्लारी परिसरात त्याच्याआधीही काही दिवस भूकंपाचे लहान लहान धक्के बसत होते. या धोक्याकडे ना सरकारने लक्ष दिलं ना गावक-यांनी तो ओळखला. कुणी म्हटलं की, इथल्या तेरणा नदीवर बांधण्यात आलेल्या माकणी धरणामुळे हा भूकंप झाला. थोडक्यात, कोयनानगरच्या बाबतीत जी थिअरी वापरली जाते तीच इथे लागू करण्यात आली होती.
पण अशा काही थिअरीजशी इथल्या लोकांचं काही देणंघेणं नव्हतं. भूकंप होण्याच्या आधी त्या कुणी मांडल्या असत्या तरी त्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं नसतं. कारण मृत्यू असा अवचित येईल, याची कल्पना कुणीही करणार नाही.
भूकंपानंतर सरकारने तातडीने पावलं उचलत मदत आणि पुनर्वसनाचं काम हाती घेतलं. भूकंपात उद्ध्वस्त झालेल्या गावांपासून काही अंतरावर नवी गावं वसवण्यात आली. नकाशावरचं स्थान बदललेली ही गावं गावक-यांनी स्वीकारली. त्यांच्यापुढे दुसरा पर्यायच नव्हता. हळूहळू व्यवहार सुरू झाले.. गावाचे आणि त्यांच्या जगण्याचे. तशा मग भूकंपाच्या आठवणीही मागे सरल्या. घडलं ते प्राक्तन होतं, असं समजून गावक-यांनी आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. वीस वर्षात ती सुरळीत झालीत, पण या घटनेवरून आपण काय धडा घेतला, हा प्रश्न एवढया वर्षानीसुद्धा सतावणाराच राहिला.
नैसर्गिक आपत्तीचं भाकीत करता येत नाही, असं म्हणतात. त्यातही भूकंपासारख्या आपत्तीचं तर नाहीच. निसर्गापुढे माणूस पालापाचोळा, हे एका अर्थाने खरंच आहे. निसर्गाची जेव्हा लहर फिरते तेव्हा तो खरंच माणसाचा पालापाचोळा करून टाकतो. त्या वेळी आपल्या हातात काहीच उरत नाही, मग त्यातून बोध तरी काय घ्यायचा?
इथे एक प्रश्न सहज मनात येतो तो असा की, एखादी नैसर्गिक आपत्ती थोपवता आली नाही तरी आपत्ती व्यवस्थापन तर माणसाच्या हाती असू शकतं. आपत्तीनंतर वेळीच संपर्क साधला जाणं, वेळीच मदत मिळणं, वेळीच लोकांची सुटका करणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. या आपत्ती व्यवस्थापनाची जाणीव महाराष्ट्राला सर्वप्रथम १९९३च्या भूकंपानेच करून दिली. कारण त्यानंतरच या विषयाची चर्चा सुरू झाली. १९९६मध्ये महाराष्ट्र सरकारने आपली आपत्ती व्यवस्थापन योजनाही तयार केली. आज देश, राज्य, जिल्हा, महानगर अशा सगळ्या पातळ्यांवर आपत्ती व्यवस्थापन योजना आहे. पण आपल्या देशातल्या कुठल्याही चांगल्या योजनेप्रमाणे आपत्ती व्यवस्थापनाचीही गत झाली आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील भूकंप असो, तामिळनाडूमधील त्सुनामी असो, की उत्तराखंडमधील जलप्रलय असो, सगळीकडे निसर्ग आपलं रौद्र रूप अधिकाधिक अक्राळविक्राळ करून दाखवतो.
आपली ‘मॅनेजमेंट’ कशी ‘डिझास्ट्रस’ असते, याचं उदाहरण द्यायचं तर मुंबईतील अतिवृष्टीचं उदाहरण द्यावं लागेल. मुंबईत आपत्ती व्यवस्थापन योजना तयार झाल्यावर घेण्यात आलेल्या या विषयावरील एका आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात, अतिवृष्टी झाली तर काय उपाययोजना करायची, सगळ्या यंत्रणांमध्ये समन्वय कसा साधायचा, पूरग्रस्तांना कसं हलवायचं, त्यासाठी साधनसामग्री कशी पुरवायची, संदेश दळणवळण यंत्रणा कशी राबवायची, सार्वजनिक वाहतूक सेवा कशी चालवायची, पूरग्रस्तांच्या राहण्याची सोय कुठे करायची, माहिती कशी प्रसारित करायची याचं अत्यंत सुंदर प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं होतं. प्रत्यक्षात हे आपत्ती व्यवस्थापन २६ जुलै २००५मध्ये मुंबईत अतिवृष्टी झाली, तेव्हा हे कागदावर देखणं असलेलं आपत्ती व्यवस्थापन त्यात वाहून कसं गेलं हे सगळ्यांनी पाहिलं. अर्थात, आपत्ती व्यवस्थापनात सरकारपासून नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच आपापली भूमिका बजावायची असते.
गेल्या वीस वर्षात तंत्रज्ञान-दळणवळण क्षेत्रांत जी मोठी क्रांती झालीय, तिची खूप मदत आपत्ती व्यवस्थापनाला होऊ शकते. आपत्ती व्यवस्थापनाने कुठलीही नैसर्गिक आपत्ती टाळता येणार नसली तरी होणारी हानी निश्चित कमी होऊ शकते. नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्याचा तोच परिणामकारक मार्ग असू शकतो. महाराष्ट्राला आपत्ती व्यवस्थापनाचं महत्त्व पटवून देणा-या लातूर-उस्मानाबादच्या त्या भूकंपाला वीस र्वष होत असताना हा एवढा धडा शिकायला काय हरकत आहे?