रुळालगत होणा-या अनधिकृत बांधकामांमुळे रेल्वेला नवे प्रकल्प उभारण्यात नाना अडचणी निर्माण येत आहेत.
मुंबई- रुळालगत होणा-या अनधिकृत बांधकामांमुळे रेल्वेला नवे प्रकल्प उभारण्यात नाना अडचणी निर्माण येत आहेत. त्यात रुळालगत उभारलेल्या झोपडयांतून फेकलेल्या कच-याने सोमवारी हार्बर मार्गावरील वाहतूक रखडली.
वडाळयाजवळ मालगाडीच्या मार्गावर मोठया प्रमाणात कचरा फेकण्यात आल्याने लोको पायलटला रूळ दिसेनासा झाला. त्यामुळे मालगाडी सुमारे दीड तास खोळंबली. सकाळी ऐन गर्दीच्या वेळी हार्बर मार्गावरील वाहतुकीचा बो-या वाजल्याने या मार्गावर ‘चक्का जाम’ झाल्याची परिस्थिती निर्माण झाली होती.
सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास कोळशाची वाहतूक करणा-या मालगाडीतील लोको पायलटला वडाळा बीपीटी व रावळी जंक्शन दरम्यान रुळावर फेकलेल्या कच-यामुळे रूळ दिसेनासे झाले. त्यामुळे गाडी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला या गाडीला ५९ डबे असल्याने या गाडीचे काही डबे हार्बर रेल्वेच्या मार्गावर आले होते.
पहाटेच्या सुमारास अंधार असल्याने रुळालगतचा कचरा हटवण्यास अडचणी येत होत्या. अखेर ६.३० च्या सुमारास कचरा हटवल्यानंतर गाडयांची वाहतूक सुरू करण्यात आली. ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या खोळंब्यामुळे दहा लोकल रद्द करण्याची नामुष्की मध्य रेल्वे प्रशासनावर ओढवली आहे.
जुन्या लोकलसह उशिराने रडतखडत धावणा-या हार्बर मार्गावर कायमच तांत्रिक बिघाड होत असल्याने प्रवाशांची डोकेदुखी कायम आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे रेल्वेच्या हद्दीत उभ्या राहिलेल्या झोपडयांचा त्रास आता प्रवाशांना सहन करावा लागत आहे. या अनधिकृत झोपडयांमधून मोठया प्रमाणात कचरा फेकण्यात येतो.
शिवाय रहिवाशांकडून शौचासाठीही रेल्वे रुळाचा वापर केला जातो. त्यामुळे या भागातून प्रवास करताना प्रवाशांना नाकाला रूमाल लावण्याची वेळ येते. मागील अनेक वर्षापासून प्रवाशांच्या तक्रारींनंतरही रेल्वे प्रशासनाने याकडे कायमच दुर्लक्ष केले आहे. मात्र, आता रेल्वेरूळच दिसेनासा झाल्याने रेल्वे प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे मत मध्य रेल्वेकडून व्यक्त होत आहे.