मुंबई – केरळमधील महापुरामुळे तेथून होणा-या मसाल्यांची आवक थांबल्याने वेलची २०० तर वेलदोडे १५० रुपये महागले आहेत. लवंग, काळे मिरी, जायपत्री या मसाल्यांचीही टंचाई निर्माण झाली आहे.
केरळमधील वेलदोडा, वेलची, जायपत्री, लवंग आदी मसाले जगभरात प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातही लवंग वगळता अन्य मसाले केरळहून येतात. अ. भा. व्यापारी महासंघ मुंबईचे कार्यकारी सदस्य रमणिकभाई छेडा म्हणाले की, केरळमधून होणारी वेलची व वेलदोडय़ाची आवक मागील आठ दिवसांत पूर्णपणे थांबली आहे. पुरवठय़ावर परिणाम झाल्याने बाजारात दर वाढू लागले आहेत. वेलचीचा घाऊक दर १५०० रुपये प्रतिकिलोवरून १७०० रुपयांवर गेला आहे. वेलदोडय़ाच्या दरात १०० ते १५० रुपयांची वाढ झाली आहे. काळे मिरी ४५० वरून ५५० रुपये प्रति किलो झाले आहे.
केरळमध्ये लवंग व दालचिनीचे पीकही घेतले जाते. मागील काही वर्षापासून दालचिनीचा दर्जा घसरल्याने ती विदेशातून मागवली जात आहे. लवंगीची आयातही वाढली आहे. त्यामुळे या दोन मसाल्यांच्या किमतीवर केरळच्या पुराचा परिणाम झालेला नाही. काळ्या मि-यांचीही आयात वाढल्याने त्यांचेही फार दर वाढणार नाहीत, असे व्यापा-यांनी सांगितले.
खोबरेल तेलही महागण्याची शक्यता
महाराष्ट्रात खोबरेल तेलाचा सर्वाधिक ४० हिस्सा केरळमधून येतो. पुरामुळे केरळमधून होणारी तेलाची आवक थांबली तरी, राज्यात व्यापा-यांकडे त्याचा मुबलक साठा आहे. अन्य राज्यांतूनही तेल येत असल्याने किमती स्थिर आहेत. पण, केरळातील स्थिती न सुधारल्यास, तेल महागू शकते, असे तेल व्यापारी महासंघाचे अध्यक्ष शंकरभाई ठक्कर यांनी सांगितले.