तिरुवनंतपुरम – पुराने अक्षरश: वेढलेल्या केरळची परिस्थिती हळुहळू पूर्वपदावर येत आहे. शुक्रवार आणि शनिवारी पाऊस कमी झाल्याने १४ जिल्ह्यांना दिलेला अतिदक्षतेचा इशारा हटवण्यात आला आहे. पाऊस ओसरल्याने बचाव कार्याला वेग आला असला तरी अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. मुसळधार पावसामुळे साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. दरम्यान, कोची विमानतळावरून ८ दिवसांनंतर व्यावसायिक उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत. परंतु या विमानांचे उड्डाण सध्या तरी नौदलाच्या तळावरून करण्यात येत आहे.
पुरात बेघर झालेल्या लाखो लोकांचे पुनर्वसन आणि राज्याचे झालेले कोटय़वधीचे नुकसान यासारख्या असंख्य समस्यांचा सामना केरळला करावा लागत आहे. अस्वच्छ पाणी आणि वातावरणातील बदल यामुळे अनेक आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच आजारांवर नियंत्रण ठेवणे सरकारी पथकांपुढचे मोठे आव्हान ठरणार आहे. उलटय़ा, जुलाब, व्हायरल फिव्हर आणि अन्य साथीचे आजार पसरायला सुरुवात झाली आहे. तीन जणांना कांजण्याचा संसर्ग झाल्याने त्यांना बचाव शिबिरातून हलवून अन्यत्र ठेवण्यात आले आहे.
मुसळधार पावसाने केरळमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. केरळमधील पुरप्रकोपात आतापर्यंत जवळपास ४०० लोकांचा मृत्यू झाला असून ३.५लाख नागरिक बेघर झाले आहेत. केरळमध्ये १०० वषार्तील सर्वात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे सरकारी बचाव शिबिरात २० लाखांहून अधिक नागरिकांनी आश्रय घेतला आहे. जलप्रलयामुळे हाहाकार माजलेल्या केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ७२ हेलिकॉप्टर, २४ विमाने, ५४८ मोटरबोटी तसेच नौदल, लष्कर, हवाई दल, तटरक्षक दल तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण दलचे हजारो जवान सहभागी झाले आहेत. जोरदार पावसामुळे आतापर्यंत २० हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिली. संततधारेमुळे केरळ राज्याचे कंबरडे मोडले असून, पर्यटन व्यवसायालाही फटका बसला आहे. हजारो एकरातील उभ्या पिकांचे नुकसान झाले असून पायाभूत सुविधांची मोठी हानी झाली आहे. पूरग्रस्त भागात अडकलेल्यांची सुखरूप सुटका करणे, त्यांना अन्नधान्याची पाकिटे पोहोचविणे असे विविधांगी मदतकार्य वेगाने सुरू आहे.
विमान उड्डाणे सुरू
पाऊस ओसरल्याने कोची विमानतळावरून व्यावसायिक उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत. परंतु या विमानांचे उड्डाण सध्या तरी नौदलाच्या तळावरून करण्यात येत आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभूंनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. भीषण पुरात सापडलेल्या केरळच्या मदतीसाठी महाराष्ट्रातूनही मदतीचा ओघ सुरूच आहे. पहिल्या टप्प्यात ६.५ टन सामग्री पाठविल्यानंतर भारतीय वायुदलाच्या विमानाने राज्य शासनाकडून आणखी ३० टन साधनसामग्री पाठविण्यात आली आहे. सोमवारी सकाळी आणखी पाच टन साहित्य रवाना करण्यात आले.