कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी पंचगंगेच्या काठावर सायंकाळी ६.१५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी हजारो लोकांनी या लढाऊ कॉम्रेडला शेवटचा लाल सलाम केला.
कोल्हापूर –कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी पंचगंगेच्या काठावर सायंकाळी ६.१५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी हजारो लोकांनी या लढाऊ कॉम्रेडला शेवटचा लाल सलाम केला.
कॉ. पानसरे यांच्या हत्येमुळे जनमानसात निर्माण झालेल्या संतापालाही या अंत्ययात्रेत वाचा फुटली होती. हजारो लोक हत्येचा निषेध करताना निष्क्रिय सरकारला शिव्याशाप देत होते. शासकीय इतमामात अंत्यविधी झाला नाही, अंत्यविधीला राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहिले नाहीत याचाही निषेधाच्या घोषणा देऊन राग व्यक्त होत होता.
पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्या कन्या स्मिता सातपुते, मेघा बुट्टे, स्नुषा मेघा पानसरे व नातवंडे मल्हार आणि कबीर पानसरे यांनी पार्थिवाला भडाग्नी दिला. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय लोटला होता. ‘कॉम्रेड पानसरे अमर रहे’ ‘कॉ. पानसरे लाल सलाम, लाल सलाम’अशा घोषणा दिल्या जात होत्या.
दरम्यान, त्यांच्या निधनामुळे शनिवारी सकाळी शहरातील व्यापारी व व्यावसायिकांनी व्यवहार बंद ठेवल्याने उत्स्फूर्त बंद पाळला. डावी आघाडी व संघटनांच्या वतीने रविवारी महाराष्ट्र बंद पाळण्यात येणार आहे. तसेच ११ मार्च रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
मुंबईहून शनिवारी दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी पानसरे यांचे पार्थिव कोल्हापुरातील उजळाईवाडी विमानतळावर आणण्यात आले. तेथून ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या दसरा चौकातील अधिवेशनस्थळी आणले.
यावेळी फुलांनी सजविलेल्या चबुत-यावर पानसरे यांचे पार्थिव ठेवले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खा.धनंजय महाडिक, खा.राजू शेट्टी, आमदार महादेवराव महाडिक, श्रीमंत मालोजीराजे छत्रपती, माजी मंत्री छगन भुजबळ, डॉ.भालचंद्र कांगो, दिलीप पवार, सुधाकर रेड्डी आदींसह भाकपचे कार्यकत्रे व पानसरे यांचे चाहते तसेच नागरिकांनी पुष्पहार अर्पण करून पार्थिवाचे दर्शन घेतले.
दुपारी तीन वाजता दसरा चौकातून अंत्ययात्रेला प्रारंभ झाला. पंचगंगा स्मशानभूमी येथे पानसरे यांच्या पार्थिवावर सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी अंत्यसंस्कार झाले. यावेळी हजारोंच्या जनसमुदायाला अश्रू अनावर झाले होते.
गोविंद पानसरे यांच्या निधनाने एक लढवय्या नेता आणि पुरोगामी विचारवंत आपण गमावला आहे. पानसरे यांनी समाजाच्या तळागाळातील नागरिकांसाठी दिलेले योगदान आणि लढा महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल. विविध चळवळीच्या माध्यमातून श्रमिक वर्गाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांनी ४० वर्षापासून अविरत परिश्रम घेतले. कोल्हापुरातील टोलच्या विरोधातील आंदोलनात ते अग्रेसर होते. विविध चळवळींचे ते खरेखुरे आधारस्तंभ होते.
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
पानसरेंच्या निधनामुळे महाराष्ट्राने पुरोगामी चळवळीतील लढवय्या नेता हरपला. प्रचंड संघर्षातून त्यांनी स्वत:ला उभे केले आणि गोरगरिबांसाठी त्यांनी शेवटपर्यंत संघर्ष केला. पानसरेंचे हे बलिदान महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.
– माणिकराव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
कॉ.पानसरे यांची पोकळी भरून काढेल असा दुसरा नेता सापडणार नाही. एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व लोपले आहे. परिवर्तनाच्या लढाईत नरेंद्र दाभोलकर यांच्यासारख्या नेता हरपला ही दुर्दैवी बाब. दीड वर्षातच दुसरा नेता गमवावा लागला. हा आघात महाराष्ट्राला सोसणार नाही.
– प्रा. एन. डी. पाटील
गोविंद पानसरेंचे निधन महाराष्ट्राच्या पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळीची मोठी हानी मानावी लागेल. प्रबोधनाचा एक सच्चा कार्यकर्ता आणि विचारवंत महाराष्ट्राने गमावला आहे.
– सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
कॉम्रेड पानसरे यांच्या निधनामुळे पुरोगामी चळवळीची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. पानसरे यांनी आपले पूर्ण आयुष्य कष्टकरी आणि कामगारांच्या कल्याणासाठी, त्यांना हक्क मिळवून देण्यासाठी व्यतित केले. या ध्येयवादी विचारवंतांच्या निधनाने महाराष्ट्राचेही कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.
– विनोद तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री
कॉ. पानसरे यांच्या निधनामुळे परिवर्तनवादी चळवळीचा आधारवड कोसळला आहे. अवघा महाराष्ट्र शोकमग्न आणि सुन्न झाले आहे. वैचारिक सौदार्हतेची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि पानसरे यांची झालेली हत्या ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. तत्त्वनिष्ठ आणि झुंजार लढवय्यास माझी भावपूर्ण आदरांजली.
– शिवाजीराव देशमुख, सभापती, महाराष्ट्र विधान परिषद, महाराष्ट्र राज्य
कॉम्रेड पानसरे यांच्या निधनामुळे शोषितांसाठी अखेपर्यंत लढणारा झुंजार पुरोगामी नेता राज्याने गमावला आहे. त्यांच्या निधनामुळे झालेली चळवळीची हानी कधीही भरून निघणार नाही.
– रावसाहेब पाटील-दानवे, भाजपा प्रदेशाध्यक्ष
कॉ. पानसरे यांचे कष्टकरी, कामगार, उपेक्षित घटकांसाठी मोठे योगदान होते. राज्यात ब्राह्मणवादी विचारांनी थैमान घातले होते, त्या काळात त्यांनी छत्रपती व कुळवाडीभूषण शिवाजी महाराज यांचा अब्राह्मणी इतिहास पुढे आणला. जमातवादी, जातवादी, इतिहास रोखण्याचे मोठे काम त्यांनी केले. त्यांच्या पुस्तकामुळे तीन-चार पिढय़ा घडल्या. यामुळे खरा शिवाजी समोर आणणारे ते महाराष्ट्राचे थोर इतिहासकार होते,
– श्रीमंत कोकाटे, इतिहासतज्ज्ञ
गोविंदरावांची हत्या ही बहुजनांनी दुर्लक्षित करता कामा नये. देशात हजारो वर्षापासून ब्राह्मणवाद्यांनी स्वर्ग, नरकाची भीती दाखवून ३३ कोटी देव डोक्यावर ठेवून देशावर कायमचे वर्चस्व राहील, अशी कारस्थाने केली. या कारस्थानांना पुरेपूर जाणणाऱ्यांपैकी गोविंदराव एक होते. देशाच्या विकासासाठी तरुणांनी ब्राह्मणवादी विचाराचा धिक्कार करून बुद्धिप्रामाण्यवादी विचार स्वीकारणे आवश्यक आहे. तरच स्वर्ग, नरक, बाबा, बुवा आणि धर्ममरतडाच्या शोषणातून देशाची मुक्ती होईल.
– बी.जी. कोळसे-पाटील, माजी न्यायमूर्ती
कॉ. पानसरे यांनी देशातील धर्मवादी आणि जमातवादी संघटनांना वैचारिक आव्हान दिले होते. कष्टकरी, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी ते अविरत झटत होते. त्यांच्या जाण्याने पुरोगामी चळवळीत पोकळी निर्माण झाली आहे.
– अॅड. प्रकाश आंबेडकर, भारिप बहुजन महासंघ, अध्यक्ष
कॉ. पानसरे यांच्यावर हा हल्ला नसून तो अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला आहे. भारतीय संविधानात बदल करण्याचे स्वप्न पाहणा-या धर्माध शक्तींचे संविधान बदलाचे हे एक पाऊल आहे. तोंडे बंद करून विचार स्वातंत्र्य बंद होणार नाही. उलट त्याला नवनवीन धुमारे फुटतील, यातून अनेक पानसरे जन्म घेतील.
– ज. वि. पवार, साहित्यिक
ज्यांनी आपले सारे आयुष्य दलित, कामगार, असंघटित श्रमिकांसाठी वेचले. तसेच पुरोगामी विचारांचा प्रसार महाराष्ट्रभर केला, अशा थोर नि:स्वार्थ विचारवंतांबरोबर विचारांचा लढा विचारांनी देण्यास असमर्थ ठरल्यानेच त्यांच्या हत्येचा कट रचला गेला आणि दुर्दैवाने तो यशस्वीही झाला. पानसरे यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये म्हणून महाराष्ट्रातील जनता पुरोगामी विचारांची कास धरेल.
– देवेंद्र आंबेरकर, विरोधी पक्षनेते, मुंबई महापालिका
[EPSB]
लाल सलाम…!
कॉ. गोविंद पंढरीनाथ पानसरे हे नाव महाराष्ट्राला अपरिचित नाही. शेकडो लढे आणि सामाजिक चळवळींच्या माध्यमातून पायाला भिंगरी बांधून पानसरे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. कोल्हापुरात तर पानसरे माहीत नसणारा माणूस शोधून काढावा लागेल. [/EPSB]