साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीची शनिवारी नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी सिंहासनारूढ पूजा ज्येष्ठ श्रीपूजक बाबूराव ठाणेकर व परिवाराने बांधली.
कोल्हापूर – साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीची शनिवारी नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी सिंहासनारूढ पूजा ज्येष्ठ श्रीपूजक बाबूराव ठाणेकर व परिवाराने बांधली.
एकूण २७ श्रीपूजक घरांपैकी ठाणेकर परिवारांना नवरात्रोत्सवात पहिले पाच दिवस पूजा बांधण्याचा मान तब्बल सात वर्षानी मिळाला आहे. आदिशक्तीचा जागर करत पुणे, सोलापूर, सांगली, साताराहून गेले दोन दिवस आलेल्या ३००पेक्षा अधिक तरुण व नवरात्रोत्सव मंडळांनी महालक्ष्मी मंदिरातून ज्योत प्रज्वलित केली. तसेच दख्खनचा राजा ज्योतिबाचे दर्शन घेऊन आपल्या गावी प्रयाण केले.
महालक्ष्मी मंदिरासह त्रबोली, अनुकामिनी यासह छत्रपती शाहू राजेच्या व्यवस्थापनाखालील भवानी माता मंदिरात विधिवत नवरात्रोत्सव सोहळा सुरू झाला. तर, तुळजापूर मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर महालक्ष्मी मंदिर परिसरात पोलिसांकडून कडक पहारा ठेवण्यात आला होता.
कळसुबाई शिखरावर घटस्थापना
अकोले (वार्ताहर) : नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असलेल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखरावर कळसुआई मंदिरात शनिवारी आदिवासी बांधवांनी देवीची विधिवत पूजा करून घटस्थापना केली.
अकोले तालुक्यातील टाहाकारी गावाची जगदंबा, वीरगावची अंबिका, गणोरेची जगदंबा, पिंपळगाव निपाणीची संटूआई, रंध्याची घोरपडा देवी, मोग्रसची मुळमाता, शिरपुंजेची सप्तशृंगी, गर्दणीची रत्नागिरी, वाशेरेची जगदंबा, पिंपळदरीची येडूआई, धुमाळवाडीची सप्तशृंगी, इंदोरीची पद्मावती, निब्रळची अंबिका, चितळवेढेची वरसुमाता, खडकीची कालिका, कळंबची कळमजाई, वाघापूरची आऊबाई, तांभोळची तुळजाभवानी, फोफसंडीची राणूमाता आदी गावांसह अकोले शहरातील महालक्ष्मी, जाखुआई, जगदंबामाता, कालिकामाता, सप्तशृंगीमाता आदी मंदिरांतही विधिवत पद्धतीने घटस्थापना करण्यात आली.
माहुर गडावर दर्शनासाठी गर्दी
नांदेड (वार्ताहर) : राज्यात देवीची साडेतीन शक्तिपीठं आहेत. त्यापैकी एक मूळ पीठ नांदेड जिल्ह्यातील माहुर येथे आहे. ‘कोरी भूमी’ म्हणून पुराणात माहुरच्या भूमीचे वर्णन आहे. शनिवारी येथे घटस्थापना झाल्यानंतर माहुर गडावर रेणुकामातेच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती.
महाराष्ट्रात देवीचे माहुर, तुळजापूर आणि कोल्हापूर हे पूर्ण पीठ तर सप्तशृंगीचे अर्धशक्तिपीठ आहे. माहुर येथील रेणुकामाता पूर्ण आणि मूळ पीठ आहे. महाराष्ट्रच नव्हे तर देशातील लाखो भाविकांचं माहुर हे श्रद्धास्थान आहे.
मातेला साडीचोळीचा आहेर करण्याची प्रथा आहे. माहुरची रेणुकामाता मंदिर आता नुकतेच प्रशासकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात तुळजापूरच्या धर्तीवर माहुरात विकासकामे सुरू होतील, अशी भाविकांना आशा आहे.