नेपाळमध्ये कोसळलेल्या दरडी हटवल्याने बिहारमधील कोसी नदीला पूर आल्याने दीड लाख नागरिकांचे स्थलांतर केले आहे.
पाटणा- नेपाळच्या भोते कोसी नदीतून दरडी हटवल्याने पाण्याचा मोठा प्रवाह बिहारमधील कोसी नदीत घुसला आहे. त्यामुळे नदीला पूर आला असून बिहारमध्ये हाहाकार उडाला आहे.
कोसी नदीच्या शेजारी राहणा-या दीड लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. दरम्यान, बिहार सरकारने कोसी नदीच्या आसपासच्या जिल्ह्यांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.
नेपाळमधील भोते कोसी नदीत दरडी पडल्या होत्या. त्या काढण्यासाठी शनिवारी नेपाळच्या लष्कराने कमी तीव्रतेचे स्फोट घडवून आणले. त्यामुळे कोसी नदीत पाण्याचा प्रवाह मोठय़ा प्रमाणात वाढल्याचे बिहारचे जलसंपदा मंत्री विजय कुमार चौहान यांनी सांगितले.
यामुळे बिहार सरकारने आसपासच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. तसेच कोसी नदीकाठच्या लोकांचे स्थलांतर करण्याचे आदेशही सरकारने दिले आहेत. नदीत १० मीटर उंचीपर्यंत पाण्याचा प्रवाह असणार आहे. आठ जिल्ह्यातील दीड लाख नागरिकांचे उत्तर बिहारमध्ये स्थलांतर करण्यात येत आहे.
नेपाळमधील सिंधुपलचोक जिल्ह्यात भोते कोसी नदीत कोसळलेल्या दरडी हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. भोते कोसी नदीच्या एक किलोमीटपर्यंत दरडी कोसळून मार्ग बंद झाला आहे. ते काढण्याचे काम अत्यंत अवघड आहे. या सर्व परिस्थितीवर आम्ही नजर ठेवून आहोत. यासाठी नेपाळमध्ये आमच्या अधिका-यांचे पथक गेले आहे, असे बिहारचे जलस्रेत मंत्री विजय चौहान यांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बिहारचे मुख्यमंत्री जितन राम मांझी यांच्याशी रविवारी सकाळी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मादी यांनी बिहारला सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, आपत्कालिन व्यवस्थापन विभागाचे विशेष सचिव अनिरुद्ध कुमार म्हणाले की, कोसी नदीच्या शेजारील धोकादायक भागातील नागरिकांचे स्थलांतर सुरू केले आहे. एनडीआरएफच्या १५ कंपन्या तैनात केल्या असून लष्कराचीही मदत घेण्यात येत आहे. राज्य सरकारने १२० मदत केंद्रे उघडली असून जनावरांसाठी १७ छावण्यात सुरू केल्या आहेत.