जिथे लोकहिताचे कायदे बनतात, अशा लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद अशा सभागृहात काही नेत्यांचे सदस्य म्हणून असणे ही त्या नेत्यांची नव्हे तर त्या सभागृहांची गरज असते. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांची नुकतीच विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली. या सदनाच्या सदस्यत्वासाठी काँग्रेस पक्षातून राणे यांचे नाव एकमुखाने पक्षश्रेष्ठींकडे सुचविण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून राणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणे आणि त्यानंतर त्यांची विधान परिषदेवर निवड होणे हा केवळ उपचाराचा भाग होता. गेली सलग २४ वर्षे नारायण राणे विधानसभेचे सदस्य होते. विधानसभा गाजवून सोडणा-या सदस्यांची नावे काढायची म्हटले तर त्यात राणे यांचे नाव ब-याच वरच्या क्रमांकावर असेल यात कोणतीही शंका नाही.
गेली तब्बल ५० वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात वावरणा-या नारायण राणे यांनी स्वत:चे असे एक राजकीय स्थान निर्माण करून ठेवले आहे. त्यांच्याबरोबरीने ज्यांनी शिवसेनेच्या राजकारणात प्रवेश केला त्यापैकी अनेक जण अद्यापीही शाखाप्रमुख, विभागप्रमुख, माजी आमदार अशा पदांवरच गटांगळ्या खात असताना नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदही भूषविले. मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्री असताना अनेकांना आपल्या सापळ्यात अडकवून नामोहरम करून टाकले. मला कॅबिनेट मंत्रीपदच हवे आणि मुख्यमंत्री बसतात त्या सहाव्या मजल्यावरच दालन हवे, असा हट्ट धरणा-या दत्ताजी साळवी यांची बोळवण मनोहरपंतांनी कधी स्वातंत्र्यसैनिक कल्याण महामंडळाच्या अध्यक्षपदी केली हे त्यावेळी अगदी बाळासाहेबांच्याही पटकन लक्षात आले नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे दुसरे आवडते नेते मधुकरराव सरपोतदार हमखास कॅबिनेट मंत्री होणार अशी सर्वांनाच खात्री असताना मनोहर जोशी यांनी त्यांची बोळवण एकदा हौसिंग बोर्डाच्या अध्यक्षपदावर केली तर दुस-या वेळी सरपोतदार खासदार होऊन दिल्लीला जातील, अशी व्यवस्था करण्यामागेही मनोहर जोशी यांचेच डोके होते. गणेश नाईक यांना मंत्रिमंडळाबाहेर जावे लागेल ही करामतही मनोहर जोशी यांचीच. पण इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या संभाव्य विरोधकांचे काटे अगदी अलगदपणे काढणा-या मनोहर जोशी यांच्या बामणीकाव्यात नारायण राणे मात्र कधीही सापडले नाहीत, उलट संधी मिळताच राणे यांनीच मनोहर जोशींना मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरचा आणि वर्षा बंगल्यावरचा बाडबिस्तारा बांधायला लावला. महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांनी खूप वेगाने मुख्यमंत्रीपद संपादन केले, अशी दोनच नावे चटकन डोळ्यांसमोर येतात. पहिले शरद पवार आणि दुसरे नारायण राणे. ‘प्रहार’ दैनिकाच्या प्रकाशन सोहळ्यात हाच धागा पकडून ज्येष्ठ काँग्रेस नेते पतंगराव कदम यांनी नारायण राणे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. ज्येष्ठत्वाच्या नात्याने राणे यांचा एकेरी उल्लेख करून पतंगराव तेव्हा म्हणाले होते, नारायण तू ढाण्या वाघ आहेस. १९६७ पासून आम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात घासतोय, आम्हीही प्रत्येक वेळी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होतो, पण आम्हाला गेल्या चाळीस वर्षात जे मिळाले नाही ते राज्याचे मुख्यमंत्रीपद तू अवघ्या १२-१४ वर्षात मिळवून दाखविलेस. तू असाच पुढे जात राहा, आम्ही निश्चितपणे तुझ्या पाठीशी उभे राहू. पतंगराव कदम यांच्या या वक्तव्यात चुकीचे काही आहे, असे अजिबात म्हणता येणार नाही. सहकार-उद्योग अशी महत्त्वाची खाती भूषविणा-या आणि वनखात्यात जाऊन तिथली रुक्ष लाकडेही फोडणा-या पतंगराव यांच्यासमोरच बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले. विलासराव देशमुख यांनीही सलग दोन वेळा हे पद भूषविण्याचा मान मिळविला. आपल्या स्वत:च्या पक्षात हे घडत असताना आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील विजयसिंह मोहिते-पाटील, छगन भुजबळ, आर.आर.पाटील यांना आणि अजितदादा पवार यांनाही उपमुख्यमंत्री होताना पतंगराव कदम यांनी पाहिले पण प्रत्येक वेळी त्यांच्या वाटय़ाला मंत्रीपदावर समाधान मानण्याचेच भोग आले.
१९६६ सालापासून राजकारणात असलेल्या नारायण राणे यांची सत्तेच्या राजकारणातील सुरुवात १९८५ साली नगरसेवकपदाची निवडणूक लढवून झाली. राणे यांनी मनात आणले असते, तर ८५ ते ९० या नगरसेवकपदाच्या काळातच ते मुंबईचे महापौर झाले असते. पण शोभेचे हे पद स्वीकारून मुंबईवर मिरवण्यापेक्षा राज्य पातळीवरील राजकारणात प्रवेश करण्यास राणेंनी प्राधान्य दिले असावे. यातूनच १९९० साली मालवण मतदारसंघातील विधानसभा निवडणूक त्यांनी शरद पवार यांचे नजीकचे स्नेही वाय.डी.सावंत यांचा पराभव करून जिंकली. मग मात्र नारायणरावांनी मागे वळून पाहिले नाही. १९९० साली आमदार, पुढे १९९५ सालच्या निवडणुकीत पुन्हा आमदार आणि त्याच वर्षी कॅबिनेटमंत्री, पुढे मंत्रिमंडळातील फेरबदलात महसूलमंत्री. एकदा महसूलमंत्रीपद हे दुस-या क्रमांकाचे खाते मिळाल्यानंतर आपण मुख्यमंत्रीही होऊ शकतो या आत्मविश्वासाने कोकणच्या या नेत्याने थेट शिवसेनाप्रमुखांकडे मुख्यमंत्रीपदावरच दावेदारी पेश केली. बाळासाहेबांनीही मग आपल्या या विश्वासू नेत्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविली. फेब्रुवारी १९९९ ते ऑक्टोबर १९९९ एवढा अल्पकाळच राणे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी होते. पण अत्यंत आत्मविश्वासाने, जबाबदारीने आणि संपूर्ण राज्याशी एक भावनिक नाते जोडून एवढय़ा अल्पकाळातही मुख्यमंत्रीपदाला इतका न्याय दिला की मनोहर जोशी यांना वर्ष, दीड र्वष आधीच हटवून राणे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद का सोपविले नाही. अशा प्रतिक्रिया थेट बाळासाहेबांपर्यंत राज्याच्या अनेक भागांतून गेल्या.
वास्तविक राणे यांच्यावर बाळासाहेबांनी थोडा अन्यायच केला. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाची मुदत मार्च २००० पर्यंत असताना, वाजपेयी यांच्या सांगण्यावरून ठाकरे यांनी ऑक्टोबर १९९९ मध्येच महाराष्ट्र विधानसभेचीही मध्यावधी निवडणूक घेतली. या निवडणुकीत युतीचा पराभव करून काँग्रेस आघाडी सत्तेवर आली आणि नारायण राणे यांच्याकडे राज्याचे विरोधी पक्षनेतेपद आले. अत्यंत कार्यक्षमतेने राणे हे पद सांभाळत होते. मात्र मातोश्रीवरील खलबतखान्यात त्यांच्याविरुद्ध खलबत्ते सुरू झाली. हा प्रकार न कळण्याएवढे राणे बालिश मुळीच नव्हते. कुणाला आपल्या विरुद्ध कारवाई करण्याची संधी मिळणार नाही, याची खबरदारी घेत नारायण राणे यांनी स्वत:च शिवसेनेला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
नारायण राणे हा महाराष्ट्राच्या राजकारणातील बंदा रुपया आहे. जे पद मिळेल त्याला राणे यांनी खणखणीतपणे न्याय दिला आहे. राज्याचे नुकसान होईल, असा एकही निर्णय या नेत्याकडून झाला नाही. प्रचंड अभ्यास, प्रशासनावर जबरदस्त पकड असलेल्या या नेत्याने आदर्श मुख्यमंत्री आणि आदर्श विरोधी पक्षनेता कसा असावा याचा एक छानसा वस्तुपाठच महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवला. राणे यांची नवी राजकीय इनिंग पुन्हा सुरू झाली आहे. त्यासाठी सतत लोकांचे भले चिंतणा-या या नेत्याला शुभेच्छा!