तो या चित्रपटसृष्टीत आला, तेव्हा एकेकाळचा फाइट मास्टर शेट्टी यांचा मुलगा एवढीच त्याची ओळख होती. तशी त्याने लहानपणापासून ही इडस्ट्री जवळून पाहिली होती. त्यातल्या प्रत्येक घटकाचा अभ्यास केला होता. जेव्हा त्याला इथे दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाली तेव्हा त्याने आपला सारा अभ्यास इथे रिता केला. हा हा म्हणता तो या सिनेमासृष्टीचं एक चलनी नाणं झाला. या चित्रपटसृष्टीला पहिल्यांदा शंभर कोटीच्या व्यवसायाची चव चाखून देणारा रोहित शेट्टी आज चारशे कोटींच्या क्लबमध्ये गेला आहे. आता त्याने ‘खतरों के खिलाडी’ या धोकादायक स्टंट असलेल्या रिअॅलिटी शेमधून आपली छोट्या पडद्यावरची इनिंग सुरू केलेली आहे. या रोहित शेट्टीबरोबर मारलेल्या या गप्पा
तू आता चारशे कोटींच्या क्लबमध्ये दाखल झाला आहेस, हा अनुभव तुला कसा वाटतो?
>मी जेव्हा चित्रपट तयार करतो, त्यावेळी हा चित्रपट अमूक एक कोटींचा व्यवसाय करेल असा विचार करत नाही. कोणत्याही चित्रपटाचं स्वत:चं असं एक नशीब असतं. त्याप्रमाणे तो व्यवसाय करतो. माझ्या चित्रपटाने किती व्यवसाय केला याबरोबरच तो किती लोकांना आवडला हे मला फार महत्त्वाचं वाटतं. आता तुम्ही चारशे कोटी वगैरेबद्दल बोलत असाल तर ते सगळेच पैसे माझ्या खिशात जात नाहीत. त्यात अनेक घटक असतात, निर्माता, वितरक व इतर घटकांचा मिळून झालेला तो एक व्यवसायविषयक व्यवहार असतो. आता माझ्या मुलालाही असंच वाटतं की, आपल्या वडिलांकडे चारशे कोटी आलेले आहेत. त्यामुळे जेव्हा तो एखादी गोष्ट माझ्याकडे मागतो आणि मी नाही म्हणतो तेव्हा तो म्हणतो की, अरे तुमच्याकडे तर इतके पैसे आले आहेत तरी मला नाही का म्हणता? आज माझं काम लोकांना आवडतं, ही माझ्यासाठी समाधानाची बाब आहे.
आपल्या कामाला मिळालेल्या यशाचं गमक तुला काय वाटतं?
>मी आधीच सांगितलंय की चित्रपटाने किती व्यवसाय करावा, हे काही माझ्या हातात नसतं. मग माझ्या हातात काय आहे? तर प्रामाणिकपणे मी काम करणं, माझी कलाकृती ही परिपूर्ण असली पाहिजे. त्यातल्या सर्वच बारकाव्यांचा मी विचार केला पाहिजे. त्या चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणून सगळ्या टीमकडून चांगलं काम करून घेणं, हे माझं काम आहे. त्यामुळे मी या गोष्टींवरच अधिक लक्ष केंद्रित करत असतो. मला मिळत असलेल्या यशाचं श्रेय मी फार फार तर माझ्या व माझ्या टीमच्या प्रामाणिक प्रयत्नांना देईन. ते करणं हे माझ्या हातात आहे. ते करताना मी कोणताही मागचा-पुढचा विचार करत नाही. मला माझ्या टीमकडूनही चांगलं सहकार्य मिळतं, यामुळे कदाचित हे यश आम्हाला मिळत असावं असं वाटतं.
तुझ्या लेखी स्टंट काय आहे?
>माझ्या लेखी स्टंट ही जीवनाची एक अपरिहार्यता आहे. आपल्याला ते पडद्यावर थोड्या मोठ्या प्रमाणात पाहायला आवडतात कारण तो आपल्याही जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपल्याला ते करता येत नाहीत. मात्र पाहायला निश्चित आवडतात. त्याने आपलं चांगलं मनोरंजन होत असतं. मुंबईत रोज सकाळी गर्दीच्या वेळी लोकल पडकणं व त्यातून प्रवास करून पुन्हा आपल्या निश्चित स्थानकावर उतरणं हादेखील एक स्टंटच आहे. तो किती जण करतात हे काही मी सांगायला नको. आम्ही जे दाखवतो त्याप्रमाणेच माणसं हा स्टंट रोज करत असतात. त्यामुळे ज्या प्रकारे पडद्यावर आपल्याला नायक-नायिकांचं प्रेम पाहायला आवडतं तसंच आपल्याला स्टंटही पाहायला आवडतं.
आता तू छोट्या पडद्यावर येत आहेस हा निर्णय का घेतला?
>मी कोणताही निर्णय हा कुठल्या बाह्य कारणांसाठी घेत नाही. त्यासाठी ती संकल्पना मला जवळची वाटावी लागते. त्यावर माझं प्रेम असावं लागतं. ‘खतरों के खिलाडी’ हा कार्यक्रम माझा आवडीचा कार्यक्रम होता. माझी आतापर्यंतची कारकीर्द पाहता लहान मुलगाही हे सांगू शकेल. त्या कार्यक्रमात आपण काय वेगळं करू शकतो याचा मी स्वाभाविकच विचार करत असे. या कार्यक्रमासाठी मला विचारणा करण्यात आली, तेव्हा माझ्याकडे वेळ नव्हता. त्यामुळे मी लगेच होकार कळवला. ‘चेन्नई एक्सप्रेस’चं काम संपल्यावर नवीन चित्रपट करण्याआधीचा वेळ या कार्यक्रमासाठी मला देता येणार होता, त्यामुळे मी ही मालिका स्वीकारली. त्यातही ‘कलर्स’च्या राज नायक यांचं म्हणणं असं पडलं की, जर तुम्ही हे काम करणार नसाल तर आम्ही हा शोच करत नाही. इतका आग्रह झाल्यावर मग मी हा कार्यक्रम स्वीकारण्याचं ठरवलं. माझ्यासाठी या कामालाही चित्रपटाइतकंच महत्त्व आहे. त्यात टीव्हीवर मी आलो, असं म्हणणं काही योग्य नाही. ‘चेन्नई’नंतर मी ‘खतरों के खिलाडी’ करतोय इतकंच.
या कार्यक्रमाचा साचा ठरलेला आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कल्पना वापरायला किती वाव होता?
>तसं काही झालं नाही. एक तर या कार्यक्रमात मला घेतानाच त्यात मी काही ना काही व्हॅल्यू अॅडिशन करणार, हे वाहिनीला माहीत होतंच. किंबहुना त्यांना माझ्याकडून तशीच अपेक्षा होती. माझा एक स्वभावच बनून गेला आहे. माझ्याकडे एखादं काम आलं की, त्यात आणखी काय वेगळं करता येईल याचा मी विचार करतो. या सत्रात अनेक सेलिब्रिटी आहेत. त्यांच्या बरोबरीने मी गीताला घेतलं. ती कुणी सेलिब्रिटी नाही. मात्र तिने आतापर्यंत अनेक आघाडीच्या अभिनेत्रींसाठी स्टंट केले आहेत. दुसरं असं की, या कार्यक्रमात आम्ही महिला व पुरुष यांच्या स्टंटमध्ये काहीही फरक केलेला नाही. दोघांच्याही शारीरिक क्षमतांमध्ये फरक असला तरी महिलाही हे स्टंट अगदी सहजपणे करू शकतील, असं मला वाटतं. याबरोबरच आणखी अनेक काही नव्या गोष्टी या कार्यक्रमात राबवल्या आहेत, ज्या तुम्हाला कार्यक्रम एकदा का सुरू झाला की पाहता येणार आहेत.
आधीच्या कार्यक्रमातल्या स्पर्धकांना अनेक चित्रविचित्र गोष्टी खाव्या लागायच्या, या वेळेसही तसे काही आहे का?
>या कार्यक्रमाच्या साच्यात अशा प्रकारच्या अनेक स्टंटचा सहभाग आहे. मात्र मी विचार केला की या कार्यक्रमाच्या भारतातल्या प्रसारणाची वेळ ही रात्री नऊ वाजताची आहे. सहसा एकत्र जेवत असताना टीव्ही पाहण्याची आपल्याकडे सवय आहे. जेवत असताना असं काही पाहणं मला स्वत:लाही आवडत नाही, तर ते इतर प्रेक्षकांना काय आवडणारय्? म्हणून आम्ही हा भाग काढून टाकला आहे. त्याऐवजी प्रेक्षकांना व खासकरून भारतीय प्रेक्षकांना आवडतील असे अनेक स्टंट या कार्यक्रमात आम्ही घेतले आहेत. हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी आहे, याची आम्ही पुरेपूर काळजी घेतलेली आहे.
या कार्यक्रमाकडे पाहताना तू कशाचा सर्वात जास्त विचार करतोस?
>माझ्यासाठी या कार्यक्रमात भाग घेणा-या कलाकारांची सुरक्षा ही अधिक महत्त्वाची आहे. आता ही स्पर्धा असल्याने कधी कधी सुरक्षेच्या पुढे जाऊन या साहसाचा विचार करावा लागतो. असं असलं तरी सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून चालणार नाही. दुसरं असं की, या कार्यक्रमातून मिळणारं मनोरंजन माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. प्रेक्षक केवळ साहस पाहत नाहीत. त्यांना त्याच्याबरोबर मनोरंजनही हवं असतं. साहजिकच हे दोन घटक माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहेत.
तू लहानपणापासून या क्षेत्रात आहेस, त्यात काम करताना तुझ्या वडिलांचं तुला किती मार्गदर्शन मिळालं?
>त्यांनी मला काम कसं करायचं, हे शिकवण्यापेक्षा एक चांगला माणूस म्हणून मी कसा घडेन याचा अधिक विचार केला. ते व माझी आई हे दोघंही स्टंट करत असल्याने त्यांच्याकडून या क्षेत्राविषयी जे काही शिकायचं आहे ते मी आपसूकच शिकत गेलो. मात्र ते मला काही सांगत, तेव्हा त्याचा रोख मी चांगला विचार कसा करावा, माझं काम प्रामाणिकपणे कसं करावं यावर असे. त्यांची सगळ्यांबरोबर वागण्याची पद्धतही तशीच होती. त्यांच्याकडून हे सर्व शिकायला मिळालं, ज्याचा मला पुढच्या आयुष्यात खूप फायदा झाला.
तुला भीती नाही वाटत?
>प्रत्येकाला कशाची ना कशाची तरी भीती वाटत असतेच, मला नेमकी कशाची वाटते हे मला अजून समजलेलं नाही. मात्र आपल्या जवळच्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल गैरसमज निर्माण होऊन त्याचं आपल्या जीवनातून निघून जाणं मला सर्वात भीतीदायक वाटतं.
रोहित तुझ्या घरातच स्टंटचं वातावरण आहे. तुझा मुलगाही स्टंट करतो?
>हो ना, ते तर त्याच्या रक्तातच आहे. तो जेव्हा काही धोकादायक गोष्टी करत असतो, तेव्हा मी त्याला समजावत असतो. ही काही भावनांच्या भरात येऊन करण्याची गोष्ट नसून हे एक शास्त्र आहे. एक कौशल्य आहे. हे मी त्याला समजावून सांगतो.
आता पुढचा चित्रपट कोणता?
>सध्या मी केपटाऊनला चाललोय. तिथे आम्ही दोन महिने राहणार आहोत, त्यानंतर मग आम्ही लगेचच ‘दबंग २’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. यासाठी आम्ही मुंबईत चित्रीकरण करत आहोत. खास गर्दीच्या ठिकाणी या चित्रपटाचं चित्रीकरण होणार असल्याने त्यासाठीची तयारी करण्यात सध्या माझी टीम गुंतली आहे.
रोहित शेट्टीच्या चित्रपटांची कमाई
>चेन्नई एक्सप्रेस – ४२२ कोटी
>गोलमाल ३ – १६० कोटी
>बोल बच्चन – १५० कोटी
>सिंघम – १४० कोटी