अंतराळवीरासह अवकाशात उपग्रह पाठविण्याची ‘गगनयान’ ही मोहीम हे भारतासाठी अवकाश तंत्रज्ञानविषयातील एक महत्त्वाचे यश असेल. या मोहीमेची जबाबदारी इस्त्रोच्या डॉ. व्ही. आर ललीथंबिका करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
नवी दिल्ली- अंतराळवीरासह अवकाशात उपग्रह पाठविण्याची ‘गगनयान’ ही मोहीम हे भारतासाठी अवकाश तंत्रज्ञानविषयातील एक महत्त्वाचे यश असेल. या मोहीमेची जबाबदारी इस्त्रोच्या डॉ. व्ही. आर ललीथंबिका करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. डॉ. ललीथंबिका या कंट्रोल रॉकेट इंजिनियर असून त्या मागील ३० वर्षांपासून इस्त्रोमध्ये कार्यरत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी मोहिमेबाबतची अधिकृत घोषणा केली होती. हे काम एका महिलेच्या हाती आले असून ही अतिशय अभिमानाची बाब आहे. गगनयान मोहिमेपूर्वी जीएसएलव्ही-३ च्या आधारे दोन मानवविरहित मोहिमा हाती घेणार असल्याची माहिती इस्त्रोकडून मिळाली आहे. गगनयान मोहिमेमुळे देशाचे विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्र उच्चत्तम पातळीला पोहोचेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. डॉ. ललीथंबिका लवकरच आपल्यासोबत काम करणा-या टीमची निवड करतील. तसेच लवकरच मोहीमेच्या कामाची आखणी करणार आहेत. दोन महिन्यांच्या आत पहिला प्रोजेक्ट रिपोर्ट त्यांच्या नेतृत्त्वाखाली पूर्ण होईल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्यावर अतिशय मोठी जबाबदारी असून ती पूर्ण करण्यासाठी त्या योग्य व्यक्ती असल्याचे इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवन यांचे म्हणणे आहे.
गगनयान मोहीमेंतर्गत पाठविण्यात येणारे अवकाशयान चार ते पाच टन वजनाचे असेल. या प्रकल्पासाठी १० हजार कोटींच्या आसपास खर्च येईल. या राष्ट्रीय प्रकल्पात विविध संघटना, तज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील मंडळी सहभागी असतील. या मोहिमेमुळे राष्ट्राची प्रतिष्ठा वाढेल असे म्हटले जात आहे. तसेच या प्रकल्पामुळे येत्या काळात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याचेही बोलले जात आहे. जवळपास १५ हजार नोक-यांची निर्मिती होण्याची शक्यता आहे. भारताची ही मोहीम यशस्वी ठरली तर अमेरिका, रशिया आणि चीननंतर मानवी अवकाश मोहीम यशस्वी करणारा भारत जगातील चौथा देश ठरेल.