हलक्या वाहनांनी कोकणात जाणा-या सर्व प्रवाशांना गणेशोत्सवाच्या काळात टोलमुक्ती देण्यात येईल, असे आश्वासन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिले होते
मुंबई- गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या एसटी मंडळाच्या २ हजार ३०० बसेसना टोलमुक्ती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र याच मार्गावरून गणपतीसाठी जाणा-यांना इतर हलक्या वाहनांना टोलमुक्ती नाही, असे जाहीर करीत राज्य परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी स्वत:च्या वाहनाने गावी जाणा-या हजारो कोकणवासीयांची नाराजी ओढवून घेतली आहे.
गणेशोत्सवासाठी विशेष एस. टी. बसेस आणि हलक्या मालकी वाहनांनी कोकणात जाणा-या सर्वच प्रवाशांना उत्सवाच्या काळात टोलमुक्ती देण्यात येईल, असे आश्वासन काही दिवसांपूर्वी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिले होते. या संदर्भात मंगळवारी संबंधित खात्यांचे मंत्री व प्रशासकीय विभागांचे अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीची माहिती देताना रावते बोलत होते.
कोकणात जाणारे सर्व मार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. जेथे रस्ते अरुंद आहेत तेथे रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सर्व एसटी गाडय़ा पालीमार्गे काढण्याचे ठरले आहे. तसेच नाशिक कुंभमेळय़ासाठी वापरण्यात आलेल्या १४०० एसटी गाडय़ा १४ सप्टेंबर रोजी नाशिकवरून मुंबईत येणार आहेत.
संपूर्ण उत्सव काळात आरटीओची १६ पथके तैनात असणार आहेत. एसटीच्या २३०० गाडय़ांना टोलमुक्ती दिल्याचे यावेळी रावते यांनी सांगितले.