विदर्भ, मराठवाडय़ात ३ बळी, बळीराजावर अस्मानी संकट
औरंगाबाद – मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांना रविवारी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला. गारपिटीच्या मा-यामुळे जालना व वाशिम जिल्ह्यातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अचानक झालेल्या गारपिटीमुळे कांदा, गहू आणि हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जालना, धुळे, वाशिम, अकोला, बुलडाणा व बीडमधील काही गावांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात आला आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून या भागात ढगाळ वातावरण होते. हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. रविवारी सकाळीच अनेक ठिकाणी पाऊस व गारा पडण्यास सुरुवात झाली. बीड जिल्ह्यातील पिंपळनेर परिसरात गारांचा पाऊस पडला. धुळ्यासह उत्तर महाराष्ट्रालाही पावसाने झोडपले. सुमारे १५ मिनिटे गारांचा मारा सुरू होता. लिंबाच्या आकाराच्या या गारा होत्या. धुळे शहरात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळल्या. विदर्भात १० ते १३ तारखेच्या दरम्यान पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने आधीच दिला होता. पश्चिम विदर्भाला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. अकोला जिल्ह्यातील बाळापूर, तेल्हारा, अकोट येथे गारांचा पाऊस पडला.
या गारांच्या मा-यामुळे दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. जालना जिल्ह्यातील वंजार उमरद गावात गारा अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. नामदेव शिंदे असे मृताचे नाव असून ते ७० वर्षांचे होते. शिंदे हे शेतात जात असताना गाराचा मार लागून त्यांचा मृत्यू झाला. तर दुसरी घटना जालना जिल्ह्यातीलच जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा गावातील ६५ वर्षीय आसाराम जगताप यांचा गाराचा मारा लागून मृत्यू झाला. तिसरी घटनाही वाशिम जिल्ह्यातील महागाव येथे घडली. मंदिरात दर्शनाला जात असलेल्या एका महिलेचा गारांचा जोरदार तडाखा बसल्याने मृत्यू झाला. यमुना हुंबाड असे या महिलेचे नाव आहे.
पंचनामे तातडीने करा – फुंडकर
राज्यातील विदर्भ आणि मराठवाडय़ाचा काही भाग, धुळे या भागात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकरी बांधवांचे नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे शेतीच्या नुकसानीचे पंचनामे कृषी व महसूल विभागाच्या अधिका-यांनी तातडीने करावेत. जिल्हा प्रशासनाने उद्या विमा कंपन्यांची बैठक घेऊन गावनिहाय आकडेवारी त्यांना उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी रविवारी दिले. राज्यातील ज्या भागात रविवारी अवकाळी पाऊस व गारपीट झाली त्याचा आढावा कृषिमंत्र्यांनी घेतला. त्यांनी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजयकुमार यांच्याशी दूरध्वनीवरून राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाबाबत चर्चा केली.