दासबोधातील पाचव्या दशकातील दुस-या समासात समर्थानी गुरू आणि सद्गुरू यातील फरक दाखवून दिला आहे. त्याबाबत समर्थ म्हणतात की, काही माणसे विलक्षण करामती करून दाखवतात. त्यांनाही गुरू म्हणतात. पण, मोक्ष देणारे हे गुरू नव्हेत. सभेतील लोकांची नजरबंदी करणे, चेटूक करून भुरळ पाडणे, साबरमंत्र व कौटाळे या नाथपंथीय मंत्राद्वारे चमत्कार करणे, अशक्य वाटणा-या गोष्टी करून दाखविणे, अनेक वनस्पती व रसायनांचे औषधीप्रयोग सांगणे, दुस-या धातूचे सोन्यात रूपांतर करण्याचा प्रयोग सांगणे, नजरबंदी करून ताबडतोब इच्छापूर्तीचा मार्ग सांगणे, साहित्य, संगीत, रागज्ञान, गायन, नृत्य, ताना, निरनिराळी वाद्ये शिकविणारे, तेही एक प्रकारचे गुरू असतात. काही मंत्र जाणणारे मंत्र शिकवतात, ताईत, गंडेदोरे देण्याचे शिकवतात, काही पोट भरण्याची कला शिकवतात. ज्या जातीचा जो व्यापार असतो, तो त्या जातीतील लोकांना पोट भरण्यास शिकवतात. ते सुद्धा एक प्रकारचे गुरूच, पण सद्गुरू मात्र नव्हेत. आपली आई व वडील हे पण गुरूच, पण संसारातून पैलतीराला नेणारा तो सद्गुरू वेगळाच असतो. गायत्रीमंत्राचा उपदेश देणारा कुळगुरू, पण तो काही आत्मज्ञान देत नाही. त्या ज्ञानावाचून पैलपारास जाता येत नाही. जो ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो, अज्ञानाचा अंधार नाहीसा करतो व जीवात्म्याचे परमात्म्याशी ऐक्य घडवून आणतो. तो सद्गुरू असतो. देव आणि भक्त यांचा वियोग झालेला असल्यामुळे जीव व शिव असे द्वैत निर्माण झालेले असते, ते द्वैत नाहीसे करून देव व भक्त यांची गाठ घालून देऊन ऐक्य करतो, तो सद्गुरू असतो. भवरूपी वाघाने उडी घालून गाय-वासराची ताटातूट केली, हे पाहून दया येऊन त्या भवरूपी वाघापासून सोडविणारा तो सद्गुरू. प्राणी (जीव) मायेच्या जाळ्यात अडकून प्रपंचांतील दु:खाने दु:खी होतात. अशांना मायेच्या जाळ्यांतून जो सोडवितो. तो सद्गुरू होय.
वासनारूपी नदीला महापूर आलेला असता जीव त्यामध्ये गटांगळ्या खात बुडू लागतो. त्यावेळी तेथे उडी घालून जो तारतो, तो सद्गुरू होय. वासनेच्या बंधनाची बेडी त्यामुळे जीवाला गर्भवासाचे दु:ख भोगावे लागते. आत्मज्ञान देऊन त्या बंधनांतून जीवास जो मुक्त करतो, तो सद्गुरू होय. शब्दांचे अंतरंग अर्थात त्यावरून आत्मस्वरूपाकडे नेणारा सद्गुरू म्हणजे अनाथांचे जणू माहेरघरच असतो. जीव हा एकांगी असतो, अपूर्ण असतो. ब्रह्म सर्वागी, पूर्ण स्थळ, काळ परिस्थिती यांच्या पलीकडे असते. आपल्या उपदेशाने सद्गुरू जीवाला प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप बनवितो. वेदांच्या अंतरंगामधे म्हणजे उपनिषदामधे जे ज्ञान गुप्तरूपे आहे ते ज्ञान सद्गुरू लहान मुलाला जसे घास भरवितात तसे शिष्याला आपल्या बोलण्यांतून हळूहळू कानांत सांगतात. वेद, शास्त्र व सद्पुरुष ज्ञानानुभवाने एकरूप झालेले असतात. तेच ज्ञान तोच अनुभव सद्गुरूचा असतो. ज्ञान या दृष्टीने सर्वाचे ज्ञान सारखेच असते. सद्गुरू भक्ताचे सर्व प्रकारचे संशय मुळापासून नष्ट करतो. तो मोठय़ा आदराने स्वधर्माचे पालन करतो. वेदरहित म्हणजे आत्मज्ञान असलेले सर्व मिथ्या भाषण तो करत नाही. मनात जे जे येते, ते ते लज्जा, भीड न बाळगता जो उघड करतो. तो काही सद्गुरू नव्हे. तो भिकारी आपल्यामागे लागण्यासाठी आला आहे असे समजावे.
जो आपल्या शिष्याला साधनात कसे राहावे हे शिकवत नाही. इंद्रिये ताब्यात कशी ठेवावीत हे शिकवत नाही. असले गुरू दमडीला तीन मिळाले तरी त्यांच्यापासून लांब राहावे. जो आत्मज्ञान समजावून सांगतो, सर्वच्या सर्व अविद्या म्हणजे आत्मज्ञानाव्यतिरिक्त असलेले मिथ्या ज्ञान समूळ नष्ट करतो. इंद्रिये आवरून कशी धरावी हे शिष्याला शिकवितो. तो सद्गुरू समजावा. काही गुरू पैशाचे मिंधे होतात. शिष्याच्या आधीन होतात. वासनेच्या नादी लागून दिनवाणे बनतात. असे गुरू शिष्याच्या एवढे आधीन होतात की, शिष्याला जे जे आवडेल ते ते सर्व करतात, कारण वासनेचा विळखा त्यांच्या मानेभोवती बसलेला असतो. शिष्याच्या भिडेला बळी पडून त्याची मनधरणी करणारा गुरू अधमाहूनही अधम असतो. असा गुरू चोरटा, द्रव्याचा लोभी, दुष्ट, नीच व फसवा असतो. वैद्यकीचे ज्ञान नसणारा एखादा दुराचारी वैद्य रोग्याला सर्वस्वी लुबाडतो. तसेच रोग्याला भीड घालून शेवटी त्याचा घात करतो. तसे हे नामधारी गुरू असतात. ज्यांच्यामुळे भक्त व देव यांतील अंतर वाढते. जो भीड घालून भक्ताला देहबुद्धीच्या बंधनांत अधिकाधिक अडकवितो. असा गुरू नसावा. ज्याच्याजवळ शुद्ध ब्रह्मज्ञान व प्रत्यक्ष व्यवहारांत साधनेचे आचरण आहे. असा सद्गुरू आपल्याला आपले आत्मस्वरूप दाखवितो. काही गुरू आपल्या शिष्यांना मोठय़ा कौतुकाने प्रकाश, नाद, सुगंध यांचे अनुभव दाखवितात. काही शिष्याच्या कानात मंत्र सांगतात. इतकेच ज्ञान त्यांच्यापाशी असते, पण ते बिचारे भगवंतापासून दूरच असतात. शास्त्र प्रचिती, गुरुप्रचिती व आत्मप्रचिती ज्याच्यापाशी आहे, तोच उत्तम लक्षणांनी संपन्न अशी सद्गुरूची खूण आहे. ज्याला मोक्ष मिळवून घेण्याची इच्छा आहे, त्याने अशा सद्गुरूस शरण जावे. काही वेळेस एखादा माणूस वेदांत उत्तम प्रकारे सांगतो.
पण, मन मात्र इंद्रियसुखाला लालचावलेले असते. असा गुरू केल्याने आपले सार्थक होणार नाही. उत्तम वक्ता जसा प्रसंग तसा त्यात रंग भरतो; परंतु देहबुद्धीचे सारे संदेह नाहीसे होऊन त्याच्या अंतर्यामी आत्मज्ञानाचा जय झालेला नसतो. कोणत्या तरी वासनेने वेडी झालेली शब्दज्ञानी माणसे परमार्थ न साधल्यामुळे फुकट गेली. अशी माणसे बिचारी मरून गेली. ज्याला कशाचीही वासना असत नाही असा संत विरळाच असतो. सर्व लोकांहून त्याचे मत वेगळेच असते. तो अक्षय भगवंताबद्दलच बोलत असतो. यावरून असे दिसते की, जो अत्यंत निष्काम आहे, वासनारहित आहे आणि ज्याच्या बुद्धीमध्ये आत्मस्वरूपाविषयी दृढ निश्चय आहे, असा स्वानुभवी सद्गुरू या संसारसागरांतून पलीकडे नेतो. सद्गुरूला शुद्ध ब्रह्मज्ञान पाहिजे, हे सद्गुरूचे प्रथम लक्षण आहे. तो निश्चल समाधानी पाहिजे. आत्मस्वरूपात तो नेहमी स्थिर राहिला पाहिजे.
याचबरोबर तो अतिशय वैराग्यसंपन्न असतो. त्याचे मन कशातही गुंतलेले नसते. त्याचा स्वधर्माविषयी आचार अत्यंत निर्मळ असतो. त्याचे सद्गुरूजवळ बसून अध्यात्माचे श्रवण चालू असते. त्याच्यापाशी नेहमी हरिकथा व निरूपण चालते. ज्याठिकाणी नवविधा भक्ती आचरली जाते आणि साधनमार्गास महत्त्व दिले जाते, हे सद्गुरूचे लक्षण आहे असे समर्थ सांगतात. ज्या परमार्थामधे कर्म व उपासना या दोन्हींना जागा नाही. तेथे भ्रष्टाचार होण्याला सहज अवसर सापडतो. अशा लोकांचा परमार्थ खोटा असतो. प्रापंचिक लोक त्याला हसतात. सर्व प्रकारचे उत्तम गुण सद्गुरू लक्षण म्हणून मानावयास हरकत नाही. तरी सद्गुरूची बरोबर ओळख होण्यास इतर गुरूंबद्दल माहिती सांगणे जरुरीचे आहे. एक नुसता गुरू, तर एक मंत्रगुरू, एक यंत्रगरू तर एक तंत्रगुरू असतो. एक व्यायामाचा गुरू तर एखाद्याला राजगुरू म्हणजे राजाचा उपाध्याय म्हणतात. अशाप्रकारे समर्थानी गुरू आणि सद्गुरू यांच्यातील भेद स्पष्ट केलेला आहे.
॥ जय जय रघुवीर समर्थ॥