मुंबईहून बदलापूर येथील चंदेरी डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या अभिजित कदम (२४) याचा डोंगरावरून घरंगळत आलेला दगड डोक्यात पडल्याने मृत्यू झाला.
बदलापूर – मुंबईहून बदलापूर येथील चंदेरी डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या अभिजित कदम (२४) याचा डोंगरावरून घरंगळत आलेला दगड डोक्यात पडल्याने मृत्यू झाला. शनिवारी एका वृत्तसमूहातील ४८ जणांचा चमू चंदेरी गडावर ट्रेकिंगसाठी गेला होता.
त्या वेळी डोंगरावर अडकून पडलेल्या ३८ जणांची सुखरुप सुटका करण्यात यश आले असले तरी अभिजितच्या डोक्याला मार बसल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जवळपास १८ तासांच्या प्रयत्नानंतर सरकारी यंत्रणा आणि बदलापूरमधील अजिंक्य हायकर्सच्या प्रयत्नामुळे अभिजितचा मृतदेह चंदेरी गडाच्या सुळक्यावरून पायथ्याशी असलेल्या चिंचोली गावापर्यंत आणण्यात यश आले.
बदलापूरच्या सह्याद्री र्पवत रांगेतील चंदेरी किल्ला ट्रेकिंग करणा-यांना नेहमीच आकर्षित करत असतो. हा गड सर करण्यासाठी व वर्षासहलीचा आनंद लुटण्यासाठी एका वृत्तसमूहाच्या कार्यालयातील आजी-माजी कर्मचा-यांच्या ४८ जणांचा चमू चंदेरी गडावर दाखल झाला होता. या चमूत अभिजित कदमचाही समावेश होता. शनिवारी सकाळी चंदेरी गड सर करत असताना अचानक पावसाचा जोर वाढल्याने या चमूने दुपारी दोनच्या सुमारास डोंगर पुन्हा उतरण्यास सुरुवात केली.
त्या वेळी डोंगरावरून घरंगळत आलेला एक दगड अभिजितच्या डोक्यावर येऊन आदळल्याने तो जबर जखमी झाला. त्या वेळी त्याच्या मित्रांनी त्याच्यावर प्रथोमपाचार केले. त्यानंतर चंदेरी गडावरील पुजारी बाबांनी हळद लावून अभिजितच्या डोक्यातून होत असलेला रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र हा रक्तस्त्राव न थांबल्याने अभिजितचा मृत्यू ओढवला.
एकीकडे पावसाचा मारा आणि दुसरीकडे अभिजतच्या डोक्यातून रक्त वाहणे थांबत नसल्याने या चमूने पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधत मदत मागितली. त्यानंतर बदलापूर पोलिस चिंचोली गावात दाखल झाले. मात्र हा चमू गडावर असल्याने त्याना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तीन तास लागले. शनिवारी रात्री अकारापर्यंत पोलिस गडावर पोहोचले. त्यानंतर या चमूतील ३८ जणांना खाली उतरवण्यात आले.
उर्वरित काही जण अभिजितच्या मृतदेहाबरोबर गडावरच थांबले. उल्हासनगरचे प्रांत अधिकारी बी. जी. गावंड, अंबरनाथचे तहसीलदार अमित सानप, कुळगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय पोरे आणि अग्निशामक अधिकारी भावत सोनोने यांनी अजिंक्य ट्रॅकर्स व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने रविवारी सकाळी अभिजितचा मृतदेह खाली आणला. शवचिकित्सेसाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आला. याप्रकरणी कुळगाव पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.