सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाणार प्रकल्पाला असाच विरोध होत राहिला तर नाणारचा प्रकल्प अखेर गुजरातला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुंबई- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाणार प्रकल्पाला असाच विरोध होत राहिला तर नाणारचा प्रकल्प अखेर गुजरातला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कोकणातील राजकीय नेते नाणारच्या प्रकल्पाला विरोध करत आहेत. तेल काढण्याचा मोठा प्रकल्प सिंधुदुर्गमधील नाणार इथे आणण्याचा सरकारचा मनसुबा आहे. पण हा विरोध होत राहिला तर हा प्रकल्प गुजरातमध्ये जाईल.
मुख्यमंत्री म्हणाले, या प्रकल्पामुळे १ लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे. पण त्यामुळेच कोकणाच्या निसर्गाचे, मासेमारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल असा विरोधकांचा आक्षेप आहे. या विरोधाच्या पार्श्वभूमीवरच मुख्यमंत्र्यांनी हा सूचक इशारा दिला आहे.
अराम्को कंपनी भारताच्या पश्चिम समुद्र किना-यावर महाराष्ट्राच्या हद्दीतच ऑईल रिफायनरीचा प्रकल्प टाकू इच्छिते. म्हणूनच राज्य सरकारने त्यांना नाणारचा प्रस्तावही दिला आहे. या प्रकल्पाला केंद्र सरकारने दुजोरा दिला आहे. पण या प्रकल्पाला असाच विरोध वाढत कायम राहिला तर हा ३ लाख कोटींचा प्रकल्प कदाचित गुजरातलाही जाऊ शकतो.
तसेही गुजरात सरकारने यापूर्वीच संबंधीत कंपनीला आमंत्रित केले आहे. असा थेट संदेशच मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. याआधीही देशातील विविध राज्यातील प्रकल्प असेच गुजरातने ओढले आहेत. या प्रकल्पामुळे कोकणाचा औद्योगिक विकास शक्य आहे असे सरकारचे मत आहे. तर यामुळे कोकणाच्या निसर्गाची हानी होईल अशी विरोधकांची भूमिका आहे.
नाणार प्रकल्पातील ब-याच जमिनी नापीक आहेत, असे सरकारचे मत आहे. त्यामुळे आता हा प्रकल्प महाराष्ट्रात येतो का गुजरातला जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.