टॉवरमधील घरांचा देखभाल खर्च दोन ते अडीच हजार असल्याने चाव्या मिळूनही कामगारांचे एकही कुटुंब येथे राहत नसल्याचे समोर आले आहे.
मुंबई- तब्बल दोन दशकांच्या संघर्षानंतर गिरणी कामगारांना म्हाडाची घरे मिळाली. मात्र २४ माळ्यांच्या टॉवरमधील या घरांचा देखभाल खर्च दोन ते अडीच हजार असल्याने चाव्या मिळूनही कामगारांचे एकही कुटुंब येथे राहत नसल्याचे समोर आले आहे.
गेल्या वर्षी म्हाडाच्या सोडतीत ६ हजार ९२५ गिरणी कामगारांना घरे लागली. मुंबईतील १९ गिरण्यांच्या मोक्याच्या जागांवर १८ ते २४ माळ्यांच्या टॉवरमध्ये २२५ चौरस फुटांची ही घरे आहेत. आतापर्यंत ५५ कामगारांना घराच्या चाव्या मिळाल्या आहेत. मात्र ते अद्याप यामध्ये राहवयास गेलेले नाहीत. संपानंतर अनेक कामगार कुटुंबांची दुरवस्था झाल्याने त्यांना टॉवरमधील घरांचा अडीच हजार रुपये देखभाल खर्च देणे शक्य नाही. त्याऐवजी हेच घर भाडय़ाने दिले तर त्याचे १० ते १२ हजारांहून अधिक भाडे मिळाले तर बँकेचा हप्ता भरणे सोपे जाईल, असा विचार सध्या कामगारांकडून केला जात आहे.
गिरणी कामगारांना २४ मजल्यांच्या टॉवरमध्ये मिळालेल्या घरांचा देखभाल खर्च परवडणारा नाही हे खरे आहे. सरकारने लिफ्टमन म्हणून सरकारी माणूस व इतर सुविधा पुरवल्या तर देखभाल खर्चाचा प्रश्न सुटेल. – प्रवीण घाग, सरचिटणीस, गिरणी कामगार संघर्ष समिती