चालू वर्षापासून इयत्ता नववीच्या आणि मार्च २०१९ पासून दहावीच्या भाषा विषयाच्या तोंडी परीक्षा बंद करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतल्याने विद्यार्थ्यांबरोबर पालकवर्गानेसुद्धा या निर्णयाचे स्वागत केले आहे.
सन २०१६-१७ च्या परीक्षांपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषयाची गोडी निर्माण व्हावी, कोणत्याही भाषेचा वापर कृतीयुक्त व व्यवहारयुक्त व्हावा आणि विद्यार्थ्यांचे भाषा व्यवहारज्ञान वाढविण्यासाठी भाषेची प्रश्नपत्रिका बदलण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला होता. कोणतीही भाषा ही व्यवहारापुरतीच मर्यादित राहू नये हा त्या मागचा मूळ उद्देश होता. त्यामुळे भाषेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कृती पत्रिकेमध्ये करण्यात आले. हे केवळ विद्यार्थ्यांचे भाषा व्यवहारज्ञान वाढविण्यासाठी महत्त्वाचे पाऊल राज्य शिक्षण मंडळाने उचलले आहे.
भाषा या विषयासाठी २० गुणांची तोंडी परीक्षा आणि ८० गुणांची लेखी परीक्षा असे गुणांचे वर्गीकरण करण्यात आले होते. मात्र दरवर्षी वाढत जाणारा परीक्षेचा निकाल लक्षात घेऊन काही शिक्षण तज्ज्ञांनी नापसंती दर्शविली होती. त्यानंतर १४ जुलै, २०१७ रोजी राज्य शिक्षण मंडळाच्या पदाधिका-यांची पुणे येथे बैठक होऊन इयत्ता नववी व दहावीच्या परीक्षा पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये भाषा विषयासाठी १०० गुणांची परीक्षा घेण्याचे ठरले आहे. त्यामुळे शाळांकडून दिले जाणारे गुण आता बंद होणार आहेत. ही पद्धत येत्या वर्षापासून नववीसाठी लागू करण्यात आली असून पुढील वर्षापासून दहावीला करण्यात येणार आहे. तोंडी परीक्षेमुळे काही शिक्षक आपल्या मर्जीतल्या विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण देतात किंवा काही वेळा जाणून-बुजून काही विद्यार्थ्यांना कमी गुण दिले जातात, याची कुजबूज विद्यार्थी आणि पालकांमध्ये होत असते; परंतु कोणत्याही प्रकारचा रोश आपल्या मुलांवरती ओढून घेऊ नये म्हणून तक्रार करायला पालकवर्ग पुढे येत नाही. म्हणजे या सर्व गोष्टी गृहीत धरून विद्यार्थ्यांच्या हितासाठी राज्य शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला असे म्हणायला काहीच हरकत नाही. यासाठी राज्य शिक्षण मंडळाचे अभिनंदन करायला हवे.
इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षा बंद करून परीक्षा पद्धतीमध्ये बदल कशा प्रकारे करण्यात आला आहे, हे विद्यार्थ्यांबरोबर पालकांनी सद्धा समजून घेतले पाहिजे. पूर्ण भाषा विषयासाठी प्रत्येकी २० गुणांची तोंडी परीक्षा बंद करून १०० गुणांची लेखी परीक्षा करण्यात आली आहे. बीजगणित व भूमिती यांना अनुक्रमे ४० गुणांची लेखी व प्रत्येकी १० अंतर्गत मूल्यमापनासाठी गुण देण्यात येणार आहेत. विज्ञान भाग १ आणि विज्ञान भाग २ यांना सुद्धा ४० गुणांची लेखी व १० प्रात्यक्षिकांसाठी गुण देण्यात येणार आहेत. इतिहास-नागरिकशास्त्र ४० गुण, अर्थशास्त्र २० गुण व भूगोल ४० गुण अशी वर्गवारी करण्यात आली आहे. त्यामुळे माध्यमिक शाळांनी व इयत्ता नववी व दहावीमध्ये शिकत असणा-या विद्यार्थ्यांनी परीक्षा पद्धत समजून घेऊन त्यानुसार अभ्यास केला पाहिजे. तो सुद्धा आपला कल लक्षात घेऊन.
केवळ शिक्षण क्षेत्रातच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रामध्ये गरीब विद्यार्थ्यांची गळचेपी केली जात आहे. एक वेळ ज्या ठिकाणी ‘चाय तेथे न्याय’ असे सूत्र चालू होते. त्यानंतर टेबलाखालून देण्या-घेण्याचा प्रकार सुरू झाला. आता तर कामानिमित्त गेल्यावर ड्रॉवर उघडले जाते. त्यात करकरीत नोट पडली की ड्रॉवर बंद होते आणि तुमचे काम झालेच असेच समजा. ही सध्याची फॅशन झाली आहे. अशा फॅशनला एक प्रकारे आळा घालण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने असा निर्णय घेतला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
राज्य शिक्षण मंडळाने नववी आणि दहावीच्या अभ्यासक्रमातील भाषा विषयाची तोंडी परीक्षा बंद करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र यावर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांना सवलत असली तरी मार्च २०१९ पासून १०० गुणांची भाषा विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना सोडवावी लागणार आहे.
ब-याच ठिकाणी ओळखीच्या विद्यार्थ्यांना पूर्ण गुण दिले जायचे. तसेच, शाळेचा निकाल अधिक लावण्यासाठी तोंडी परीक्षेला संगनमताने काही विद्यार्थ्यांना पूर्ण गुण दिले जायचे. अशा अनेक चर्चा तोंडी गुणांमुळे गाडी अथवा ट्रेनमधील ग्रुपमध्ये रंगताना ऐकायला मिळतात. अशा काही तक्रारीही शिक्षण संस्थांकडे तसेच पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा सुजाण पालकांनी केल्या आहेत. नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना ८० गुणांप्रमाणे आता यापुढे १०० गुणांचा पूर्ण पेपर सुद्धा तीन तासात सोडवावा लागणार आहे. याचा चांगला परिणाम गरीब विद्यार्थ्यांवर होणार आहे. मंडळाच्या निर्णयामुळे त्यांना त्यांची गुणवत्ता सिद्ध करायला संधी मिळणार आहे.
थोडक्यात, तोंडी परीक्षा बंद केल्यामुळे गरीब विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर होऊन; त्यांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे त्यांची गुणांची पातळी उंचावण्यात मदत होईल. मात्र, काही शाळा आपला निकाल जास्त लागण्यासाठी तोंडी गुणांमध्ये जे प्रताप करतात त्यांना आळा बसेल.