भारत देश विविध जाती, धर्म आणि परंपरा राखणारा देश आहे. भारतीय समाजाचे वैशिष्टय़ बहुसांस्कृतिकता, बहुभाषिकता आहे. भारतात जवळजवळ चार-साडेचार हजार जाती आहेत. प्रत्येकांची आपापली वेगवेगळी प्रतीकं आणि वेगळी प्रार्थना पद्धती आहे. विभिन्न प्रकारची प्रार्थनास्थळं आहेत.
मुस्लिमांत भारतीय समाजरचनेनुसार जातीय उतरंड जरी असली, तरी धर्मग्रंथ एकच, प्रार्थनास्थळ मस्जिद आणि एकेश्वर कल्पना दृढ असली, तरी मुसलमान वेगवेगळ्या श्रद्धास्थानांही मानतात. त्यात पुन्हा तब्लीगी सुन्नी म्हणजे दोन वेगळे विचारप्रवाह आहेत. हे मुख्य प्रवाह म्हणूया, पण उपप्रवाह ही आहे. याचा तूर्त विचार बाजूला ठेवूया. तर.. सुन्नी म्हणजे पैगंबरांना शेवटचे प्रेषित मानणारे आणि न मानणारे तब्लीगी असे हे दोन मुख्य प्रवाह.
मुस्लीम समाजाच्या अंतर्गत संरचनेबद्दल समाजात अनेक प्रकारचे समज, गैरसमज आहेत. जसे हा समाज एकसंध आहे. या समाजात जातीयता, उच्च-नीच फरक नाहीत. समाजात असणा-या श्रद्धा, परंपरा, विरोध न करता पालन करतो. सर्व मुस्लिमांना बांधवांसमान मानतो. भाईचारा-धार्मिक आचरण म्हणजे एक प्रकारची मानसिकता असते. बंधुता, ष्टद्धr(7०)जुता समानता, नैतिकता, सत्यता, प्रामाणिकता कितीही कोणत्याही धर्माशी जरी जोडलेल्या असल्या, तरी ती त्या-त्या व्यक्तीच्या मानसिकतेवर आधारलेली असते. धर्म भलेही दुष्प्रवृत्तीला अनुमती देत नसेल, पण हे मानायचे का नाही हे शेवटी व्यक्तीच्या प्रवृत्तीवर अवलंबून असते. म्हणून तर मंदिरात बलात्कार होतात, मदरशात लैंगिक शोषण होते. चर्चच्या धर्मगुरूला बलात्काराच्या कृत्यात अटक होते, तर सांगायचा मुद्दा काय, तर व्यक्तीला धर्माच्या आधारे न जोखता, माणुसकीच्या कसोटीवर तपासणे अधिक हितकर.
आजच्या युगात तर एखाद्याच्या पत-प्रतिष्ठेचा विचार करताना त्याचा धर्म, त्याचे शिक्षण, त्याचा सुस्वभाव हे निकष दुय्यम असतात. प्रथम निकष त्याच्याकडे असणारी संपत्ती. त्यात त्याच्या गाडय़ा, घरे, घराची सजावट, इतर सुखसुविधा, वावरत असलेला समाज हे आधी पाहिले जाते. त्यांनाच समाजात विशेष दर्जा असतो. मुसलमान दाढीटोपीत वावरेल, नमाज अदा करेल, अगदी प्रामाणिकपणे जगेल म्हणून त्याची प्रत वाढत नाही. कायम अव्हेरले जाणे त्याच्या नशिबी!
भारताच्या एकूण लोकसंख्येत सर्वात मोठा अल्पसंख्याक गट म्हणजे जवळजवळ १३ टक्के वाटा असणा-या उत्पन्न गटात मोडतो. हाच समूह मुस्लीम समाजाचा कणा समजला जातो. हा कणाच अशिक्षित, काबाडकष्टात, अपु-या किंवा अत्यल्प सुविधेलाच जीवन म्हणून दररोज संघर्ष करत जगणं साजरं करतो. अंधश्रद्धा इथेही आहेतच. दर्गा मानणे, नवस करणे, नाडे बांधणे, बकरं कापून कंदोरी करणे, फालं म्हणजे पंचांग बघणे, ताईत गंडे करणा-या मौलानांवर अतिविश्वास असणे असे माननारे लोक यात आहेत. या ९५ टक्क्यातली २५ टक्के मुले एकतर शाळेतच जात नाहीत किंवा सातवी आठवीलाच शाळा सोडून पैसे कमावण्यासाठी रोजगाराच्या वाटा शोधतात. व्यसनाधीनता, अनुत्साह, निष्क्रियता ग्रासते. ताण असह्य झाला अथवा हतबलता, नाकारलेपणा, निराशा ब-याच जणांना धार्मिक बनवते. यामुळे आहे त्यात समाधान मानून ‘‘जैसी अल्लाहकी मर्जी’’ किंवा ‘‘अल्लाह देख लेगा’’ म्हणून आत्मसंतुष्टीचा मुखवटा चढवला जातो.
दुसरा गट मध्यमवर्गीय समुह. हा गट शिक्षणाच्या बाबतीत जाणूनबुजून उदासीनता घेणारा याला अफजलगट म्हणतात. शिक्षणापेक्षा धार्मिकतेला अधिक महत्त्व देणारा मध्यमवर्गीय सामान्य समूह. शिकूनही नोकरी मिळणार नाही, हा एक विचार आणि रोजीरोटी देणे अल्लाहचे काम आहे, हा दुसरा विचार शिक्षणापासून लांब ठेवण्यास कारण ठरतो. याच कारणाने जुजबी अथवा गरजेपुरते शिक्षण घेऊन विविध व्यवसाय, स्वयंरोजगार, छोटे विक्रेते म्हणून काम करणे अधिक पसंत करतात. कारण, हवे तेव्हा धंदा बंद करून नमाज, रोजे करता येतात. त्यामुळे मुस्लीम समाजापैकी ३.६ टक्के पुरुष आणि १.४ टक्के स्त्रिया पदवीपर्यंत मजल मारतात. मी इथे रियाज खैराबांदींची माफी मागून त्यांचा एक शेर थोडासा बदल करून सादर करते.
‘‘हमे इक खुदाके सिवा कुछ नजर नही आता।
निकल गये है बहोत दूर जुस्तजू-ए-जन्नतमे हम।।
आशादायक बाब इतकीच की, आजची परिस्थिती मुस्लिमात शैक्षणिक गरज आणि भान जागवतेय. लोकांना शिक्षणाचे महत्त्व उमजू लागलेले आहे. फार मोठा नाही तरी बदलाच्या दिशेने समाज जातोय. स्वत:ला उच्च जातीचा समजणारा, धनिकांचा श्रीमंतांचा एक गट म्हणजे ‘‘अश्रफगट’’ हा गट स्वत:ला परदेशातून येऊन भारतात स्थायिक झालेल्यांचे वंशज मानतो. श्रीमंती, खानदानी, परंपरांमुळे उच्च राहणीमान असणा-या या लोकांनी शिक्षण तर घेतलेच, पण मानाची आणि महत्त्वाची मोठमोठी पदेही भूषवली. स्वत:ला श्रीमंती थाटाच्या, सुशिक्षतेच्या सोनेरी चौकटीत राखण्यातच शान समजली. पहिला अरझल म्हणजे गरीब असहाय गटांकडे पाहण्याची यांना गरज वाटली नाही. हेही आपलेच बांधव आहेत, खुदाचेच बंदे आहेत, हा विचार आला नाही. त्यामुळे समाजाच्या कमतरतेत जगणा-या, हालाखीत राहणा-या लोकांच्या प्रगतीची, विकासाची तसदी यांनी घेतली नाही. म्हणजेच पुन्हा काय, तर धर्माची शिकवण काय म्हणते यापेक्षा धर्माला स्वत:च्या मर्जीनुसार, स्वत:च्या सोईनुसार वळवण्याची मानसिकता समाजात उच्च-नीच दरी सदैव जोपासत आहे. मग धर्म कोणताही असो.