पवई तलाव येथील म्हाडाच्या एक हेक्टर जमिनीवरील पॉपकॉर्न एटरप्राईझेस व जयकृष्ण या दोन कंपन्यांच्या वादातून म्हाडाने आता मार्ग शोधला आहे.
मुंबई- पवई तलाव येथील म्हाडाच्या एक हेक्टर जमिनीवरील पॉपकॉर्न एटरप्राईझेस व जयकृष्ण या दोन कंपन्यांच्या वादातून म्हाडाने आता मार्ग शोधला आहे. जमिनीचा वाद सध्या न्यायालयात गेल्याने म्हाडाने आता या जमिनीवर स्वत:च गृहयोजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत लवकरच उच्च न्यायालयासमोर म्हाडा आपली भूमिका मांडणार आहे. अशा प्रकारची भूमिका मांडण्याचा ठराव नुकताच प्राधिकरणाच्या बैठकीत करण्यात आला. न्यायालयाने म्हाडाच्या भूमिकेला हिरवा कंदील दिल्यास येथे सर्वसामान्यांसाठी सुमारे १ हजार घरे बांधता येणार आहेत.
१९९८-९९ला ही जागा जयकृष्ण एजन्सीला देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर विनियम १६ (१९९९)नुसार हा नियम रद्द करण्यात आला. त्यानंतर २००४मध्ये म्हाडाने या जागेसंदर्भात निविदा काढली. त्या वेळी पॉपकॉर्न या कंपनीने निविदा भरल्या. पॉपकॉर्नला ही जागा देण्याचे निश्चित झाले. पॉपकॉर्नने या जागेची नियमानुसार २५ टक्के रक्कमही भरली. मात्र दरम्यानच्या काळात यापूर्वीची एजन्सी न्यायालयात गेली. या जमिनीची पॉपकॉर्न रक्कम देण्यास तयार आहे, त्यापेक्षा जास्त रक्कम देण्याचे पूर्वीच्या कंपनीने सांगितले.
त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. या वादात जमीन अडकल्याने ही जागा दोन्ही कंपन्यांना न देता स्वत:च राबवली तर येथे गृहप्रकल्प उभारता येईल, असा विचार म्हाडाने केला. त्यानुसार प्राधिकरणाच्या बैठकीत ठराव झाला आहे. म्हाडा ही भूमिका आता न्यायालयासमोर मांडणार असून न्यायालय काय निर्णय घेते याकडे लक्ष आहे. पण म्हाडाची भूमिका न्यायालयाने मान्य केल्यास सर्वसामान्यांना परवडणा-या घरांचा मार्ग येथे मोकळा होणार आहे.