बॉलिवुडच्या निर्मात्यांच्या कल्पनेतून ‘टॅलेन्ट हण्ट’ साकारली आणि त्यातूनच बॉलिवुडचा पहिला सुपस्टार सापडला- राजेश खन्ना. धर्मेद्र, धीरजकुमार हे नायकही टॅलेन्ट हण्टमधूनच निर्मात्यांच्या हाताशी लागले. मराठी नाटय़सृष्टीत अलीकडच्या दोन दशकांमध्ये नाटय़संहितांची वानवा होती.
जाऊ द्या ना भाई
बॉलिवुडच्या निर्मात्यांच्या कल्पनेतून ‘टॅलेन्ट हण्ट’ साकारली आणि त्यातूनच बॉलिवुडचा पहिला सुपस्टार सापडला- राजेश खन्ना. धर्मेद्र, धीरजकुमार हे नायकही टॅलेन्ट हण्टमधूनच निर्मात्यांच्या हाताशी लागले. मराठी नाटय़सृष्टीत अलीकडच्या दोन दशकांमध्ये नाटय़संहितांची वानवा होती.
दिग्गज मराठी साहित्यिक, नाटककारांची मागची पिढी अस्ताला गेल्यावर तरुण, मध्यमवयीन नाटककारांमध्ये, अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढय़ाच नाटककारांनी मराठी रंगभूमी तगवली. पण, चांगल्या व व्यावसायिकदृष्टय़ाही सकस नाटय़संहिता फार क्वचितच हाताला लागल्या.
चांगल्या नाटय़संहिता नाहीत, म्हणून प्रेक्षकांनीही रंगभूमीकडे पाठ फिरवली. सुनील बर्वे यांच्या ‘हर्बेरियम’च्या प्रयोगानं, जुन्या चांगल्या नाटय़संहिता पुन्हा नव्यानं रंगमंचित झाल्या. त्याला रसिकाश्रयही चांगला मिळाला. पण म्हणून ‘नव्या’ चांगल्या नाटय़संहितेच्या मागणीची पूर्तता काही झाली नाही.
यातून मार्ग काढण्यासाठी मराठी नाटय़निर्मात्यांनी नव्या ‘दीर्घाकां’ची स्पर्धा घेण्याचं निश्चित केलं. नाटककारांसाठी नाटय़निर्मात्यांचं हे ‘टॅलेन्ट हॅण्ट’च म्हणा ना! या स्पर्धेसाठी त्यांनी सारा महाराष्ट्र पालथा घातला आणि नव्या दमाच्या, आश्वासक अशा नाटककारांसाठी एक व्यासपीठ उभारून दिलं.
या बॉलिवुडच्या धर्तीवरील टॅलेन्ट हण्टमध्ये ज्या निर्मात्यांना दीर्घाक आवडला, त्यात व्यावसायिक चमक जाणवली, आशयदृष्टय़ा, विषयानुसार नावीन्य जाणवलं, त्यात ‘नाटका’ची शक्यता वाटली.. अशा दीर्घाकांची दोन अंकी सशक्त नाटय़संहिता लिहायला लावून, नाटय़निर्मात्यांनी त्याचे व्यावसायिक स्वरूपात प्रयोगही केले.
सतीश तांबे यांच्या कथेवरून घेतलेला दीर्घाक ‘चुळबूळ’चं व्यावसायिक नाटय़ रूपांतर यापूर्वी आलं होतं आणि आता सुनील हरिश्चंद्र यांच्या ‘जाऊ द्या ना भाई’ या दीर्घाकाचं दोन अंकी नाटक करून ते निर्माते गोविंद चव्हाण यांनी आपल्या ‘सुप्रिया प्रॉडक्शन’तर्फे ‘कलार्पण’ आणि ‘व्ही.आर. प्रॉडक्शन’ यांच्या सहयोगानं व्यावसायिक रंगभूमीवर आणलं आहे.
एकांकिका स्पर्धेतून गाजलेल्या, लक्षणीय, प्रयोगक्षम एकांकिकांची नाटकं यापूर्वी अनेक आली, गाजली. त्यातील काहींनी इतिहास रचला. देवेंद्र पेम यांचं ‘ऑल दि बेस्ट’ हे त्याचंच उदाहरण. मात्र, एकांकिका अथवा एकांक/ दीर्घाक याचं नाटक करण्यासाठी त्यात शक्यता हवी, त्याचा जीव-आवाका मोठा हवा. प्रेमानंद गज्वी यांच्या एकांकिका गाजल्या, पण ‘घोटभर पाणी’चं नाटक नाही होऊ शकलं.
त्यांच्या ‘देवनवरी’चं झालं. एकांकिकेपेक्षा नाटकातील ‘देवनवरी’चा पट अधिक व्यापक होता. सुनील हरिश्चंद्र यांच्या ‘जाऊ द्या ना भाई’ या दीर्घाकाचा आवाका तसा मर्यादितच आहे. पण त्यातील अध्याहत आशय मात्र संवेदनशील रसिकांना विचार करायला भाग पाडतो. ‘भाई’पासून लपण्यासाठी, स्वत:ची सुटका करण्यासाठी पापभीरू सामान्य माणसं इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वांचा ‘आडोसा’ घेतात आणि ‘भाई’ला माणसात आणतात.. ही याची ‘वन’लाईन. गुंडाचं मतपरिवर्तन इतक्या सहजासहजी होत नाही. पण पोहोचलेल्या गुंडापेक्षा ‘लोकल भाई’ हा थोडी माणुसकी शाबूत असणारा, त्याच्या सदसद्विवेकबुद्धीला आवाहन केल्यावर आणि त्याच्या दुख-या नसेवर बोट ठेवल्यावर ‘भाई’ नरम पडतो. अर्थात, हा प्रवास ‘फॅण्टसी’च्या अंगानं नेल्यामुळे आणि नाटकासही थोडी फार्सिकल ट्रिटमेंट दिल्यामुळे त्याचं गांभीर्य उणं होतं.
एक मात्र नक्की, की सुनील हरिश्चंद्र यांना निव्वळ करमणुकीपेक्षा काही सांगायचंही आहे आणि ते सांगणं गंभीर आहे. शिक्षण, कलाक्षेत्र, प्रेमासारख्या नाजूक भावनेच्या स्तरावरही असणारं गुंडगिरीचं सावट नाटकभर राहतं. ज्युनिअर पावटय़ानं शर्मिलाचा विनयभंग केला म्हणून प्रोफेसर त्याच्या कानफटात लगावतात. यात गैर काय? पण तो लोकल भाईचा मुलगा, माजावर आलेला तो ‘भाई’लाच प्रोफेसरांना अद्दल घडवण्यासाठी बोलावतो. जिथं एकांकिकेची तालीम चालू आहे, तिथंच प्रोफेसर लपतात, वेषांतर करतात. तिथं भाई त्यांचा शोध घ्यायला येतो.
इथं कलावंत ‘प्रसंगावधान’ राखतात आणि आल्या प्रसंगाला कसे तोंड देतात, त्याचा आलेख म्हणजे हे ‘धमाल’ नाटक. त्यातही लेखकानं मध्येच ‘धक्के’ देत, अडचणी उभारत ‘नाटय़’ पुढे नेलं आहे, ते दाद देण्याजोगं. पात्रांची स्वभाव वैशिष्टय़ंही या रंगकथेत भरच टाकतात. उदा. नंदूचं ‘खरं’ बोलणं, पावटय़ा भाईचं ‘बसताना’चं अवघडलेपण, नीलेशचं सुभाषबाबूंच्या वेषातही फेंगडं चालणं, पात्रांनी तेच तेच संवाद पुन:पुन्हा म्हणणं. वगैरे, पण एकूणच मनोरंजनाबरोबर एक विधान त्यांना करावंसं वाटणं, हे महत्त्वाचं.
याचं दिग्दर्शनही सुनील हरिश्चंद्र यांनीच केलंय. पूर्वाकातील बराचसा भाग हा एकांकिकेच्या तालमीचा आणि गोंधळाचा. त्याचा वेग, त्यातील ऊर्जा आणि चैतन्यमय बांधणी लक्षणीय आहे. म्हणूनच हा पूर्वाकातील भाग पावटय़ाभाई येईपर्यंत लांबलेला असला तरीही मनोरंजक वाटतो. (त्यात अनावश्यक भागास, रिपिटेशनला कात्री लावली, तर तो अधिक सुटसुटीत होईल.) पात्रांच्या लकबी, विशेषत: त्या त्या पात्रांची व्यक्तिमत्त्वं हास्यकारक करतात. उदा. भगतसिंगाची मान तिरपी असणं, सुभाषचंद्रांचं फेंगडं चालणं, राणी लक्ष्मीबाईनं घोडय़ावरून जाणं, यमाचा आक्रस्ताळेपणा (दशावतारातील शंकासुरास शोभणारा).. वगैरे.
नेपथ्याचाही वापर त्यांनी कल्पकतेनं केलाय. विशेषत: पावटय़ाभाईपासून लपताना. मात्र नीलेशनं लघवी आवाक्याबाहेर जातेय, असं घेतलेलं बेअरिंग मध्येच सोडून दिलंय. तीच गोष्टी पावटय़ाभाईची, पाईल्सचा त्रास बसताना सुरुवातीलाच होतो. नंतर होत नाही. ती धारणाही कायम राहायला हवी. त्यातून ‘हसे’ वसूल व्हायला हवेत.
संदेश बेंद्रे यांनी फार्सिकल नाटय़ास अनुरूप अन् नाटय़ाशयाच्या मागणीनुसार नेपथ्य रचना केलीय. श्याम चव्हाण यांनी प्रकाश योजना नीटशी केली होती. अपर्णा गुराम यांची वेशभूषा लक्षणीय. विशेषत: पावटय़ाभाईच्या पायातील करकरणा-या कोल्हापुरी चपला. वैभव परशेटय़े यांची रंगभूषाही अप्रतिम. संतोष पोटे यांनी शीर्षकगीतास लावलेली चाल श्रवणीय आहे. हे नाटक लक्षणीय झालंय ते कलावंतांच्या अभिनयामुळे. एक सुनील जाधव सोडल्यास एकही कलावंत अनुभवी नाही.
म्हणूनच असेल कदाचित, यातील प्रत्येक कलावंतानं आपल्याकडून १०० टक्के देण्याचा प्रयत्न केलाय. संदीप रेडकर (नीलेश, सुभाषचंद्र बोस), गौरव मालवणकर (दिग्दर्शक, यम), श्रीकांत भगत (गोपी, भगतसिंग), तुषार विचारे (प्रोफेसर, गांधी), पूर्वा कौशिक (ऊर्मिला, कस्तुरबा), ऐश्वर्या पाटील (शर्मिला, राणी लक्ष्मीबाई), रोहित माने (नंदू), प्रथमेश शिवलकर (ज्युनि. पावटय़ा) यांच्या भूमिका चैतन्यदायी होत्या. त्यांच्यातील ऊर्जा लक्षणीय. पावटय़ाभाईचा ‘दरारा’, त्याचं नंतरचं परिवर्तन सुनील जाधव यांनी सफाईनं दाखवलं. इन्स्पेक्टरच्या भूमिकेचा त्यांचा शिक्का या भूमिकेनं पार पुसून टाकला. या टीमवर्कनं ‘जाऊ द्या ना भाई’ लक्षणीय केलंय.