आई-वडील नसलेल्या किंवा आपली मुले चांगल्या त-हेने सांभाळू न शकणा-या पालकांच्या मुलांना करडे महाराज यांनी एकत्र केले आणि या मुलांचे ते पप्पा झाले आहेत. या मुलांच्या मध्ये ‘ध्रुवा’सारखे अढळ यश मिळविण्याची जिद्द आणि ‘श्रावण बाळा’सारखा सेवाभाव निर्माण व्हावा, असा माझा प्रयत्न आहे, असे राजू महाराज विनम्रपणे सांगतात.
अढळपदावर पोहोचलेल्या ध्रुवबाळाची कथा सर्वांनाच भावते. उत्तानपाद राजाचा हा मुलगा. उत्तानपाद राजाला दोन पत्नी होत्या. एक सुनीती आणि दुसरी सुरूची. दोघींनाही एक एक मुलगा होता. सुनीतीच्या मुलाचे नाव ध्रुव होते. तर सुरूचीच्या मुलाचे नाव उत्तम होते. सुरूची ही राजाची आवडती पत्नी असते. म्हणून ती राजासोबत महालात राहत असते. तर सुनीती जरा कमी आवडणारी असते. ती जरा राजवाडय़ापासून दूर राहत असते. एकेदिवशी राजा दरबारात बसलेला असताना, ध्रुव आणि उत्तम राजाच्या मांडीवर बसलेले होते. ते सुरूचीने पाहिले. आपल्या पतीच्या मांडीवर सवतीचा मुलगा बसलेला पाहून तिला संताप आला. तिने भरदरबारात ध्रुवाला वडिलांच्या मांडीवरून खाली उतरवले. त्याचे ध्रुवाला खूप वाईट वाटले. त्याने रडत जाऊन घडलेला प्रकार आपली आई सुनीतीला सांगितला. तिलाही खूप वाईट वाटले. तेव्हा ध्रुवाने ‘‘मला अशा ठिकाणी बसायचे आणि की, जिथून कुणी उठविणार नाही, अशी जागा मला कोण देईल?’’ असा प्रश्न आईला विचारला. प्रत्येक आई मुलाची समजूत काढताना देव तुला देईल म्हणते, तशीच सुनीती म्हणाली. त्यावर ध्रुव जंगलात तपश्चर्येला गेला आणि त्याला अढळपद मिळाले. तोच ध्रुवाचा तारा आकाशात दिसतो, अशी कथा आपण अनेकदा ऐकली आहे. यातून आपल्याला ध्रुव बाळाची जिद्द दिसून येते. पण, पुराणातली कथा खरे तर आपल्यातच असते. आपल्याला चांगले करण्याची प्रेरणा देणारी एक बुद्धी असते, तर काहीही करून चांगले भोग आपल्याला भोगायला मिळाले पाहिजेत, असा मोह दाखविणारी दुसरी बुद्धी असते. चांगले काम करण्याची प्रेरणा देणारी हीच ‘सुनीती’ असते. सुनीतीने वागणे अवघड असते. मात्र त्या कठीण प्रसंगातून आपण धीराने वाटचाल केली, तर मिळणारे यश हे ध्रुव बाळासारखे अढळ असते. मात्र, नितीहीन होऊन ‘सुरूची’चा भोग घेणे आपल्याला उत्तम वाटते. म्हणून सुरूचीच्या मुलाचे नाव ‘उत्तम’ आहे. पण, भोगाच्या आहारी जाऊन नितीहीन जीवन जगले, तर ते तकलादू ठरू शकते. म्हणून ध्रुवासारखे अढळ यश मिळविण्यासाठी सुनीतीने जगणे महत्त्वाचे. हा या गोष्टीचा खरा संदेश आहे. ह.भ.प. राजू महाराज करडे यांनी अलीकडेच अनाथ मुलांसाठी ‘ध्रुव’ नावाचा आश्रम सुरू केला आहे. ध्रुव नाव देण्यामागे या विद्यार्थ्यांमध्ये ‘सुनीती’ जागृत राहावी आणि त्यांनी जीवनात चांगला नागरिक होण्यासाठी प्रयत्न करावेत, असा उद्देश असल्याचे ते सांगतात.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे ‘ध्रुव’ आश्रम सुरू करण्यात आला आहे. खरे तर राजू महाराज करडे यांनी यापूर्वी ‘श्रावण बाळ आश्रमा’ची स्थापना केलेली आहे. हा त्यांचा दुसरा उपक्रम आहे. कीर्तनानिमित्त इंदापूर तालुक्यात गेलो, तेव्हा ‘श्रावण बाळ आश्रमा’ला भेट दिली होती. सुंदर अशा राम मंदिरच्या आवारातच हा आश्रम आहे.
आई-वडील नसलेल्या किंवा आपली मुले चांगल्या त-हेने सांभाळू न शकणा-या पालकांच्या मुलांना करडे महाराज यांनी एकत्र केले आणि या मुलांचे ते पप्पा झाले आहेत. यातील मुले आई-वडिलांपासून दुरावलेली असली तरी आपण ‘अनाथ’ आहोत, ही भावना त्यांच्या मनाला शिवणारही नाही, अशा तऱ्हेने राजू महाराज त्यांची काळजी घेतात. याची प्रचिती आश्रमामध्ये प्रवेश केल्याबरोबर लगेच येते. ‘मुलांना भेटवस्तू, कपडे देताना फोटो काढू नयेत’ असा फलक आपल्याला पाहायला मिळतो. हा फलक पाहिल्यानंतर माझ्या मनात कुतूहल निर्माण झाले की, या मागे काय उद्देश असावा. अत्यंत स्वच्छ प्रांगण पार करून आम्ही आश्रमाच्या कार्यालयात पोहोचलो. तिथली रचनाही तितकीच नीटनेटकी होती. प्राथमिक बोलणे झाल्यानंतर मी माझ्या मनातील फलकाबाबतची शंका त्यांना बोलून दाखविली. तो बाहेरचा फलक का लावला आहे, असे विचारले, तेव्हा राजू महाराज किंचित हसले. ते म्हणाले की, या मुलांमध्ये आत्मविश्वास जागवायचा आहे. स्वाभिमान निर्माण करायचा आहे. ते जर करायचे असेल, तर आपण कुणी तरी दुर्लक्षित अहोत, आपल्या घराच्यांना जड झाल्यामुळे इथे आलेले आहोत, ही अपराधी भावना त्यांच्या मनालाही शिवू नये, असा माझा प्रयत्न आहे; परंतु काही लोक ‘अनाथ आश्रम’ समजून येतात आणि आपल्या दातृत्वाचा टेंबा मिरविण्याचा प्रयत्न करतात. मुलांना काहीतरी छोटीशी भेट आणायची. ती मुलांच्या हातात देताना फोटो काढायचे. ते सोशल मीडियावर व्हायरल करायचे. असल्या प्रसिद्धी लोलूप लोकांमुळे माझ्या मुलांच्या मनात आपण ‘अनाथ’ आहोत, अशी भावना निर्माण होण्याची भीती मला वाटते. म्हणूनच कुणालाही वाईट वाटले तरी चालेल, संस्थेला दोन पैसे देणगी कमी मिळाली तरी चालेल, पण मी माझ्या मुलांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचू देणार नाही, असे करडे महाराज निर्धाराने सांगत होते. या निर्धारातूनच आता ध्रुव या दुस-या उपक्रमाचा जन्म झाला असल्याचे त्यांनी सांगितले. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या राजू महाराज करडे यांनी संगीत शिक्षक म्हणून मिळालेली नोकरी सोडून हे आव्हान स्वीकारले आहे. याबाबत मी त्यांना विचारले असता ते म्हणाले की, मी आळंदीत वारकरी शिक्षण घेत होतो. माझ्या बरोबर एक विद्यार्थी शिकायला होता. त्याची आई वारली होती. वडिलांनी दुसरे लग्न केले. मग तो माझा मित्र आणि त्याच्या बहिणीचा सावत्र आईकडून छळ होऊ लागला. वडिलांना खरे तर हे पाहवत नव्हते. त्यांनी माझ्या मित्राला आळंदीत आणून सोडले. घरी बहीण राहिली. तिचा छळ सुरू होता. मुलांसाठी आळंदीत सोय होती. पण, मुलींसाठी सोय नव्हती. तेव्हा तो माझा मित्र आपल्या बहिणीची आठवण काढून खूप रडायचा. मध्येमध्ये जाऊन भेटून यायचा. तेव्हाच मी निर्धार केला होता, की जेव्हा आपण स्थिरस्थावर होऊ तेव्हा अशा अडचणीत असलेल्या मुला-मुलींसाठी (तिथेही राजू महाराज अनाथ शब्द वापरीत नाहीत.) काही तरी करायचे. आळंदीतील गायन-मृदंगवादन आणि कीर्तनाचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला एका शाळेत संगीत शिक्षकाची नोकरी मिळाली. जीवन स्थिरस्थावर होत असतानाच मी केलेला संकल्प आठवला आणि त्यातून मग नोकरीला रामराम करून ही संस्था काढली. खूप चांगली मुले मिळाली. अत्यंत गोड आहेत. त्यांचा आई आणि बाप मीच आहे, असे राजू महाराज सांगतात.
‘श्रावण बाळ’मध्ये मुलींची संख्या जास्त होती. चार-पाच मुलेही होती. आश्रमातील मुलांची संख्याही आता वाढते आहे. म्हणून आता ‘ध्रुव’ची स्थापना केली आहे. येथे मुलांची स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. कामामधील एकंदर प्रामाणिकता पाहून अनेक मदतीचे हात पुढे येतात. ‘श्रावण बाळ’मध्ये सर्वात लहान मुलगी साक्षी आता साडेतीन वर्षाची आहे. तर, मोठी मुलगी बारा वर्षाची आहे. जवळच असलेल्या शाळेत या मुली जातात. त्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळावे, यासाठी खासगी शिकवणीही लावली जाते. साडेतीन ते सात वर्षापर्यंतच्या मुलांचे केस विंचरणे, ड्रेस नीटनेटके ठेवले ही कामे राजू महाराज स्वत: लक्ष घालून करतात. शालेय शिक्षणाबरोबर खेळ, गायन, व्याख्यान अशा व्यक्तिमत्त्व विकासावरही लक्ष दिले जाते. एकंदरच या मुलांच्या मध्ये ‘ध्रुवा’सारखे अढळ यश मिळविण्याची जिद्द आणि ‘श्रावण बाळा’सारखा सेवाभाव निर्माण व्हावा, असा माझा प्रयत्न आहे, असे राजू महाराज विनम्रपणे सांगतात. त्यांच्या जिद्दीला सलाम.