भाऊ व वहिणीकडून सतत मारहाण व शिवीगाळ होत असल्याने छळाला कंटाळलेल्या नणंदेने रात्री गाढ झोपेत असलेल्या वहिनीच्या पोटात सुरा खुपसून तिची हत्या केली.
बोईसर- भाऊ व वहिणीकडून सतत मारहाण व शिवीगाळ होत असल्याने छळाला कंटाळलेल्या नणंदेने रात्री गाढ झोपेत असलेल्या वहिनीच्या पोटात सुरा खुपसून तिची हत्या केल्याची घटना तालुक्यातील चित्रालय परिसरात नुकतीच उघडकीस आली आहे. 14 ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली आहे. बोईसर पोलिसांनी या घटनेचा छडा लावताना वहिनीच्या हत्येप्रकरणी 16 वर्षीय नणंदेला ताब्यात घेतले आहे. ती अल्पवयीन असल्याने तिची रवानगी बालसुधारगृहात करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितल़े
तारापूर औद्योगिक वसाहतीत पाल फॅशन या खासगी कंपनीत सुपरवाझर असलेल्या वीरेंद्र प्रसाद (27) मूळगाव दिघवा, गोपाळगंज, बिहार हा चित्रालय परिसरात स्नेहनगर येथे पत्नी पूनमदेवी व दोन लहान मुलांसह राहतात. दहावी नापास असलेल्या वीरेंद्रची बहीण रेशमाकुमारी (16) हिचे दुस-याच जातीच्या मुलासोबत प्रेमसंबध जुळले होते. त्याला घरातील मंडळींचा विरोध होता.
रेशमाकुमारीने त्याच्यासोबत दिल्लीला पळून जाऊन लग्नही केले होते. मात्र हे लग्न मान्य नसल्याने तिच्या घरातील मंडळींनी तिला पुन्हा घरी आणले. त्यानंतर काही दिवसांनी तिला बोईसर येथे भाऊ वीरेंद्रच्या घरी सोडण्यात आले. वीरेंद्रच्या घरी आलेल्या रेशमाकुमारीला घराबाहेर पडण्यासही अटकाव घालण्यात आला होता. त्याशिवाय वहिनी व भावाकडून तिला सतत मारहाण, घरकामांसाठी राबवून घेणे, शिवीगाळ असा त्रास होत असल्याने ती प्रचंड तणावाखाली वावरत होती. वहिनी पूनमदेवीकडून सतत होणा-या मारहाणीला रेशमाकुमारी कंटाळली होती. त्यामुळे त्याचा सूड घेण्यासाठी तिने तिच्या शेजारीच राहणा-या एका मुलीला 50 रुपये देऊन भाजी कापण्यासाठी चाकू विकत आणण्यास सांगितले.
14 ऑगस्टच्या रात्री भाऊ नोकरीवर गेल्यानंतर रेशमाकुमारीने डाव साधत रात्री दीडच्या सुमारास गाढ झोपेत असलेल्या पूनमदेवीवर चाकून वार केले. त्यावेळी रक्ताच्या थारोळय़ात विव्हळत पडलेल्या आईचा आवाज ऐकून तिच्या शेजारी झोपलेली दोन मुले जागी झाली. त्यांनी आरडाओरडा केल्यावर शेजारच्यांनी पूनमदेवीला जखमी अवस्थेत रुणालयात नेले. पण उपचारापूर्वीच तिला मृत घोषित करण्यात आले.
कसा झाला गुन्ह्याचा उलगडा?
14 ऑगस्टच्या रात्री गस्तीवर असलेले पोलिस निरीक्षक उत्तम सोनावणे यांना या घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी तपास मोहीम सुरू केली. ही घटना घडली तेव्हा घटनास्थळी असलेल्या रेशमाकुमारीने दिलेल्या जबानीत काळय़ा कपडय़ात आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी दरवाजा ठोठावला. त्यावेळी दार उघडण्यासाठी गेलेल्या वहिनीवर त्यांनी खुनी हल्ला चढवल्याचे सांगितले. मात्र रेशमाकुमारीचा हा बनाव असल्याने पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर तिने हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिस निरीक्षक सोनावणे यांनी सांगितले.