नागपंचमी दिवशी नागाला दूध पाजण्यासाठी जंगलातून किंवा गारुडयाकडून मंदिराच्या ठिकाणी आणले जात असल्याची प्रथा होती. पण असे प्रकार कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
मुंबई – नागपंचमी दिवशी नागाला दूध पाजण्यासाठी जंगलातून किंवा गारुडयाकडून मंदिराच्या ठिकाणी आणले जात असल्याची प्रथा होती. पण असे प्रकार कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. नागाला दूध पिणे आवडत नाही.
परंतु परंपरेनुसार नागपंचमीच्या दिवशी नागाला दूध पाजणे शुभ मानले जाते. त्यामुळे कित्येकदा गारुडी नागाला चोरून पकडतात. आणि त्याच्या शरीरातील विषाची पिशवी व दात तोडतात. त्यामुळे नागाचा अशक्तपणामुळे मृत्यू ओढवतो.
मात्र, सर्पमित्रांच्या प्रबोधनामुळे नागाची ही छळवणूक कमी झाल्याचे सर्पमित्र भरत जोशी व वैभव कुलकर्णी यांनी सांगितले आहे. नागपंचमीनिमित्त नागाला जिवंत पकडण्यापेक्षा त्यांच्या मूर्तीची भाविकांनी पूजा करावी, असे आवाहन सर्पमित्रांकडून करण्यात आले आहे.
यंदा नागांना पकडण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट झाल्याचे सर्पमित्र भरत जोशी यांनी सांगितले. २००८ सालापासून आजतागायत नागाची शारीरिक हेळसांड करून दूध पाजण्याच्या घटना कमी झाल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
नागांचे खेळ मुळात कालबाह्य झाल्याने गारुडय़ांचे प्रमाण कमी झाले आहे. शिवाय प्रत्येक वर्षी ठाणे वनविभागाकडून नागपंचमीदिवशी नागांच्या बचावासाठी फिरते पथक नेमले जाते. त्यामुळे गारुडय़ांवर चांगलाच वचक असल्याचे जोशी यांनी सांगितले. हेच मत सर्पमित्र वैभव कुलकर्णी व निसर्ग विज्ञान संस्थेचे सचिव वैभव कुलकर्णी यांनी अधोरेखित केले.
गेल्या काही वर्षात सर्पमित्रांनी अत्यंत जागरूकतेने नागाच्या या त्रासाला कमी केले आहे. याचे यश कुलकर्णी यांनी पोलिस यंत्रणेलादेखील दिले. मात्र, मांडूळ जातीच्या बिनविषारी सापाची तस्करी दिवसेंदिवस वाढत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. हा साप गुप्तधनाचा शोध लावतो. या गैरसमजुतीपोटी मांडोळाची मोठय़ा प्रमाणात तस्करी होते.तस्करी व अवैध व्यापारामुळे ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे मांडूळ या सापाला नैसर्गिक अधिवासात मोकळे सोडण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.