कुठल्याही परिस्थितीमध्ये राजापूरमध्ये येऊ घातलेला नाणार रिफायनरी प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही, असे आमदार नितेश राणे यांनी ठणकावून सांगितले.
मुंबई- कुठल्याही परिस्थितीमध्ये राजापूरमध्ये येऊ घातलेला नाणार रिफायनरी प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही, असे आमदार नितेश राणे यांनी ठणकावून सांगितले. जर तशी कोणी हिंमत केली तर तो कसा मोडून काढायचा हे आम्हाला चांगले ठाऊक आहे, असा त्यांनी इशारा दिला. ते दादर चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आले असता माध्यमांशी बोलत होते.
नितेश राणे यांनी नाणार प्रकल्पाबाबत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, की कुणी कितीही एमओयू करू देत पण नाणार प्रकल्प होणार नाही. तसेच एमओयूमध्ये कुठेही हा प्रकल्प कोकणात होणार, असे लिहिलेले नाही. कोकण सोडून प्रकल्प कुठेही करा आमचा त्याला विरोध नाही. पण कोकणात हा प्रकल्प नको, असे त्यांनी स्पष्ट केले.
नाणार प्रकल्पाचे पाप हे शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचे आहे. जर यांनी आधीपासूनच विरोध केला असता तर आज ही वेळच आली नसती. त्यामुळे आता उद्धव ठाकरे शेंबड्या पोरासारखे रडत आहेत, असा टोमणा त्यांनी लगावला.
नितेश राणे म्हणाले, की जर कोकण आहे, तर आम्ही आहोत. कोकणमुळेच आम्हाला अस्तित्व आहे. त्यामुळे या प्रकल्पाला आम्ही कायम विरोध करत राहू, त्यासाठी आम्हाला कोणतीही राजकीय किंमत चुकवावी लागली तरी चालेल.