पाणथळ जमिन नष्ट झाल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये पूरजन्य परिस्थिती ओढावल्याचे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (बीएनएचएस) म्हटले आहे.
मुंबई – पाणथळ जमिन नष्ट झाल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये पूरजन्य परिस्थिती ओढावल्याचे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (बीएनएचएस) म्हटले आहे. गेल्या काही वर्षापासून बीएनएचएसकडून काश्मीरमधील द-यांचा अभ्यास सुरू आहे.
तेथील व्यावसायिक कामांमुळे तेथील नैसर्गिक रचनेत मानवाने बदल घडवून आणले. परिणामी आज जम्मू-काश्मीरवर पूरजन्य परिस्थिती ओढावली, असे बीएनएचएसकडून सांगण्यात आले. त्यामुळे केवळ काश्मीरपुरतेच मर्यादित न राहता आता देशभर पाणथळ जमीन संवर्धन कायद्याची अंमलबजावणी करा, अशी मागणी बीएनएचएसने केली आहे.
काश्मीर खो-यातील दाल सरोवरातील दलदलीच्या परिसरातील बदलांमुळे सरोवरातील सुमारे १ हजार २०० हेक्टर जमीन नामशेष झाली आहे. सरोवराच्या जवळपास निम्म्या जमिनीवर हे बदल दिसून आले आहेत. श्रीनगर येथील वुलर सरोवर कधीकाळी २० हजार २०० हेक्टपर्यंत विस्तृत पसरलेले होते.
परंतु या सरोवरातील दलदलीची जमीनही आता दोन हजार चारशे हेक्टपर्यंत आली आहे. गेल्या तीस वर्षातील बांधकाम पाहता काश्मीर खो-यातील जवळपास ५० टक्के पाणथळ जमिनी नष्ट झाल्या आहेत किंवा त्यांच्यावर आक्रमण झाले आहे. पाणथळ जमिनी पाण्याचे अतिप्रमाण शोषून घेतात. त्यामुळे ते स्पंजसारखे काम करतात, असे बीएनएचएसचे संचालक डॉ. असद रहमानी यांनी सांगितले.
काश्मीर येथील सरकारच्या चुकीच्या विकास योजनांमुळे ही परिस्थिती ओढावल्याचे ताशेरेही बीएनएचएसने ओढले. बेट झाडांच्या लागवडीसाठी वुलर सरोवरातील बहुतांश भागावर वन विभागाकडून आक्रमण करण्यात आले.
काश्मीरच्या दरी-खो-यातील पाणथळ जमिनींचे अस्तित्व आज टिकून राहिले असते तर एवढय़ा मोठय़ा प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली नसती. या प्रकोपाला पर्यावरणहानीही म्हणता येईल.
– डॉ. असद रहमानी, संचालक, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी