पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले, तरी मान्सून म्हणावा तसा जोर धरत नसल्याने मुंबईकरांना उकाड्याला सामोरे जावे लागते आहे.
मुंबई- ‘दाटून येणारे ढग, मधेच जोर धरणारे वारे, अंधारलेले वातावरण..’ अशी पाऊस येण्याची ‘लक्षणे’ दिसत असली तरी एखाद्-दुस-या सरीनंतर निरभ्र होणा-या आकाशामुळे यंदा पावसाने मुंबईकरांचा भ्रमनिरासच केला आहे. काही दिवस मान्सूनसाठी पोषक वातावरणनिर्मिती होत नसल्याने तो ठेंगा दाखवत असल्याचे मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्रातील शास्त्रज्ञांनी सांगितले. अजून काही दिवस हीच स्थिती कायम राहणार आहे. मात्र केरळच्या दक्षिणेकडे निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकल्यास दोन दिवसांत मान्सून सक्रिय होऊ शकतो, अशी माहितीही केंद्राकडून देण्यात आली.
पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले, तरी मान्सून म्हणावा तसा जोर धरत नसल्याने मुंबईकरांना उकाड्याला सामोरे जावे लागते आहे. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ातही पावसाने जोर धरलेला नाही. या भागातही फक्त तुरळक सरींनीच हजेरी लावली आहे. याबाबत मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राचे शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, अरबी समुद्रात तसेच बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठी आवश्यक वातावरणनिर्मिती झालेली नाही. दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीपासून केरळ किनारपट्टीपर्यंत तयार झालेला कमी दाबाचा पट्टा कायम आहे. परंतु त्याची तीव्रता खूपच कमी आहे. त्यामुळे मान्सूनसाठी आवश्यक असलेले वारे आणि आद्र्ता खेचण्यास ते निष्क्रिय ठरत आहेत. परिणामी पाऊसही हुलकावणी देत आहे.
मान्सूनसाठी पोषक वातावरण नाही
मान्सूनसाठी आवश्यक असलेले जास्त तीव्रतेचे कमी दाबाचे पट्टे व पोषक वातावरण पावसाळ्यात पाच ते सहा वेळा तयार झाले होते. यंदा मात्र पावसाळा सुरू होऊन अडीच महिने झाले तरी एकदाही अशी आवश्यक वातावरणनिर्मिती झालेली नाही. मान्सूनसाठी आवश्यक स्थिती निर्माण झाल्यास मुंबईकरांना प्रतीक्षा असलेला मुसळधार पाऊस होऊ शकतो. परंतु सध्या तशी चिन्हे नाहीत.