विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारताच्या क्रिकेट संघाने ‘लंकादहना’चे लक्ष्य ठेवले आहे. मात्र पहिल्याच कसोटीत यजमानांनी पाहुण्यांना चांगलाच दणका दिला.
मुंबई – विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारताच्या क्रिकेट संघाने ‘लंकादहना’चे लक्ष्य ठेवले आहे. मात्र पहिल्याच कसोटीत यजमानांनी पाहुण्यांना चांगलाच दणका दिला.
सलामीलाच दणकून पराभव पाहावा लागल्याने भारताला वेळीच सावध फलंदाजी सुधारावी लागेल. फलंदाजी उंचावली नाही तर २२ वर्र्षानंतर श्रीलंकेला श्रीलंकेत हरवण्याचे भारताचे स्वप्न स्वप्नच राहील.
गॉलमधील पहिली कसोटी पाच दिवस चालणार नाही, हे पहिल्याच दिवशी नक्की झाले.
श्रीलंकेचा पहिला डाव अपेक्षेपेक्षा लवकर संपल्याने भारताची विजयाची शक्यता वाढली. दमदार फलंदाजी करताना आघाडी घेतल्याने तिस-या दिवशी उपाहारापर्यंत पाहुण्यांचे पारडे जड होते. परंतु, दिनेश चंडिमलने नांगर टाकला आणि श्रीलंकेने मोठी आघाडी घेतली. चंडिमलच्या खेळीमुळे यजमानांनी सामन्यात पुनरागमन केले.
भारतासमोरील १७६ धावांचे लक्ष्य फार मोठे नसले तरी गॉलची खेळपट्टी पाहता कठीण होते. त्यातच खेळपट्टीवर थांबण्याची तसदी भारताच्या फलंदाजांनी घेतली नाही. त्यामुळे खराब सुरुवातीनंतरही श्रीलंकेने विजय मिळवण्याची करामत साधली.
भारताला सलामीवीर मुरली विजय आणि आघाडीच्या फळीतील चेतेश्वर पुजाराची उणीव भासली. हे खरे असले तरी लोकेश राहुल, रोहित शर्माचे अपयश दुर्लक्षित करून चालणार नाही. मोठय़ा धावसंख्येची पायाभरणी करण्यासाठी दमदार सलामी आवश्यक असते. डावखुरा सलामीवीर शिखर धवनने थोडा संयम दाखवला तरी राहुलला संधीचे सोने करता आले नाही.
विजय दुखापतग्रस्त झाला नसता तर किमान पहिल्या दोन कसोटीमध्ये अंतिम संघात त्याचा समावेश झाला नसता. युवा राहुलला आपली क्षमता दाखवण्याची संधी होती. ऑस्ट्रेलियातील चमकदार पदार्पणानंतर त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. भारताकडे सध्या विजय, धवन, अजिंक्य असे मोजके सलामीवीर आहेत.
त्यात अजिंक्यला मधल्या फळीत प्राधान्य दिले जाते. लोकेश राहुलने एक लक्षात घ्यावे की, मोजके कसोटी सामने होतात. तेव्हा संघात निवड झाली तरी आपले स्थान कायम झाले, असे समजू नये. आपल्याकडे प्रचंड स्पर्धा आहे.
वनडे आणि टी-२० प्रकारात तुफानी फटकेबाजी करणा-या रोहित शर्माला कसोटी सामन्यात खेळवण्याची घाई का केली जाते, हेच समजत नाही. पारंपरिक क्रिकेट प्रकाराशी जुळवून घेण्यात त्यालाही अपयश येत आहे. गॉल कसोटीत दोन्ही डाव मिळून त्याला केवळ तेरा धावा करता आल्या. त्याच्या अपयशामुळे भारताच्या फलंदाजीचे ‘तीन तेरा’ वाजले.
श्रीलंका दौरा नव्हे तर बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीतही रोहितला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. गेल्या पाच डावांत केवळ एकच अर्धशतक त्याच्या नावावर आहेत. रोहितला अजिबात संधी देऊ नये, असे मला म्हणायचे नाही. मात्र चेतेश्वर पुजारासारखा ‘चिकटू’ फलंदाज असताना रोहितला प्राधान्य देणे, म्हणजे अतिच झाले.
चौथ्या दिवशी पहिले सत्र खेळून काढताना कमीत कमी विकेट गमावल्या असत्या तर भारताचा विजय नक्की होता. कारण दोन दिवस शिल्लक होते. गॉलमध्ये फिरकी गोलंदाजांचे चेंडू हातभर वळत होते. शिवाय बॅटवर येतही नव्हते. त्यावेळी पुजारा हवा होता. खेळपट्टीवर तासन् तास ठाण मांडण्यात तो तरबेज आहे. पहिल्या कसोटीत वगळून दुसरा राहुल द्रविड अशी ओळख बनवलेल्या पुजारावर अन्याय करण्यात आला.
दुस-या कसोटीपूर्वी मुरली विजय ‘फिट’ होईल की नाही, ठाऊक नाही. मात्र पुजाराला काहीही करून खेळवावे लागेल. पहिल्या कसोटीतील संघ कायम ठेवण्याचे धोरण भारताला महागात पडेल. अपयशासाठी केवळ लोकेश राहुल आणि रोहित शर्माला दोषी धरून चालणार नाही. फलंदाजी ढेपाळण्याला कर्णधार विराट कोहली, शिखर धवन, अजिंक्य रहाणे आणि वृद्धिमन साहाही तितकेच जबाबदार आहेत.
कोहलीलाही खेळपट्टीशी जुळवून घेता आले नाही. धवनने थोडा संयम दाखवला तरी दुस-या डावात त्याला झटपट खेळ करता आला नाही. ८३ चेंडूंचा सामना करताना केवळ २८ धावाच त्याला करता आल्या. ‘सेट’ झाल्यानंतर आक्रमक पवित्रा घेतला असता तर श्रीलंकेच्या गोलंदाजांवर थोडे दडपण आले असते.
अजिंक्य रहाणे दुस-या डावात थोडा टिकला. मात्र पहिल्या डावातील अपयशाचे काय? अजिंक्यकडून मोठी अपेक्षा आहे. मधल्या फळीची भिस्त त्याच्यावर आहे. यष्टिरक्षक वृद्धिमान साहाने पहिल्या डावात अर्धशतक मारले. मात्र सातत्य काय असते किंवा त्यासाठी काय करावे लागते, हे त्याला ठाऊक नसावे.
दुस-या डावात एकामागोमाग एक विकेट पडत असताना या पठ्ठय़ाने विकेट फेकली. ‘सेट’ होण्यापूर्वी रंगना हेरथला ‘फ्रंटफुट’वर जाऊन खेळण्याची काय गरज होती? लोकेश राहुलप्रमाणे साहाही सुदैवी आहे. नियोजित कर्णधार आणि यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीने कसोटीतून अचानक निवृत्ती घेतल्याने त्याला कसोटी खेळायला मिळाली. अन्यथा साहाला कुणी घेतले असते? अनेक वर्षानंतर कसोटी क्रिकेट खेळायला मिळतेय, याचा फायदा साहाने उठवावा.
भारताच्या ढेपाळलेल्या फलंदाजीला वनडे आणि टी-२० क्रिकेट कारणीभूत आहे. गेल्या आठ महिन्यात भारताने किती कसोटी खेळल्यात? श्रीलंकेतील गॉल कसोटी मिळून दोन. पाच दिवसांचे सामने फार कमी होतात.
त्यामुळे खेळपट्टीवर टिकून राहताना मोठा खेळ करण्याची सवय नाही. मात्र लवकरात लवकर कसोटी प्रकाराला जुळवून न घेतल्यास श्रीलंकेत तूर्तास कसोटी आणि त्यानंतर मालिका विजय मिळवणे, तितके सोपे नाही, हे विराट कोहली आणि सहका-यांनी लक्षात घ्यावे.