मुंबई – प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे. त्यासाठी अन्न मिळवणे महत्त्वाचे असते व त्याकरिता काम करावे लागते. रस्त्यांवरील फेरीवाले हे अशा कष्टक-यांपैकी असून, मोलमजुरी करून आपली रोजीरोटी मिळवतात. त्यांना मारहाण करणे चुकीचे असल्याचे स्पष्ट मत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले. माटुंग्याच्या व्हीजेटीआय कॉलेजच्या ‘टेक्नोवन्झा’ फेस्टिव्हलमध्ये ते बोलत होते.
यावेळी नानांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व विविध सामाजिक विषयांवर त्यांनी आपले विचार मांडले. फेरीवाल्यांवर कारवाई करण्यापूर्वी पालिका प्रशासनाने पुढाकार घेतला नाही. प्रशासनाच्या अशा कारभाराबद्दल आपण नागरिक म्हणूनही प्रशासनाला कधी विचारले नाही. त्यामुळे ही चूक प्रशासनाची आणि पयार्याने आपणा सर्वाचीच आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे घडल्या प्रकारचे खापर फेरीवाल्यांच्या माथी मारण्यात काही अर्थ नाही. फेरीवालाही माणूसच आहे, जगण्यासाठी त्याचीही धडपड सुरू असते.
त्यामुळे फेरीवाल्यांसोबत अशी वागणूक चुकीचीच असल्याचे स्पष्ट मत नाना यांनी मांडले. उपस्थित विद्यार्थ्यांनीही त्यांच्या मताला टाळ्यांच्या गजरात पाठिंबा दिला. इतर सामाजिक उपक्रम आणि सद्यस्थितील अनेक विषयांवर नाना आणि विद्यार्थ्यांमध्ये यावेळी चर्चा रंगली. शेतक-यांच्या समस्या, बलात्कार, मानवता आणि विविध सामाजिक समस्यांवरही त्यांनी यावेळी भाष्य केले.