कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त रामनाथ सोनवणे यांची मंगळवारी बदली झाली. ही बदली रद्द करण्यासाठी त्यांनी आता थेट नगरविकास विभागातील वरिष्ठ अधिका-यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न केला.
कल्याण – कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त रामनाथ सोनवणे यांची मंगळवारी बदली झाली. ही बदली रद्द करण्यासाठी त्यांनी आता थेट नगरविकास विभागातील वरिष्ठ अधिका-यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी बुधवारी दिवसभर मंत्रालयात तळ ठोकला होता. पण मुख्यमंत्री ही बदली रद्द करण्याच्या तयारीत नसल्याने सोनवणे यांची प्रचंड कोंडी झाली होती.
केडीएमसीला ‘क’ दर्जा प्राप्त झाला आहे. टी.चंद्रशेखर, श्रीकांत सिंह यांच्यानंतर या महापालिकेला सनदी अधिकारी लाभलेला नाही. त्यामुळे हे शहर झपाटय़ाने वाढत आहे. पण शहराचा विकास पुरेसा झालेला नाही. शहरातील मूलभूत सोयी-सुविधांची पूर्तता करण्यास महापालिका प्रशासनाला अपयश आले आहे. सनदी अधिकारी नसल्याने लोकप्रतिनिधींवर वचक ठेवणे आयुक्तांना शक्य झालेले नाही.
पंधरा वर्षानंतर सुशील खोडवेकरसारखा आयएएस अधिकारी या शहराला लाभला आहे. बदली झालेल्या सोनवणे यांची नियुक्ती कुठेही करण्यात येणार नाही. त्यांना याच पालिकेत अतिरिक्त आयुक्तपद मिळणार असल्याचे संकेत आहेत. त्याची कुणकुण लागल्याने सोनवणे यांनी बदलीची ऑर्डर हाती मिळून २४ तास उलटत नाहीत तोच बुधवारी सकाळीच मंत्रालय गाठले.
प्रथम त्यांनी नगरविकास विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांची भेट घेतली. तसेच निवृत्त होण्यासाठी अवघी दोन वर्ष राहिल्याने तातडीची बाब म्हणून याच पालिकेत आयुक्त म्हणून ठेवावे, यासाठी लॉबिंग केल्याचे समजते.
नगरविकास विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांच्या माध्यमातून त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सोनवणे यांनी निवृत्तीचे कारण पुढे केल्याचे समजते. तर मुख्यमंत्री याबाबत अनुकूल नसल्याचे समजते.
सोनवणे यांना महापालिका प्यारी
आघाडी सरकारच्या एका मंत्र्याशी सलोख्याचे संबंध असल्याने सोनवणे अनेक वर्षे कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर महापालिकेत आयुक्त होते. सोनवणे हे कल्याण-डोंबिवली पालिकेत उपायुक्त होते. त्यानंतर २००३ मध्ये ते उल्हासनगर पालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी होते. नंतर तेथेच ते आयुक्त झाले. २००६ रोजी सोनवणे यांची जळगाव महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.
एमएमआरडीएमध्ये विशेष कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. त्यानंतर ऑगस्ट २०११ मध्ये केडीएमसीत आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. सुमारे पावणेतीन वर्षे काम केल्यानंतर त्यांची पुन्हा एमएमआरडीएमध्ये बदली करण्यात झाली. शंकर भिसे यांनी आठ महिने कल्याण पालिकेत आयुक्त म्हणून काम केले. पण लोकसभा निवडणुकीत आचारसंहितेची योग्य अंमलबजावणी न केल्याचा ठपका ठेवत त्यांची बदली करण्यात आली.
त्यानंतर सोनवणे यांची पुन्हा याच पालिकेत आयुक्त म्हणून बदली करण्यात आली. पण सोनवणे काही महिने कामावर रुजू झाले नाहीत. त्यामुळे ठाणे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्यामसुंदर पाटील यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला. दरम्यान याच काळात पाटील व सोनवणे या दोघांचाही पगार सुरू होता.
याविरोधात एक दक्ष नागरिक न्यायालयातही गेला आहे. वादग्रस्त सुनील जोशी यांना पुन्हा पालिकेत सामावून घेतल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. पालिका क्षेत्रातील बीएसयूपीच्या कामातील गैरव्यवहारप्रकरणी आयुक्त म्हणून सोनवणे यांनी ठोस भूमिका घेतली नसल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात येतो.
सोनवणेंसाठी शिवसेना सरसावली
रामनाथ सोनवणे हे आयुक्त असताना शिवसेनेच्या कलेने निर्णय घेत असल्याची टीका त्यांच्यावर वारंवार होत होती. बुधवारी शिवसेनेचे कल्याणमधील पदाधिकारी थेट मंत्रालयात पोहोचले. त्यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सोनवणे यांची बदली थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत, यासाठी गळ घातली.