गडकोटांच्या या महाराष्ट्रात प्रत्येक दुर्गाला स्वत:ची काही ना काही वैशिष्टय़े आहेत. लोहगडाचा अद्वितीय असा प्रवेशमार्ग यापैकीच एक! सर्पाकार मजबूत तटबंदी असलेला लोहगड किल्ला नावाप्रमाणेच लोहासारखा मजबूत, बुलंद आणि अजिंक्य आहे.
पुणे-मुंबई हमरस्त्यावरून लोणावळ्यानजीक डाव्या हातास लोहगड व विसापूर ही दुर्गजोडी आहे; कोकण व देश यांमधील परिसरावर नजर ठेवण्यासाठी या दुर्गजोडीची निर्मिती करण्यात आली असावी. पुण्या आणि मुंबईपासून जवळ असल्याकारणाने येथे ट्रेकर्स मंडळींची नेहमीच ये-जा चालू असते. हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने सोपा समजला जातो. लोहगड लोणावळ्यापासून जवळच आहे. लोणावळ्यापासून एकच स्टेशन पुढे असलेल्या मळवलीला उतरून लोहगडावर जाता येते. मळवलीला उतरले की रेल्वे फाटक ओलांडून गेल्यावर एक लहानसा ब्रिज लागतो. हा ब्रिज मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेच्या वरून जातो. तो ओलांडून मग आपण मळवली गावाच्या रस्त्याला लागतो.
पुढे लोहगडाच्या रस्त्यावरच बौद्धकालीन भाजे लेणी आहेत. मुद्दाम थांबून पाहण्यासारख्या या लेण्या आहेत. इथून दीडेक तासात आपण गायमुख खिंडीत येऊन पोहोचतो. तेथूनच पायथ्याच्या लोहगडवाडी या गावात जाता येतं. जाण्यासाठी आता डांबरी रस्ता झाला आहे.
तिथल्या पठारावरून आपल्याला विसापूर दुर्ग आणि लोहगड दोन्ही एकमेकांसमोर पाहायला मिळतात. लोहगडावर जाण्यास पाय-या चढाव्या लागतात. किल्ल्याची तटबंदी आजही मजबूत अवस्थेत ताठ मानेने उभी आहे. भक्कम बांधकाम, प्रवेशद्वारांची अजोड सर्पाकार रचना यामुळे लोहगड वैशिष्टयपूर्ण ठरतो.
गडावर चढताना एकूण चार प्रवेशद्वारं लागतात, हा मार्ग सर्पाकार असून शेवटच्या द्वारातून खाली पहिले असता अजोड सर्पाकार रचना दिसून येते, हेच लोहगडाचे मुख्य आकर्षण आहे. त्यामुळे किल्ल्यावरच्या पहारेक-यांस बाहेरून गडावर येणा-या माणसांवर नजर ठेवता येणे सोयीचे जाई. गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा व महादरवाजा हा गडाचा मुख्य दरवाजा आहे, यावर मारूतीरायाचे शिल्प कोरलेले आहे. हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने सोपा समजला जातो. या दरवाजांतून आत शिरताच समोर एक दर्गा लागतो. शेजारी सदर व लोहारखानाचे अवशेष आढळतात. त्याच दर्ग्याच्या बाहेर बांधकामाचा चुना बनविण्याचा घाणा आहे.
उजवीकडे ध्वजस्तंभ आहे. याच्या जवळच एक तोफ काही हौशी दुर्गप्रेमींनी सिंमेटच्या चौथ-यात बसवलेली आहे. येथून उजवीकडे चालत गेल्यावर लक्ष्मी कोठी लागते. कोठीच्या पुढे चालत गेल्यावर एक छोटेसे शिवमंदिर आहे. तिथून पुढे चालत गेल्यावर एक मोठे तळे लागते.
नाना फडणवीस यांनी या तळ्याची बांधणी केली, हे तळं सोळा कोनी आहे. या तळ्याच्या पुढे चालत गेल्यावर पंधराशे मीटर लांब व तीस मीटर रुंद अशी डोंगराची सोंड आहे, गडावरून पाहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो म्हणून यास विंचूकाटा हे नाव पडले.
गडावरचे प्रमुख आकर्षण म्हणजे विंचूकाटा माची. याला विंचूकडा असेही म्हणतात. राजगडाला जशी सुवेळा-संजीवनी माची, तोरण्याला जशी झुंजार-बुधला माची तशी लोहगडाची ही विंचूकाटा माची. विंचवाच्या नांगीप्रमाणे बोरघाटावर नजर आणि धाक ठेवणारी! हा गडाच्या पष्टिद्धr(155)मेला आहे. थोडं लांबून पाहता हा भाग गडापासून वेगळा झाल्यासारखा दिसतो. वरून पाहिल्यास याचे टोक विंचवाच्या नांगीसारखे दिसते.
म्हणूनच त्याला विंचूकाटा माची म्हणतात. हा गडाचा टेहेळणी बुरुज. इथून आजूबाजूच्या संपूर्ण परिसराचे अवलोकन करत येते. नेताजी पालकर या गडाचे पहिले किल्लेदार. पण १६६५च्या पुरंदरच्या तहात तो मिर्झाराजे जयसिंग यांनी मुघल सलतनीत नेला. १६७० साली राजांनी तो परत स्वराज्यात आणला. पुढे शाहू महाराजांनी तो कान्होजी आंग्रेंना दिला.
नाना फडणवीस या पेशवाईतील कर्तृत्ववान पुरुषाने लोहगडाला नवे रूप दिले. पेशवाईचा खजिना नानांनी येथील लक्ष्मीकोठीमध्ये आणून ठेवला. नंतर दुस-या बाजीरावाच्या काळात मराठी साम्राज्याची जी वाताहत झाली, त्या वेळी इंग्रजांनी एकही गोळी न झाडता हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. असा या गडाचा इतिहास सांगितला जातो.
या गडावरून विसापूर, तुंग, तिकोणा, कोरीगड, सिंहगड, तोरणा गड दिसतात व पवनाधरणाच्या परिसराचे उत्तम दर्शन होते. गडाच्या पायथ्याच्या लोहवाडीमध्ये राहण्याची व खाण्याची सोय होते. संध्याकाळी तर या सा-या भागालाच जणू एक झळाळी येते. इथली खेडी, रस्ते, शिट्टय़ा मारत धावणारी रूळवाट, भातखाचरे, डोंगर, चमचमते पाणी घेत वाहणा-या नद्या असे सारेच विलोभनीय वाटू लागते. भारत सरकारने या किल्ल्याला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.