हेरातमधील चिश्च-ए-शरीफ भागात हरीरूड नदीवर भारताच्या आर्थिक मदतीतून बांधण्यात आलेल्या भारत-अफगाण मैत्री धरणाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेरात येथे केले.
हेरात- युद्धाच्या छायेत वावरणा-या अफगाणिस्तानला प्रत्येक क्षेत्रात भारत मदत करेल, असे ठोस आश्वासन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेरात येथे केले.
भारताच्या आर्थिक मदतीतून बांधण्यात आलेल्या अफगाणिस्तानमधील भारत-अफगाण मैत्री धरणाचे उद्घाटन झाल्यानंतर ते बोलत होते. सोबत अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशराफ घानी उपस्थित होते. दहशतवादाच्या विरोधात लढा दिल्याबद्दल अफगाणी जनतेचे त्यांनी कौतुक केले. दहशतवादावर जेव्हा अफगाणिस्तान विजय मिळवेल तेव्हा ख-या अर्थाने जग सुरक्षित होईल. हे धरण दारूगोळ्याने बनलेले नाही. तर भारत आणि अफगाणिस्तानच्या मैत्रीच्या विश्वासातून बांधले गेले आहे. हा क्षण भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे, असे मोदी म्हणाले.
युद्धाच्या छायेत वावरणा-या अफगाणिस्तानला भारताकडून सर्वतोपरी मदत दिली जाईल. विशेष म्हणजे अफगाणिस्तानला प्रत्येक क्षेत्रात सहाय्य करण्यात येणार आहे. अफगाणिस्तानमध्ये लोकशाहीची मूळे रुजावीत अशी भारताची भावना आहे. तुम्ही सर्वजण एकत्र आल्यास तुमचे भवितव्य अधिक उज्ज्वल होईल. अफगाणी कला, संस्कृती आणि काव्य जगासमोर यायला हवे. तसेच अफगाणिस्तानचे क्रिकेटपटू कसोटीपटूंच्या दर्जाचे बनायला हवेत. तसेच त्यांनी आयपीएलमध्येही खेळायला हवे, असे मोदी यांनी सांगितले.
हेरातमधील चिश्च-ए-शरीफ भागात हरीरूड नदीवर १७०० कोटी रुपये खर्च करून भारताने हे धरण बांधले आहे. या धरणाचे पूर्वीचे नाव ‘सलमा धरण’ असे होते. या धरणाचे नामकरण ‘भारत-अफगाण मैत्री धरण’ असे केले आहे. या धरणामुळे ७५ हजार हेक्टर जमीन ओलीताखाली येणार असून ४२ मेगावॉट वीजनिर्मिती होणार आहे.
पंतप्रधान मोदींना अफगाणिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार
पंतप्रधान मोदी यांना अफगाणिस्तान सरकारने ‘अमीर अमानुल्ला खान’ या सर्वात मोठा नागरी पुरस्काराने शनिवारी गौरवले. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घानी यांनी मोदी यांना हा पुरस्कार प्रदान केला.