टी-२० वर्ल्डकपमधील सर्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी भारत विरुद्ध पाकिस्तान लढत आता कोलकातामधील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर रंगणार आहे.
नवी दिल्ली- टी-२० वर्ल्डकपमधील सर्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी भारत विरुद्ध पाकिस्तान लढत आता कोलकातामधील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर रंगणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही लढत धरमशालावरून कोलकात्याला हलवल्याचे आयसीसीचे मुख्य कार्यकारी डेव्ह रिचर्डसन यांनी बुधवारी सांगितले.
नियोजित वेळापत्रकाप्रमाणे भारत-पाकिस्तान हे परंपरागत प्रतिस्पर्धी वर्ल्डकपमध्ये हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या (एचपीसीए) धरमशाला स्टेडियममध्ये भिडणार होते. हा सामना आता त्याच दिवशी (१९ मार्च) त्याच वेळेत (सायं. ७.३० वा.) ईडन गार्डन्सवर होईल.
धरमशालाहून सामना हलवण्यापूर्वी बीसीसीआयशी चर्चा केल्याचे रिचर्डसन म्हणाले. ‘‘हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांनी सदर लढतील सुरक्षा पुरवण्यास दिलेला नकार तसेच पठाणकोट हल्याच्या निषेधार्थ माजी सैनिकांनी छेडलेले आंदोलन पाहता सामन्याच्या आयोजनास अडचणी निर्माण झाल्या. त्यानंतर सामना धरमशालाहून अन्यत्र हलवण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरला नाही. क्रिकेटपटूंच्या सुरक्षेला प्राधान्य देतानाच चाहते निराश होणार नाहीत, याचीही काळजी घेण्यात आली. बीसीसीआय आणि पाकिस्तान बोर्डाच्या पदाधिका-यांशी चर्चा केल्यानंतर भारत-पाकिस्तान लढत अन्यत्र खेळण्यावर एकमत झाले’’ असे रिचर्डसन यांनी सांगितले.
नियोजित वेळापत्रकाप्रमाणे धरमशालेमधील भारत-पाकिस्तान सामन्यासाठी तिकीटे खरेदी केलेल्यांना तिकीटाचे पैसे परत मिळतील.
तिकिटधारकांना कोलकात्यात लढत पाहण्याचा पर्यायही ठेवण्यात आला आहे. धरमशालेतील प्रकारानंतर विश्वचषक सामन्याचे आयोजन करणा-या प्रत्येक क्रिकेट असोसिएशन आणि राज्य सरकारने क्रिकेटपटूंच्या सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेताना स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान द्यावे,’’ असे आवाहन रिचर्डसन यांनी यावेळी केले.