मतदान यंत्रात मतदान केल्यानंतर ते कोणाला केले हे मतदारांना समजावे अशी यंत्रणा राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध करून देण्याची मागणी माजी खासदार संजय निरूपम यांनी मुख्य निवडणूक अधिका-यांकडे केली आहे.
मुंबई – मतदान यंत्रात मतदान केल्यानंतर ते कोणाला केले हे मतदारांना समजावे अशी यंत्रणा राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध करून देण्याची मागणी माजी खासदार संजय निरूपम यांनी मुख्य निवडणूक अधिका-यांकडे केली आहे. मतदान यंत्रात ढवळाढवळ होत असल्याने नवीन यंत्रणा देण्याचे निवडणूक आयोगाने न्यायालयात सांगितल्याचे निरूपम यांनी स्पष्ट केले. टिळक भवनमध्ये मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उमेदवारांची नावे घोषित होण्याआधीच मतदान यंत्रांची दुरुस्ती किंवा परीक्षण करण्याची मागणी त्यांनी केली. मतदान यंत्रात फेरफार होऊ शकतो, अशी माहिती न्यायालयातील एका प्रकरणात निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यानुसार व्होटर्स व्हेरिएबल पेपर ऑडिट ट्रेल म्हणजेच व्हीव्ही पॅड यंत्रणा मतदान यंत्रात वापरली जाईल, अशी माहिती आयोगाने न्यायालयाला दिल्याचे निरूपम यांनी सांगितले. या यंत्रणेमुळे आपण कोणाला मत दिले यासंबंधी स्लीप मतदारांना मिळण्याची व्यवस्था आहे. ही यंत्रणा राज्य विधानसभा निवडणुकीत असावी, अशी मागणी त्यांनी केली. लोकसभा निवडणुकीत मतदान यंत्रात झालेल्या फेरफारामुळे इतक्या मोठय़ा प्रमाणात भाजपला यश मिळाल्याचे ते म्हणाले.
या मतदान यंत्राची दुरुस्ती गुजरातमध्ये केली जाते. ज्या कंपनीत त्याची दुरुस्ती केली जाते ती कंपनी लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या मुलाची आहे. तेथे जर महाराष्ट्रातील मतदान यंत्राची दुरुस्ती होणार असेल तर मोठय़ा अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे महाराष्ट्रातील मतदान यंत्रांची दुरुस्ती गुजरातमध्ये करू नये, अशी मागणीही एक निवेदनाद्वारे निरूपम यांनी केली आहे.