हे पुस्तक म्हणजे पत्रकार असलेल्या लेखकाने वाचकाशी साधलेलं हितगुज आहे. लेखकाच्या आयुष्यात घडलेले अनेक प्रसंग, त्यात त्यांना भेटलेल्या व्यक्ती, त्यांचे आलेले अनुभव यांद्वारे त्याने हे हितगुज साधलं आहे. आयुष्यात घडलेल्या प्रसंगांमधून त्याला जे काही शिकायला मिळालं, त्याचा हा लेखाजोखा आहे.
पत्रकार असलेल्या डिंगणकर यांच्या माणसं वाचण्याच्या छंदामुळे त्यांनी या पुस्तकातील विविध कथांमधून मानवी स्वभाव उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी त्यांनी एक पत्रकार किंवा कवी म्हणून घडणा-या प्रसंगांकडे न पाहता, एक संवेदनशील माणूस म्हणून प्रत्येक प्रसंगाकडे पाहिलं आहे. त्यांच्या संवेदनशील मनाला स्पर्शून गेलेल्या अनेक घटनांमागील विविध गुणवैशिष्टय़ं, भावना लेखक डिंगणकर यांनी वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून मांडल्या आहेत. मात्र हे मांडण्यामागे उपदेशाचा हेतू नाही. तर तो तुमच्या-माझ्यातला संवाद आहे, असं ते म्हणतात. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक प्रस्तावनेमध्ये लेखकाच्या लेखनवैशिष्टय़ाविषयी सांगतात, ‘सत’चं त्यांना आकर्षण आहे व असत्बद्दल चीड येण्यापेक्षा त्याचं त्यांना कुतूहल वाटतं. लेखकाचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूपच आशावादी आहे. त्यामुळे त्यांच्या लेखनातून एका स्वच्छ, निकोप, आशास्पद, उमलत्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाचा परिचय होतो. हे बरचसं पटण्यासारखं आहे.
या पुस्तकात दाह, धाव, नातं, धून, राशी, झरा, शाळा, वारी, मैत्री, लेक, वेड, हात, माती, भाषा, लग्न अशा काही लेखांमधून कोकणच्या मातीत घडलेले प्रसंग, त्यांचे काही स्नेही, पत्रकारिता करताना त्यांना भेटलेले मित्र-मैत्रिणी, कार्यालयातील सहका-यांसोबत मनाला भावणा-या प्रसंगांचं विश्लेषण, एखाद्या घटनेविषयी अंतर्गत उमटलेल्या प्रतिक्रिया या सगळ्यांची सरमिसळ त्यांनी या पुस्तकात मांडली आहे. त्यांच्या ‘नातं’ या लेखात ते लिहितात, रक्ताची नाती तर असतातच. पण असंख्य अशी नाती असतात की, त्यातल्या माणसांची जागा आपल्या आयुष्यात, मनात असते. त्यांच्या केवळ असण्याचा एक आनंद, एक आधार आपल्याला वाटत असतो. खरं तर, हे एक प्रकारचं ‘गुप्तधन’ म्हणायला हवं. या लेखातून त्यांनी त्यांना आयुष्यात गवसलेल्या अशा नात्यांची ओळख वाचकांना करून दिली आहे. ‘माती’ या लेखात, मातीवर आजवर विज्ञानानं अनेक प्रयोग केले, मातीतून विविध उत्पादनांची निर्मिती करता यावी यासाठी अनेक शोध लावले, शहरी जीवन जगणारे आपल्या घरातील खिडकीत कुंडय़ांमध्ये झाडं लावून मातीशी असणारं नातं जोपासत आहेत. पण आपण माती तयार करू शकलो नाही. मातीची वैशिष्टय़ं, मातीचे अनेकविध गुणधर्म, कोकणातल्या मातीतील त्यांच्या काही हृद्य आठवणीही या कथेतून ते सांगतात.
‘मैत्री’ या कथेत त्यांनी राजकारणातील एका माणसाचं संवेदनशील मनही उलगडलं आहे. पत्रकार, राजकारणी, उद्योजक यापुढे जाऊन मैत्री करणा-या मित्रांविषयी लिहिलं आहे. तसंच पत्रकार या नात्यानं बातमीविषयी ते सांगताना की, बातमी माणसं जोडायला शिकवते. बातमीनं मला अशी माणसं दिली की, ज्यांच्याशी माझी मैत्री झाली. शाळा हे प्रत्येकाच्या आयुष्याला वळण देणारं एक असं महत्त्वपूर्ण वळण आहे, जिथे प्रत्येक जण ख-या अर्थानं माणूस म्हणून आकार धरू लागतो. शाळा हा एक संस्कार आहे. ज्यात दिला जाणारा शिक्षण नावाचा संस्कार, जो आज खूपच कमी शाळांमधून दिला जातो. जगण्याकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी इथे तयार होऊ लागते. ‘शाळा’ हा लेख, त्यांच्या खेडय़ातल्या शाळा, सध्या शाळेकडे बघण्याचा पालकांच्या दृष्टिकोनात झालेला बदल, इंग्रजी माध्यमाचं वाढलेलं महत्त्व या मुद्दय़ांवर भाष्य करते.
अशा प्रकारे दैनंदिन आयुष्यातल्या अनेक प्रसंगांवर, विषयांवर बेतलेल्या लघुलेखांच्या माध्यमातून डिंगणकरांनी वाचकांशी संवाद साधला आहे. या संवादातून नकळतपणे वाचकांच्या मनाला बोलतं करणारं, मार्मिक विचार करायला भाग पाडणारं, असं हे पुस्तक आहे.
भविष्यात जीवन जगण्याविषयीचे संदर्भ जसजसे बदलत जातील, तसतसे विविध घटनांतून ‘माणूस’ शोधण्याचा माझा प्रयत्न हा सुरूच राहील. म्हणजे ही पुस्तकरूपी ‘अनुक्रमणिके’द्वारे अधिक व्यापकपणे वाचकांशी संवाद साधता येईल, असं डिंगणकर या आत्मसंवादात शेवटी सांगतात, तेव्हा भविष्यात त्यांचे आणखी लेखन वाचायला मिळेल, असा दिलासा मिळतो.
अनुक्रमणिका : प्रशांत डिंगणकर
नितांत प्रकाशन
पानं : १११
किंमत : १५० रुपये