रथामागे दिंडी क्रमाक अमुक रथापुढे दिंडी क्रमांक तमुक असा सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्याच्या लोणंद मुक्कामीपर्यंतचा माऊलीचा प्रवास पाहण्याचा योग खर तरं आयुष्यातील सुवर्णक्षणच.
बलात्कार, आत्महत्या, चो-या-मा-या, दरोडे, खून, महाप्रलय, कुपोषण, भूकबळी आणि आधुनिक समाजात जातीसाठी माती खाणारे लोक, अशी थोर तपस्वींची समाधी भंग करणारे आघात दररोज वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रांतून होतच असतात. सत्ता, संपत्ती व ऐहिक सुखासाठी वाटेत येईल, त्याला आडवे करणारा स्वार्थही इथेच. मग, चक्रवर्ती सम्राट संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व येथील बरबटलेल्या समाजव्यवस्थेविरोधात विद्रोह करणारे संत तुकाराम या थोर संताच्या भूमीत आपल्यासारख्या थेरांचा कसा जन्म झाला, असा प्रश्न निश्चितच सतावतो. समाधान आणि विठ्ठलाचे नामस्मरण एवढेच धन गाठीशी असलेल्या वारक-यांची दरवर्षी पंढरीच्या दिशेने पडणारी ‘नि:स्वार्थी’ पावले समाजमन आणखीनच अस्वस्थ करते. मग ज्ञानोबा-तुकोबांच्या समाज परिवर्तनाच्या पालखीत मी रथामागे की रथापुढे, असा सवाल पंढरीच्या दिशेने पडणारी ‘नि:स्वार्थी’ पावले करतात.
रथामागे दिंडी क्रमाक अमुक रथापुढे दिंडी क्रमांक तमुक असा सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्याच्या लोणंद मुक्कामीपर्यंतचा माऊलीचा प्रवास पाहण्याचा योग खर तरं आयुष्यातील सुवर्णक्षणच. एकीकडे पोटाची खळगी भरण्यासाठी ख-याचं खोटं व खोटय़ाचं खरं करणारे लोक तर दुसरीकडे भक्तिरसात न्हाऊन गेलेले वारकरी. एका खांद्यावर फिकी पडलेली भगवी पताका, काखोटीला मारलेलं कपडय़ाचं गाठोडं, मातीचा राब बसलेला सदरा-लेंगा तर दुसरीकडे आजी-आई, ताई, मावशी, आत्या यांच्या पायातील (पायताण) पादत्राणं झिजेपर्यंत विठ्ठलाच्या ओढीने सुरू झालेला अथक प्रवास. मैलोन् मैलाचे अंतर कापताना माऊली, चालून-चालून तुमचे पाय दुखत असतील तर तुमच्या गुडघ्याला ही पट्टी बांधा, बरं वाटेल, अशा जाहिरातबाजीला न भुलता बाया-बापड्यांचा प्रवास सुरू आहे. वाटेत मिळणा-या नदी- ओढय़ावर आंघोळपांघोळ करून तिथेच लुगडी-कपडे वाळवायचे. मोकळ्या आभाळाखाली झाडं- माडं शोधून अंग टेकवायचं. कुठली आलीय कंबरदुखी, अंगदुखी आणि कसली कणकण. दहा ते बारा वर्षाच्या पोराटोरांपासून ते अगदी साठी-सत्तरी ओलांडलेले आजी- आजोबा माऊली माऊली म्हणत, सावळ्या विठ्ठलाच्या ओढीने पंढरीच्या दिशेने पावले टाकत आहेत. नको पैसा -अडका, नको जमीनजुमला, नको गाडी-माडी चेह-यावर केवळ सुख आणि समाधानाचे भाव. त्याही पुढे उदबत्ती हार-तु-यांचं आमिष दाखवून म्हणायचं, देवा मला पाव! हाच खरा भक्तिभाव शेकडो वर्षाची परंपरा टिकवून अवघ्या समाजाला मानव धर्माची शिकवण देत आहे. ग्यानबा-तुकारामाचा जागर करत चंद्रभागेच्या तीरी एकरूप होण्यासाठी निघालेल्या या समाज परिवर्तनाच्या रथात माझे योगदान काय, असा प्रश्न वारीत केवळ प्रसिद्धीसाठी घुसणा-या चमकेश प्रसिद्धी लोलुपांना कधी पडत असावा काय?