गिरणीतून गहू दळून आणले, पीठ कालवले, पोळ्या किंवा फुलके केले,म्हणजे आमचे पोट भरले असे होत नाही.
गिरणीतून गहू दळून आणले,
पीठ कालवले, पोळ्या किंवा फुलके केले
म्हणजे आमचे पोट भरले असे होत नाही.
केलेले अन्न पोटात घालावे लागते..
बरे पोटात घातले म्हणजे अंगी लागले
असे कोठे ?
त्यासाठी खाल्लेले पचवावे लागते
पचवण्यासाठी तसे आम्हास
मुद्दाम काही करावे लागत नाही.
ती नैसर्गिक प्रक्रिया असल्यामुळे पचवणे
आपसूकच होते..
पण ज्ञानाचे काय?
माहिती असणे आणि ज्ञान होणे
या परस्पर पूरक असल्या तरी
दोन अत्यंत भिन्न बाबी आहेत..नाही का?
हे आय. टी.चे जग आहे,
माहितीचे युग म्हटले जाते याला
पण आम्ही माहिती मिळवतो..
अफाट माहिती संग्रहित करतो.
म्हणजे आपण माहीत करून घेतो,
त्याला ज्ञान मिळवतो, असे कसे म्हणता येईल?
काहीतरी टोचल्याचे जाणवणे आणि
नेमके काय टोचले आहे हे कळणे
या दोन भिन्न भिन्न गोष्टी आहेत की नाही..?
संवेदना (सेन्सेशन) व अवबोध (परसेप्शन)
या परस्पर पूरक असल्या तरी
या दोन वेगवेगळ्या मानसिक प्रक्रिया आहेत..
आम्ही एखाद्या गोष्टीची माहिती मिळवतो
म्हणजे ती गोष्ट ज्ञात करून घेतो.
इन्फोम्रेशन मिळवतो
म्हणजे आमच्या डोक्यात
ज्ञानाचा प्रकाश पडला,
आमचे नॉलेज वाढले असे होत नाही..
डिक्शनरी पाठ केली म्हणजे
भाषा अवगत झाली असे नाही.
पुन्हा भाषा अवगत झाली
म्हणजे कविता लिहिता आली
असे अजिबात नाही.
आधी पचेल असे अन्न हवे..
ते पोटात ढकलायला हवे..
ते पचायला हवे..
मग ते अंगी लागायला हवे..
आणि अंगी लागलेल्या अन्नाचा
उपयोग व्हायला हवा
त्या उपयोगातून मेंदूने व शरीराने
काही काम करायला हवे..
एक पुढच्या साहजिकच
पुढच्या अन्नाची सोय करण्याचे काम
अन् दुसरे..
या पोटभरू उद्योगापेक्षा काही वेगळे काम..!
त्या वेगळ्या कामातून कदाचित
कविता जन्माला येऊ शकते..
एखादी कला निर्माण होऊ शकते..
एखादे वैज्ञानिक प्रमेय सुटू शकते
किमान रसिकता किंवा
सखोल जाण तरी निर्माण होऊ शकते ..!
एरवी जन्माला आला हेला
आणि माहितीयुगात माहितीचे
ओझे वाहता वाहता मेला!
नाण्याला तीन बाजू असतात,
छाप काटय़ाच्या दोन विरुद्ध बाजू
आणि नाण्याची जाडी..
माहिती आणि ज्ञान या दोन्ही
एकाच नाण्याच्या छाप-काटय़ासारख्या
विरुद्ध बाजू असतात,
माहिती जेवढी अधिक तेवढी
नाण्याची जाडी वाढते..
अंगावर नुसती चरबी वाढावी तशी!
या माहितीच्या जगात
अशी माहितीने ओथंबलेली
जाडजूड माणसे नेहमीच भेटतात.
असे नाणे खिशाला भारी पडते..
पण मूल्याने मात्र कमी!!
कारण माहिती जड असते तर ज्ञान चेतनायुक्त!
माहिती हवीच!!!
पण माहितीचे रूपांतर ज्ञानात व्हायला हवे.
माहितीचे रूपांतर जसजसे ज्ञानात होते
तसतशी नाण्याची जाडी कमी होत जाते
आणि नाण्याचे मूल्य मात्र वाढत जाते..
एक दिवस असा येऊ शकतो
नाणे अजिबात जाडी नसलेले म्हणजेच
अस्तित्वात असूनसुद्धा
कोणतीच मिती नसलेले होऊ शकते
हा मितीकडून अमितीकडे नेणारा ज्ञानयोग..
असे नाणे केवळ अमूल्य !
अर्थात या माहितीचे रूपांतरण ज्ञानात
करायचे कसे?
हा यक्षप्रश्न शिल्लक राहतोच ..
याचे मार्ग/आडमार्ग सांगणारे
बरेच गुरू, बाबामहाराज, पंथ वगरे असतात..
त्यातला कोठला स्वीकारावा
की आपणच आपल्याला
प्रश्न विचारत शोधत जावे,
ते आपल्यावर आहे.
जे खाऊ ते पचवायचे आपल्यालाच आहे.
आणि अशा आध्यात्मिक सलाइन
लावणार तरी किती दिवस?
हं .. हवे तर आधी मऊभात खावा,
मग काय ते मसालेदार चमचमीत रीचवावे!
शरीराला व्यायाम तसा मनाला अभ्यास!!
अभ्यास, चिंतन, मनन-बिनन झालं,
तर मन बाळसं हळूहळू धरेल ..
तसा एखादा डायरेक्ट फास्टफूड २ँ१३ू४३ असता,
तर पैसेवाले सगळेच नाही का,
पैसे देऊन ज्ञानी झाले असते?!
आता दुसरा एखादा ज्ञानी
आपला ज्ञानाचा दिवा पेटवू शकतो,
नाही असं नाही!
पण असा ज्ञानी सापडायला हवा नं!
मुळात सापडलेला कुणी खरेच ज्ञानी
असायला हवा!
मग तो त्याच्या दिव्याने आपला दिवा पेटवेल..
तोवर? सगळा अंधारच!?
तसाही काडेपेटीशिवाय दिव्याने दिवा
पेटतोच नां..?
नाही म्हणजे पेटो तो,
माझं काहीही ऑब्जेक्शन नाहीय!!
पण मी काय म्हणतो,
किमान दोन दिवे तरी असले पाहिजेत ना,
एकाने एकाला पेटवायला!
पुन्हा एक पेटलेला असला पाहिजे;
अन् एक पेटायचा असला पाहिजे..
हो, नाहीतर दोघांकडे अंधार!
मग काय दोघेही उजाडलेले उजेड शोधणार!!?
बरं, दिवा मातीचा असतो म्हणून काय
माती पेटते?
नाही!
वात कापसाची असते,
आणि नुसता कापूस तर भुरूभुरू पेटतो;
मंद ज्योत थोडीच देतो? नाही!
तेल लागतेच की..
म्हणून काय लसणाची फोडणी दिलेले तेल
कढईत का ज्योती पाजळणार? नाही!
मग दिवा म्हणजे काय रे भाऊ?
माती का? की नुसतीच वात?
की वात तेलाने गच्च भिजलेली?
अन् तो पेटतो म्हणजे?
पेटतो तो पेटतो
पण पेटून विझतो तेव्हा त्या छोटय़ाशा ज्योतीचा
इवलासा जीव जातो कुठे?
नाही का आपणही असेच,
हात म्हणजे आपण नाही,
पाय म्हणजे आपण नाही,
चालतो म्हणजे आपण नाही,
आपला चेहरा म्हणजेही आपण नाही,
तरी चेह-याचा फोटो आपलाच असतो
तो फोटो बघणारेही आपणच असतो
प्लॅस्टिक सर्जरी करून चेहरा पार बदलला
तरी आपण आपणच असतो..
अन् चेहरा हात पाय सगळं इथे सोडून,
आपण काही कुठे जात का असतो?
तरी आपण मेलो की आपण गेलो
असेच म्हणतात..
म्हणजे या दिव्याची ज्योत विझली बुवा..! असं!!
पण याच दिव्यात हीच ज्योत पुन्हा
पेटवता का येते..?
तरी पेटवलेच जाते आपल्याला..
म्हणजे विझलेल्या दिव्याला!
का?
फक्त तशी अंत्यसंस्काराची धार्मिक महिती
आहे म्हणून?
खरंच का राख करावी विझलेल्या दिव्यांची?
दुस-या कुठल्या दिव्याची वात बनून
नाही का चालणार?
किमान कोणाच्या पोटात गेलो तर
त्या दिव्याची धुकधुक नाही का
थोडी अधिक काळ चालणार?
आणि असे गेलो कुणाच्या पोटात अन्न म्हणून,
देहदान करून गेलो कुणाच्या खोबणीत
उजेडाचा डोळा म्हणून,
कुणाच्या पोटात शुद्ध करणारी किडनी म्हणून,
तर का राहतो आपण अनेक बनून?
मग आपण असतो कुठे आपण?
या सगळ्यांची गोळाबेरीज..
समष्टी म्हणजे आपण का?
की आपण आहोत
अशी आपलीच आपण कल्पिलेली,
आपण म्हणजे आपण नावाची एक
आपली संकल्पना?
अं?
आपले प्रश्न काहीही असोत!
त्याच प्रश्नांची नेमकी उत्तरे मिळाली नाहीत
तरी बिघडत नाही!
कारण उत्तरे शोधता शोधता
आधीच्या दुस-याच कोठल्या तरी
प्रश्नांची उकल होते ..
अन् माहितीची जाडी वितळत
ज्ञानाची बाजू लख्खं होते
बौद्ध भिख्खू नागसेनाने ग्रीक राजा मिनांडर नंतर बौद्ध धम्म स्वीकारून झालेला राजा मिलिन्द याच्या प्रश्नाना उत्तरे देताना अशा प्रश्नाची उकल ‘मिलिन्दप्रश्न’ या ग्रंथात सखोलपणे केली आहे!
प्रश्न मला आत्ता पडले,
गम्मत अशी उत्तरे दोनेक हजार वर्षापूर्वीच
कोणी दिली होती..
खरं म्हणजे मिलिन्दप्रश्न पूर्वी चाळला होता,
अभ्यासू मित्रांकडून चघळला होता,
पण प्रश्न मला स्वत:ला पडले तेव्हा
आज कोठे हलकासा उमगला..!