आणीबाणी परिस्थिती निर्माण झाली तर पोलीस दलाबरोबर अनेक निमलष्करी दलेही समन्वय साधून काम करत असतात. पण त्याचबरोबर अग्निशमन दलाची गणतीही आणीबाणीतील एक दल म्हणून केले जाते. परदेशात अग्निशमन दल म्हणजे ‘देवदूत’ असतो. अमेरिकेतील दोन व्यापारी केंद्रांवर ज्यावेळी ‘अल कायदा’ने दहशतवादी हल्ला केला होता त्यावेळी पोलीस किंवा इतर कोणत्याही आणीबाणीतील दलापेक्षा अग्निशमन दलाने बजावलेली कामगिरी ही अत्यंत कौतुकास्पद होती. त्याबद्दल अग्निशमन दलाचे संपूर्ण अमेरिकेने विशेष गौरव केले होते. जगभर जसे पोलिसांवर चित्रपट बनवले जातात त्याच प्रकारे हॉलिवुडमध्ये अग्निशमन दलावर चित्रपट बनवले गेले आहेत. हे सगळे अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांपूर्वी निघालेले चित्रपट आहेत. एवढा मान त्यांना मिळालेला आहे. भारतात मात्र, अग्निशमन दलाकडे सर्वसामान्यांपासून सरकारचाही बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत विकृत आहे. अग्निशमन दल म्हणजे ‘ऐतखाऊ’ आणि फक्त ‘पोशे’ म्हणजे त्यांना नुसते पोसायचे, असा आहे. ज्या वेळी कधी काळी, चुकून माकून वेळ आलीच, आग लागलीच तर त्यांना काम करावे लागते, असे या दलाकडे सर्वसामान्य आणि सरकारही पाहते. अग्निशमन दल म्हणजे आणीबाणीत उपयोगी पडणारे एक महत्त्वाचे दल आहे, हे सरकारच्या गावीही नाही. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात जगप्रसिद्ध ताज हॉटेलला तसेच इतर वास्तूंना दहशतवाद्यांनी हातबॉम्ब फेकून आगी लावल्या होत्या. या ठिकाणांमध्ये अनेक जण अडकून पडले होते. अशा वेळी वाढती आग आटोक्यात आणून अडकून पडलेल्यांची सुखरूप सुटका करण्याचे महत्त्वपूर्ण काम अग्निशमन दलाने दिवस-रात्र केले. दहशतवाद्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांवरही गोळीबार केला. मात्र, या सगळय़ाची पर्वा न करता त्यांनी आपले कर्तव्य इतर कोणत्याही आणीबाणीतील दलापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे पार पाडले. पुढे त्यांचा उचित गौरवही झाला. आणीबाणीत आठवणा-या पण नंतर पुन्हा दुर्लक्षित होणारे हे दल आहे. पण फक्त आगी विझवण्याचेच काम हे दल करत नाही. कोणी समुद्रात बुडाले, जुनी इमारत कोसळली, बॉम्बस्फोट झाला तर पोलिसांबरोबर तेवढय़ाच तडफेने अग्निशमन दलाचे जवान तिथे काम करतात. अगदी कावळा, चिपणी, पोपट, घार या सारखे पक्षी कुठे अडकून पडल्यावरही पहिला फोन जातो तो अग्निशमन दलाच्या यंत्रणेला. हे दलच त्यांची सुटका करते. पोलिसांसह सगळय़ाच आणीबाणीतील यंत्रणेला हे दल अत्यंत पूरक असे आहे आणि त्यातूनच एक बहुपयोगी दल अशी अग्निशमन दलाची प्रतिमा आहे. मात्र, आणीबाणीतील एक पोलादी ढाल असूनही मुंबई अग्निशमन दल उपेक्षित आणि वंचित राहिले आहे. कोणत्याही अत्याधुनिक शस्त्राविना जीव धोक्यात घालण्यात पोलीस जसे मागे पुढे पाहत नाहीत त्याच पद्धतीने अग्निशमन दलाचे जवानही अपु-या उपकरणांशिवाय जीव धोक्यात घालून काम करायला मागे-पुढे पाहत नाहीत. काळबादेवी येथील जुन्या गोकुळ इमारत दुर्घटनेत अग्निशमन दलाने दोन अधिकारी गमावले. त्यामुळे अग्निशमन दलाच्या समस्या पुन्हा ऐरणीवर आल्या आहेत. पण त्यावर अंमलबजावणी कोण करणार? त्याचे सोयरेसुतक कुणालाही नाही. अग्निशमन दलांना पोशे म्हणणा-या व्यक्तींना हे माहीत नाही की, अग्निशमन दलाचा सराव हा दररोज व वर्षभर सुरू असतो. या सरावामुळेच हे दल मुंबईकरांना जीवदान देत असते. आज मुंबईतील इमारतींची संख्या आणि उंची दोन्ही वाढल्या आहेत. पण या इमारतींबाबत काही संभाव्य दुर्घटना झाली तर ती रोखण्यासाठी अग्निशमन दलाचे हात अपुरे पडतील. पण त्यांची इच्छाशक्ती दांडगी आहे. सरकारने या दलाला वा-यावर सोडल्यासारखे वागवू नये. पालिकेच्या अखत्यारीत हे दल येते. पालिकेनेही या दलाला सापत्नतेची वागणूक देऊ नये. त्यांच्या निवा-याचा आणि विशेष म्हणजे आणीबाणीत उपयोगी ठरतील, अशी अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करून द्यावीत. या सगळय़ांचा पालिका व सरकारने योग्य तो विचार करावा. नाही तर अग्निशमन दल आणीबाणीत काम करताना इतरांना वाचवताना स्वत:च्याच जवानांना गमावून बसतील.