मुंबई, राजकोट, जमशेदपूर : सव्र्हिसेसपाठोपाठ मुंबई, पंजाब, सौराष्ट्राने रणजी करंडकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. मुंबई, पंजाब आणि सौराष्ट्राने पहिल्या डावाच्या आघाडीवर ‘सेमीफायनल’मध्ये प्रवेश केला. बडोद्यावरील फॉलोऑनची नामुष्की, चेतेश्वर पुजाराचे नाबाद द्विशतक तसेच जिवनज्योत आणि तरुवरची शतके चौथ्या दिवसाचे वैशिष्टय ठरले. चारच दिवसांत निकाल लागल्याने पाचव्या आणि अंतिम दिवसाच्या खेळाला महत्त्व उरलेले नाही.
वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या उपांत्यपूर्व लढतीत बडोद्याविरुद्ध चौथ्या दिवसअखेर बुधवारी दुस-या डावात १ बाद १७१ धावांची मजल मारताना मुंबईने एकूण आघाडी ५४५ वर नेली. बडोद्याचा डाव दुस-या सत्रात २७१ धावांत आटोपला. मात्र मुंबईने पाहुण्यांवर फॉलोऑन न लादता पुन्हा फलंदाजी करणे पसंत केले. पहिल्या डावातील आघाडीमुळे मुंबईची आगेकूच कायम राहिली आहे.
चहापानापूर्वी फलंदाजीला आलेल्या वासिम जाफर (३३) आणि कौस्तुभ पवारने (खेळत आहे ७०) सावध सुरुवात करताना ४८ धावांची सलामी दिली. ‘पार्टटाइम’ गोलंदाज अंबाती रायुडुने जाफरला पायचीत करत सलामी फोडली. मात्र त्यानंतर बडोद्याला विकेट मिळवता आली नाही. पवारने हिकेन शाहसह (खेळत आहे ६५) दुस-या विकेटसाठी १२३ धावांची नाबाद भागीदारी करताना मुंबईला पावणेदोनशेच्या घरात पोहोचवले. चौथ्या दिवसअखेर यजमानांनी दुस-या डावात १ बाद १७१ धावा करताना एकूण आघाडी ५४५ वर नेली. कौस्तुभने सहावे अर्धशतक ठोकताना सहा चौकार आणि दोन षटकार लगावले. फॉर्मात असलेल्या हिकेन शाहचेही हे सहावे अर्धशतक आहे. त्याने सहा चौकार आणि एक षटकार मारला.
निम्मा संघ १६७ धावांत बाद झाल्याने बडोद्यावर फॉलोऑनचे संकट होते. मधल्या फळीतील अंबाती रायुडुने (नाबाद ८९) एक बाजू लावून धरली तरी पाहुण्यांवर बुधवारी फॉलोऑनची नामुष्की ओढवली. रायुडुने १५२ चेंडूंत १५ चौकार आणि दोन षटकारांसह २७वे अर्धशतक झळकावले. तळातील फलंदाजांची साथ न लाभल्याने त्याला शतकापासून वंचित राहावे लागले. जावेद खानच्या गोलंदाजीवर शेवटचा फलंदाज भार्गव भट चुकीचा फटका मारून बाद झाल्यानंतर रायुडुने नाराजी व्यक्त केली. दुस-या सत्रात १०२.४ षटकांत २७१ धावांत बडोद्याचा पहिला डाव संपला. मुंबईने पहिल्या डावात ३७४ धावांची मोठी आघाडी घेतली. डावखुरा फिरकीपटू विशाल दाभोळकर यजमानांचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने तीन विकेट घेतल्या. जावेद खान आणि धवल कुलकर्णी या मध्यमगती दुकलीसह डावखुरा स्पिनर अंकित चव्हाणने प्रत्येकी दोन विकेट घेत प्रतिस्पर्ध्यांना पावणेतीनशेच्या आत रोखण्यात मोलाचा वाटा उचलला.
संक्षिप्त धावफलक : मुंबई – ६४५ आणि १ बाद १७१(पवार खेळत आहे ७०, शाह खेळत आहे ६५) वि. बडोदा – २७१(रायुडु नाबाद ८९, वाघमोडे ५३, वाकास्कर ५१, दाभोळकर ८८-३, खान २२-२).
चेतेश्वर पुजाराचे नाबाद द्विशतक
चेतेश्वर पुजाराच्या (खेळत आहे २६१) नाबाद द्विशतकामुळे उपांत्यपूर्व फेरीत कर्नाटकविरुद्ध चौथ्या दिवसअखेर दुस-या डावात ३ बाद ४६३ धावा करताना सौराष्ट्राने एकूण आघाडी ५३६ वर नेली. पहिल्या डावातील ७३ धावांच्या आघाडीमुळे सौराष्ट्राचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित झाले आहे. पहिल्या डावातील पिछाडीनंतरही दुस-या डावात सौराष्ट्राला लवकरात लवकर गुंडाळून सामन्यात रंगत आणण्यास कर्नाटक उत्सुक होते. मात्र पुजाराच्या नाबाद द्विशतकामुळे सौराष्ट्राची फलंदाजी बहरली.
त्याने सागर जोगियानीसह (७०) दुस-या विकेटसाठी ८९, कर्णधार जयदेव शाहसह (३१) तिसऱ्या विकेटसाठी १०५ तसेच शेल्डन जॅक्सनसह (खेळत आहे ७०) चौथ्या विकेटसाठी २४३ धावांची नाबाद भागीदारी करताना संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली. पुजाराने या मोसमातील दुसरे द्विशतक साजरे केले. त्याने २७५ चेंडूंत नाबाद २६१ धावांची झटपट खेळी करताना ४० चौकार लगावले. तसेच एक षटकार ठोकला. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत निवड झालेल्या पुजाराला त्रिशतक झळकावण्याची संधी आहे.
संक्षिप्त धावफलक : सौराष्ट्र – ४६९ आणि ३ बाद ४६३(पुजारा नाबाद २६१, शेल्डन खेळत आहे ७०, जोगियानी ७०) वि. कर्नाटक – ३९६.
पंजाबचे चोख प्रत्युत्तर
झारखंडला चोख प्रत्युत्तर देताना पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर पंजाबने उपांत्य फेरी गाठली. सलामीवीर जिवनजोत सिंग (१३१) आणि ‘वनडाउन’ तरुवर कोहलीच्या (खेळत आहे १५१) शतकांच्या जोरावर पंजाबने चौथ्या दिवसअखेर ३ बाद ४३५ धावांची मजल मारताना पहिल्या डावात ३४ धावांची आघाडी घेतली.
१ बाद १५० वरून पुढे खेळताना जिवनजोत आणि तरुवरने दुस-या विकेटसाठी १५६ धावांची भागीदारी करताना चौथ्या दिवशीचे पहिले सत्र जवळपास खेळून काढले. जिवनजोतने प्रथम शतक पूर्ण केले. त्याचे हे पाचवे शतक आहे. जिवनजोतला त्रिफळाचीत करत शाहबाझ नदीमने भागीदारी संपुष्टात आली. २५० चेंडूंत १९ चौकारांसह १३१ धावांची खेळी त्याने केली. मात्र बुधवारचा दिवस गोलंदाजांचा नव्हताच, असे म्हणावे लागेल. जिवनजोत परतल्यानंतर तरुवरने सामन्याची सूत्रे आपल्याकडे घेत मनदीप सिंगसह (९६) तिस-या विकेटसाठी २०४ धावांची भागीदारी करताना पंजाबला आघाडी मिळवून दिली.
तरुवरने प्रथमश्रेणी क्रिकेटमधील दुसरे शतक साजरे करतानाच विकेट फेकली नाही. मात्र मनदीपला शतक पूर्ण करण्यात अपयश आले. ९६ धावांवर मनिष वर्धनने त्याला बाद केले. त्याच्या खेळीत डझनभर चौकारांचा समावेश आहे. तरुवर कोहली १५१ धावांवर खेळत आहे. त्याने संपूर्ण दिवस खेळून काढताना ३८१ चेंडूंचा सामना केला आहे. त्याच्या नाबाद खेळीत १६ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे.
संक्षिप्त धावफलक : झारखंड – ४०१ वि. पंजाब – ३ बाद ४३५(कोहली नाबाद १५१, जिवनजोत १३१, मनदीप ९६).